मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात नंदापूर हे छोटेसे गांव आहे. छोटीशी ‘नंदा’ नदी. इथंच डोंगर पायथ्यापाशी हिचा उगम आहे. नंदापूर नदीकाठचं वसलं आहे. देवासमोर सतत स्वतः जळत राहून जगाला प्रकाश देणार्या नंदादीपाप्रमाणं झिजणारं एक व्यक्तिमत्त्व याच नदीकाठच्या गावी जन्मलं. दत्तात्रय भानुदासराव चव्हाण. फक्त 43 वर्षांचे. बारावीनंतर स्वतःला पूर्णपणे शेतीतच गाडून घेतलेलं. दत्ताभाऊंच्या या सौभाग्यवती चंद्रकलाबाई. शेतीतलं कोणतही काम त्या न सांगता पुरं करतात. खर्या अर्थानं दत्ताभाऊंच्या गाड्याचं दुसरं चाक. या दांपत्याला दोन मुलं ः आदित्य आणि वैष्णवी. दत्ताभाऊंच्या विस्तारित कुटुंबात एकूण 30 जण आहेत. त्यात आई-वडील, काका-काकी, सख्खे व चुलत भाऊ व वहिन्या, पुतणे, पुतण्या आहेत.
फळबाग व भाजीपाला पिकात पदविका घेतेल्या दत्ताभाऊंनी शेतीसाठी मातीत पहिलं पाऊल टाकलं तेव्हा या घराण्याची एकंदर जमीन होती 80 एकर. आज ती 150 एकर आहे. दत्ताभाऊंची तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता अफाट आहे. मूलतः ती त्यांची आवडही आहे. कामात एक शिस्त आहे. घराबाहेर लावलेला एक बोर्ड हे त्याचं एक उदाहरण आहे. त्यावर रोजची कामं दररोज लिहिली जातात. माती, पाणी यांचं परीक्षण दर सहा महिन्यांनी केलं जातं. रोजच्या रोज हवामान पाहिलं जातं. त्यासाठी स्वतःचं स्वयंपूर्ण वेदर स्टेशन आहेच. त्या शिवाय इंटरनेट वरून शासकीय तसंच खाजगी कंपन्यांच्या वेदर साईट्शीही सतत संपर्क असतो. फवारण्यांसाठीच्या सर्व औषधं, केमिकल्सची अद्ययावत माहिती त्यांना सतत मिळत राहते. दत्ताभाऊंकडं दोन मोठे व तीन लहान असे पाच ट्रॅक्टर्स आहेत. फवारण्यांसाठी तीन ब्लोअर्स आहेत. रोटरी आहे. टोकण यंत्र आहे.
जलसिंचन सुविधा
त्यांच्या कडे सिंचनासाठी एकंदर 11 विहिरी आहेत. नदीपासून चार इंची पाईपलाईन आहे. एकंदर 80 एकरांवर सध्या ठिबक आहे. उरलेल्या शेतांवरही ठिबक लावण्याची तयारी चालू आहे. 5 एच.पी.चे चार सोलार पंप आहेत. चार कोटी लीटर्स पाणी क्षमतेची दोन शेततळी आहेत. ती एकत्र करून 10 कोटी लीटर्सचं एकच शेततळं तयार होत आहे. वर्षाकाठी जेमतेम 550 एम.एम. पाऊस असल्यानं शेततळी हाच खरा पाण्याचा खात्रीलायक स्रोत आहे. फळबागांसाठी पाणी देतांना पाणी तपासणी करून आलेल्या अहवालानुसार पाण्याचा सामू नियंत्रित करून पाणी दिले जाते. पिकांना ठिबकद्वारे खते दिली जातात., फळबागेच्या काही क्षेत्रात सब सरफेस ठिबक तंत्रज्ञान वापरले आहे.
कमी पाण्यावरची बागायती
दत्ताभाऊंची शेती प्रामुख्यानं फळबागायतीची आहे. कमी पाण्यावरची. म्हणूनच ऊस व केळी नाहींत. 20 एकर द्राक्षबाग, 12 एकर डाळिंब, पपई 4 एकर, 15 एकर ज्वारी, तूर 15 एकर, 7 एकर मका आहे. वरील पिकांना हवामानाचा अंदाज घेऊन रोगनियंत्रण पद्धती त्यांनी स्वीकारली आहे. शेतीवर गायी, बैल, म्हशी व वासरं मिळून 47 जनावरं आहेत. त्यांचं वर्षभरात 100 ट्रॅक्टर एवढं शेणखत मिळतं. तेवढच बाहेरून विकत घ्यावं लागतं. त्याचप्रमाणे ट्रॅक्टरचलित यंत्राचा शेणाची स्लरी टाकण्यासाठी वापर केला जातो. दत्ताभाऊ स्वतः अत्यंत हिशेबी व तल्लख माणूस आहे. त्यामुळं शेतीतल्या प्रत्येक कामाचा चोख हिशेब नफा तोटा त्याचेकडे तयार असतो. पहिल्या द्राक्ष लागवडीसाठी त्यांनी स्टेट बँकेकडून 50 लाखांचे कर्ज मिळवले व 15 एकर द्राक्षबाग उभी राहिली, अर्थातच ते कर्ज त्यांनी पीक उत्पन्नानंतर लगेच फेडलं म्हणून स्टेट बँकेनं त्यांचा सत्कारही केला.
स्वतः बरोबरच गावाचा विकास
वर्षाकाठी अंदाजे 50 लाखांवर उत्पन्न मिळविणाऱ्या दत्ताभाऊंना आपल्या बरोबरच आपल्या गावात – नंदापुरातील गावकर्यांचाही विकास व्हावा ही आंतरिक तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून त्यांनी गावातील लहान-थोर मंडळींना प्रत्यक्ष त्यांच्या शेतात-घरी जाऊन मार्गदर्शन करून पाठपुरावा सुरू केला. वेळप्रसंगी स्वतःची यंत्रसामग्री, माणसंही दिली. बाजारपेठा दाखवल्या. यामुळं आज गावातील 600 एकर जमीन फळबागायतीखाली आलीय. म्हणून आज गावात शेतमजूर मिळत नाही. दत्ताभाऊंनी नंदापूरमध्ये 16 महिला बचतगटांची स्थापना केली. गावाच्या शिवारात पाणलोट विकास कार्यक्रम राबवला. जलयुक्त शिवार योजनेतही सक्रिय सहभाग दिला. पूर्वी गाव भांडण-तंट्यात मश्गूल असे. आता गावातल्या लोकांना मुळातच वेळ नाही भांडायला.
इंचन्इंच भागही ठिबकखाली
दत्ताभाऊंनी 2012 ला युरोप टूर केली आणि 2019 च्या अॅग्रोटेकसाठी इस्रायलची वारी केली. या सर्व पराक्रमांचे फलित म्हणजे गेली 4 वर्षे दत्ताभाऊ नंदापूरचे सरपंच आहेत. शेती विद्यापीठ, विविध कंपन्या, शासकीय योजना, इंटरनेट, गुगल यांच्या सतत संपर्कात असल्यानं दत्ताभाऊंना नवनवी पिकं नवनवी यंत्रसामग्री, नव्या पद्धती कायमच खुणावीत असतात. लवकरच ते आंबा पिकासाठी अति घनदाट लागवड पद्धतीनं आमराई उभी करणार आहेत. संपूर्ण दोन शेततळ्यांमधील बांध काढून टाकून एकच मोठं 10 कोटी लीटर्स पाणी क्षमता असणारं शेततळं साकारलं जातंय. पाच एकरांवर नव्या मोसंबी – स्वीट ऑरेंज – बागेची उभारणी होतेय. पाच एकरांवर पॉलीहाऊस आकार घेत आहे. वेब बेस ऑटो कन्ट्रोल पाणी व खत देणारी ठिबक यंत्रणाही येतेय. शेतीतला उरलेला इंचन्इंच भागही ठिबकखाली भिजणार आहे. दत्ताभाऊंचा नंदादीप संपूर्ण नंदापूरला प्रगतीच्या मार्गावरील वैभवाचा मार्ग दाखवीत आहे.
विविध पुरस्कारांनी सन्मानित
कृषी क्षेत्रात नाविन्याचा ध्यास घेतलेल्या दत्ता भाऊना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सर्वोत्तन द्राक्ष उत्पादनासाठी २००६ मध्ये द्राक्ष प्रदर्शनात तर २००७ मध्ये वसंतराव नाईक स्मृती पुरस्कार, २०१६ मध्ये आयडीयल फार्मर अवार्ड तसेच भारतीय कृषी अनुसंसाधन परिषद ,पुणे यांनी दत्ताभाऊंना सन्मानित केले आहे. अशा या शेतकर्याला जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगावतर्फे सन्मानाचा 9 वा 2018 चा पद्मश्री डॉ.आप्पासाहेब पवार कृषी उच्चतंत्र पुरस्कार 15 फेब्रुवारी २०२० रोजी प्रदान करण्यात आला.
दत्तात्रय भानुदासराव चव्हाण
मु. नंदापूर ता.जि. जालना
९४२३७११४३१
दत्तात्रय भाऊनी शेतात केलेल्या आधुनिक सुधारना व कार्याला मानाचा मुजरा..