सिंध गावच्या देशपांडेवाड्यात एकच धावपळ चालली होती. वाड्याच्या तटावरची सारी तणं, पिंपळाची रोपटी काढून टाकून तट स्वच्छ केला होता. वाड्याच्या सदरसोप्याचे शिसवी नक्षीदार खांब तेलातला हुरमंज लावल्यामुळं लकाकत होते. वाड्याच्या भिंती पिवळ्या धोट पिवडीनं रंगवल्या होत्या. पहिल्या चौकातील जमीन शेणसड्यानं सारवल्यामुळं चौक अधिकच प्रशस्त भासत होता. सणासुदीचे कपडे घातलेले सेवक वाड्याच्या आत-बाहेर करीत होते.
दोन प्रहर टळत आली.
फुलाजी-बाजी आपल्या सोप्यात बैठकीवर बसले होते.
सोनाबाई, गौतमाई दाराशी अधोवदन उभ्या होत्या. दोघा भावांचं बोलणं त्या ऐकत होत्या.
‘बाजी, तू हवं, ते म्हण.’ फुलाजी म्हणाले, ‘त्या पोराच्या अंगी मोठी धमक आहे. वय केवढं कोवळं! अजून ओठावरच्या मिशीला रंग फुटला नाही. पण काय हिंमत!’
‘खरं आहे, दादा!’ बाजी म्हणाले, ‘आजवर या बाजीच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची कुणाची ताकद नव्हती. पण राजांच्या डोळ्यांतलं तेज पाहवत नव्हतं. राजांच्या बोलण्यात नागाला डोलवणाऱ्या पुंगीची साद आहे. त्यांच्या डोळ्यांत चित्त्याच्या नजरेतला धाक आहे. केव्हा हातचा पट्टा गळून पडला आणि त्यांच्या मिठीत सापडलो, तेही कळलं नाही.’
फुलाजी हसले. म्हणाले,
‘बाजी, तू काही म्हण. त्या पोराच्या अंगात दैवी शक्ती आहे. आजवर मी ऐकत होतो. त्याला पाहिलं आणि ते पटलं, बघ.’
‘त्यांना भवानी प्रसन्न झालेय, म्हणे!’ गौतमाई म्हणाल्या.
‘का होणार नाही?’ फुलाजी उठत म्हणाले, ‘त्यांन वाईट काय केलं? आज या मुलखात गोरगरिबांचा वाली कोण आहे? आजवर एवढया आयाबहिणींची अब्रू गेली. कुणाला त्याची चाड होती? या पोरानं सांगितलं, असलं या पुढं चालायचं नाही. रांझ्याचा पाटील लई माजोरी. त्यानं असंच केलं. हात-पाय तोडले त्याचे. त्याच्या मागं का माणसं धावणार नाहीत? तरी सांगत होतो, बाजी! आपल्या राजानं सलूख केला असता, तर फार बरं झालं असतं. पण तुझा सल्ला त्यानं मानला.’
बाजी उफाळले,
‘मला काय माहीत, शिवाजी राजे असे असतील, म्हणून! जसे जेधे आले, तसे शिवाजी….’
‘तिथंच गल्लत झाली. आज तेच कान्होजी जेधे शिवाजीच्या संगती आहेत. ठीक आहे. झालं-गेलं गंगेला मिळालं. पण शिवाजी राजे येतील, नव्हे?’
बाजी म्हणाले,
‘जरूर येतील! तसा सांगावा त्यांनी धाडला आहे.’
फुलाजींनी उभ्या असलेल्या सोनाबाई, गौतमाईंच्याकडं पाहिलं.
त्यांनी सांगितलं,
‘शिवाजीराजे केव्हाही येतील. आज इथं ते मुक्कामाला आहेत.’
‘सगळं झालं आहे. आपण चिंता करू नये.’ गौतमाईंनं विश्वास दिला.
‘ठीक आहे. आम्ही सदरेवर जातो.’
बाजी-फुलाजी सदरेवर आले, तेव्हा सदरेवर लोड, तक्क्यांनी सजलेली पांढरी धोट बैठक तयार होती. सदरेवर गावचा तात्याबा म्हसकर उभा होता.
बाजी-फुलाजी सदरेवर येताच त्यांचं लक्ष तात्याबा म्हसकरकडं गेलं.
‘बसा तात्या! लवकर आलात?’
म्हातारा तात्याबा मिस्किल हसला. तो म्हणाला,
‘धनी, कोंबडा झाकून ठेवला, म्हणून सुर्य उगवायचा ऱ्हातो काय?’
‘काय?’ बाजींनी विचारलं.
‘साऱ्या गावभर नव्हं, तर साऱ्या गावठाण्यात आवई उठलीया. शिवाजी राजं आज येनार. खरं हाय?’
‘होय! ते येणार आहेत.’ बाजी म्हणाले.
‘आनि आमांस्नी त्याची खबर न्हाई.’ तात्याबा म्हसकर उफाळला, ‘तुमचा बा असता, तर त्यानं हे केलं असतं?’
‘तसं नाही, तात्याबा! राजांनी सक्त ताकीद दिली, आम्ही येणार, हे कुणाला सांगू नका.’
‘मग साऱ्या गावाला कसं कळलं?’
‘तेच आमचं दुर्दैव आहे. ह्या घरात पळी पडली, तरी, हंडा पडला, म्हणून साऱ्या गावाला कळतं!’
तात्याबा शांत झाला. तो म्हणाला,
‘मला बलवलं न्हाई, म्हनून राग न्हाई. शिवाजी राजा आता ईल. त्याला मानानं घरात घ्या.’
‘म्हणजे?’ फुलाजी उद्गारले.
‘किती केलं, तरी आपला राजा हाय त्यो! दारात पाच सुवासिनी उभ्या करा. भाताचे मुटके ठेवा. त्याला ओवाळून घरात आणा. सदरेजवळ घंगाळ ठेवा. पाय धुऊन तो पायरी चढंल.’
तात्याबा म्हणाला, त्यात काही खोटं नव्हतं.
बाजी तत्परतेनं वाड्यात गेले. परत धावपळ झाली. आरत्या सजल्या. सदरेच्या खाली पायऱ्यांजवळ चकचकीत तांब्याचं घंगाळ ठेवलं गेलं.
तात्याबा ती सारी धावपळ थंडपणे पाहत होता.
किंचित रोषानं बाजींनी विचारलं,
‘झालं मनासारखं?’
‘आता झालं.’ तात्याबा म्हणाला, ‘पन त्यो राजा हाय. त्यो काय एकटा येनार? त्याच्या संगती शिबंदी असंल. ते आल्यावर त्यांस्नी गूळपानी…’
‘ती व्यवस्था केली आहे.’
‘मग झालं, तर!’ तात्याबा निर्विकारपणे म्हणाला.
त्याच वेळी यशवंत धावत आला. तो म्हणाला,
‘धनी, टापांचा आवाज येतूया….’
बाजी-फुलाजींनी आपली पागोटी सावरली. सुवासिनी प्रवेशद्वाराजवळ गेल्या. त्यांत सोनाबाई-गौतमाईही होत्या.
🚩क्रमशः🚩