विविध भागांची ओळख तेथील भौगोलीक वैशिष्ट्य, पीक पद्धती यावरून. राज्यात नागपूरमधील संत्रा, नाशिकचे द्राक्ष, डाळिंब, मराठवाड्यातील केशर आंबा, कोकणातील हापूस आंबा हे फळे आधीपासूनच प्रसिद्ध आहेत. ठाणे जिल्ह्यात बाहडोली म्हणून एक गाव आहे. या गावाने जांभूळ उत्पादनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे येथील गावकर्यांना जांभूळ विक्रीतून हक्काचे उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून येथील जांभूळ उत्पादनाची परंपरा आहे.
ठाणे शहरापासून अहमदाबाद महामार्गावर 70 किलोमीटर अंतरावर मस्तान नाका आहे. तेथून जवळच असलेल्या मनोर गावापासून 15 किलोमीटर अंतरावर बाहाडोली हे गाव आहे. वैतरणा नदीच्या कुशीत वसलेले हे गाव नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. साधारण साडेतीनशे कुटुंबाच्या या गावाची जवळपास सोळाशे लोकसंख्या आहे. या गावात तीन पिढ्यांपूर्वीच एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. आज तिसरी पिढी या उपक्रमातून झालेल्या कामाची फळे चाखत आहे. या गावाचे सामूहिक वार्षिक उत्पन्न तब्बल तीन कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे गावकर्यांना हे उत्पन्न जांभळापासून मिळते. गावातील हद्दीतून गेलेल्या नदीकाठी व गावाला वेढलेल्या सुमारे बाराशे जांभळाच्या सामूहिक मालमत्ता असलेल्या झाडांपासून या गावाने आर्थिक समृद्धी साधली आहे.
बाहडोलीचे जांभूळ टपोरे
जांभूळ म्हटलं की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. जांभळाचा हंगाम कमी कालावधीसाठी असल्याने खवय्ये चांगल्या जांभळांच्या शोधत असतात व ते मिळवण्यासाठी धडपड करतात. मधुमेह असलेल्या रोग्यांसाठी तर जांभूळ वरदानच ठरले आहे. अनेक औषधी गुणधर्म असल्याने जांभूळ आरोग्यदायी आहे. बहाडोली जांभळे टपोरी, गर्द जांभळ्या रंगाचे, रसाळ व चवीला खूपच मधुर आहेत. येथील एका जांभळाचे वजन साधारण 23 ते 24 ग्रॅम भरते आणि बी देखील मध्यम असल्याने गर जास्त असतो. बाजारात ही जांभळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात.
वारसा रूपात झाडं
बाहडोली गावातील जांभळाच्या झाडांची मालकी परंपरेने येथे जन्म घेणार्याला मिळते. तीन पिढ्यांपासून येथील गावकरी या झाडांना आपसात वाटून घेत आलेले आहेत. या महाकाय झाडांच्या खोडाचा आकार बघितल्यास ते 50 ते 60 वर्ष वयाचे असतील असा सहज अंदाज येईल. येथे जन्माणार्या प्रत्येकाला या झाडांची मालकी आपोआप मिळत असल्याने, जन्म घेणार्याचे उत्पन्न लगेच सुरू होते. मागच्या पिढीने लावलेल्या झाडांमुळे नवीन पिढी आज आर्थिक बाबतीत निश्चिंत बनली आहे. गावातील या सामूहिक मालमत्तेपासून प्रत्येकाला उत्पन्न मिळते. तेही दरवर्षी आणि घसघशीत! ही जांभळाची झाडे प्रत्येकाचा आर्थिक आधार बनली आहेत. गावाची आर्थिक उलढलाच या झाडांवर सुरू आहे. विशेष म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला झाडांपासून भरपूर प्रमाणात जांभळे मिळत असल्याने दुसर्यांच्या झाडांची जांभळे चोरण्याच्या कुणी भानगडीतही पडत नाही. तसे कोकणातील इतर भागाप्रमाणे या गावातही भाताची शेती केली जाते.
झाडांची निगा राखतात
जांभळाची झाडं तशी नैसर्गिकरित्या वाढतात. पावसाच्या पाण्यावर ती मोठी होतात. या गावात मात्र जांभळाच्या झाडांची लहानपणापासून देखभाल केली जाते. झाडांच्या मुळांच्या विस्तार होईपर्यंत प्रसंगी पाणी दिले जाते. वेळोवेळी आवश्यक ती खते दिली जातात. झाडावर आणि फळावर रोगकिडींचा पादुर्भाव झाल्यास वेळोवेळी फवारण्या केल्या जातात. हे सर्व आता नवीन झाडे लागवड करायची असेल तर त्याबाबतीत घडते. मात्र या गावात पूर्वापार जपलेली बाराशेहून अधिक झाडे आहेत. त्यांच्या बाबतीत आता खतपाणी व्यवस्थापनाची गरज पडत नाही. फक्त फळांवर रोगकिड येऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. गावात उंच वाढलेली ही महाकाय झाडे गावातील प्रत्येकासाठी रोजगाराचे साधन तर आहेच; शिवाय त्यांच्यासाठी आदर व अभिमानाची बाब बनली आहे. या झाडांची लागवड कोणी केली, केव्हा केली याबाबत कुणाला माहिती नाही. या झाडांची जात कोणती, हेही कुणी सांगू शकत नाही.
फळं काढणीची पद्धत
जांभूळ फळ नाजूक असल्याने त्याची काढणी करणे मोठे जिकरीचे असते. झाडांच्या ज्या फांद्या मजबूत असतील त्या फांदीवर चढून हाताला येतील तेवढी फळं अगोदर तोडली जातात. फांदीच्या शेंड्याकडील फळं तोडण्यासाठी बांबूची खास शिडी वापरली जाते. फळे अलगद काढता यावी यासाठी देखील विशेष प्रकारचा झेला वापरण्यात येतो. पक्व झालेली फळंच तोडली जातात. काढणी केल्यावर टोपल्यांमध्ये पानं ठेवून त्यावर ती साठवली जातात. तोडणीपासून विक्रीपर्यंत फळं खराब होऊ नये म्हणून पुरेपुर काळजी घेतली जाते. बाजारात फळाच्या तजेलदारपणावरच त्याचा भाव ठरत असतो.
महिन्याभराचा हंगाम
जांभूळ झाडांना मे महिन्यात फळं मिळतात. जूनमध्ये पहिला पाऊस पडला की, हळूहळू कमी होतात. साधारण महिन्याभराचा काय तो हंगाम असतो. सर्व गावकरी आपापल्या झाडांचे जांभूळ तोडून आजूबाजूला विक्री करतात. हळूहळू या रसाळ, मधुर व टपोरे जांभळाचा स्वाद मुंबई, पुण्यासह अख्ख्या महाराष्ट्रभरात पोहचला आहे. ग्राहकांना चव भावत गेली तशी या जांभळाची किर्ती पसरत गेली. ही जांभळे कोठून आलीत, याची चौकशी होऊ लागली. व्यापारी, ठोक विक्रेते तपास करू लागले. माहिती काढत गेले. चर्चा होऊ लागली आणि बहाडोली येथील जांभळाला मागणी वाढत गेली. गेल्या 20 वर्षाांसून हे गाव केवळ जांभूळ उत्पादनासाठीच प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. शासनाच्या कृषी विभागाने पुढे येथे जांभूळ महोत्सव भरवला. मुंबईसह अनेक शहरातून, लांबून लोकं आले. जांभूळ खाऊन तृप्त होऊन जाताना या जांभळाची रोपे, बिया घेऊन गेले. प्रसार व प्रचार होत गेला. इथल्या जांभळांचा इतका प्रचार झाला की, पुढे महाराष्ट्रभरातील लोकांनी या जांभळांना गावाचे नाव दिले. शासनाने या गावाला जांभळाचे नाव दिले. आज हे जांभूळ ‘बहाडोली जांभूळ’ म्हणून ओळखले जाते तर बहाडोली गाव जांभूळ गाव म्हणून ओळखले जाते. कोकण कृषी विद्यापिठाने या जांभळाची रोपे बनवली आहेत. या जांभळाला ‘कोकण बहाडोली जांभूळ’ हे नाव दिले. अशा प्रकारे गावाला पिकाचे व पिकाला गावचे नाव दिले गेल्याचे महाराष्ट्रातील हे पहिलेच उदाहरण असावे.
जांभळापासून प्रक्रियायुक्त पदार्थ
जांभूळ हे बहुगुणी फळं असून त्याचे विविध पदार्थ देखील बनतात. बर्याचदा वार्यामुळे जांभळं जमिनीवर पडतात. ती फळं फुटल्याने थेट विकता येत नाही. बहाडोलीकर अशी जांभळं वाळतात. या वाळलेल्या जांभळापासून पावडर तयार करतात. त्याची पारंपरिक पद्धतीने वाईन देखील तयार करतात. बियांची देखील पावडर बनवून त्याची विक्री होते. फळांसह प्रक्रियायुक्त पदार्थांच्या विक्रीतून दोन पैसे अधिकचे मिळतात.
जांभूळं उत्पादनातील अर्थकारण
बहाडोलीतील एका जांभळाच्या झाडापासून सुमारे 20 ते 25 हजारांचे वार्षिक उत्पन्न मिळते. गावकरी या झाडांचे गेल्या तीन पिढ्यांपासून संवर्धन करत आहेत. स्थानिक ठिकाणी हे जांभूळ 80 ते 120 रुपये प्रति किलोप्रमाणे विकले जातात, तर मुंबईपर्यंत पोचल्यावर त्यांचा भाव 400 ते 500 रुपये भाव होतो. गावातील प्रत्येकाला नफा मिळत असला, तरी यातही व्यापारी भाव खाऊन जातात. त्यामुळे स्थानिक शेतकर्यांचा मोठा तोटा होतोय. स्थानिक शेतकरी आपले जांभूळ मुंबई, पुण्याला नेऊन विकू शकत नाहीत. त्याचा फायदा व्यापार्यांना होतो आहे. हीच या प्रकल्पातील शोकांतिका म्हणावी लागेल. शेतकर्यांना शासनाच्या मध्यस्तीची गरज आहे. जांभूळ महोत्सव घेतल्यानंतर कृषी विभागाने या गावाकडे फारसे लक्ष दिलेले नाही. या जांभळांना मोठ्या शहरात खूप मागणी आहे. त्यानुसार शेतकर्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत जांभूळ पोचवण्याची व विक्री करण्याची व्यवस्था उभी राहायला हवी. असे केल्यास शेतकर्यांच्या हातात नक्कीच दोन पैसे जास्तीचे पडतील. त्यातून या शेतकर्यांचा उत्साह व उत्पन्न वाढेल.