मुंबई – जुलै महिन्याच्या शेवटाला मुसळधार पावसाने राज्यभरात एकच कहर केल्याचे चित्र बघायला मिळाले. अनेक भागात नदीपात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. तर बहुतांश धरणांनी मर्यादा पातळी ओलांडली आहे. असे असताना संपूर्ण राज्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर आता पावसासंदर्भात हवामान विभागाने एक महत्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. आता सुमारे दोन आठवडे पाऊस काहीशी विश्रांती घेणार असल्याची माहिती आहे. ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये कोकण व घाटमाथा वगळता उर्वरित राज्यात पाऊस ब्रेक घेणार आहे. त्यानंतर, 15 ऑगस्टनंतर, राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे 50 वर्षांनंतर भराडी नदीला पूर आला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर-पूर्व भारतासह मध्य भारत आणि विदर्भाला गेल्या काही दिवसात पावसाने जोरदार झोडपले होते. आता हे कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू विरून जात गुजरात-राजस्थानच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे, सोमवारपासून पावसाचा हा जोर बऱ्यापैकी कमी होणार असून, केवळ हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दुसरीकडे, ‘एल निनो’चा प्रभाव वाढण्याची शक्यता असून ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांत देशात सरासरीच्या 94 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने त्या अनुषंगाने पावले उचलणे गरजेचे आहे. नैऋत्य मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) देशभरात सरासरीच्या 94% पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केले आहे. तर 15 ऑगस्ट पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश व विदर्भात पावसाचा जोर कमी राहील. या काळात बहुतांश ठिकाणी केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. 15 ऑगस्टनंतर मात्र राज्यभरात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता आहे.
तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल






