जगभरातील नागरिकांना मागील पाच वर्षापासून महापूर, अतिउष्ण लाटा, वादळ, चक्रीवादळे या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. मागील २५-३० वर्षात जगात सर्वात जास्त विध्वंस हा समुद्रातील चक्रीवादळामुळेच झाला आहे. प्रत्येक वेळी कोणतेतरी नवीन नावाचे वादळ येते आणि वित्त व जीवितहानी करते. काय आहेत ही वादळे तयार होण्यामागील कारणे? कसे ठरते त्याचे नाव? आजपर्यंत किती हानी या वादळांमुळे संपूर्ण जगात झाली आहे,भारतात यामुळे किती नुकसान झाले आहे. याचा घेतलेला हा मागोवा…
चक्रीवादळ हे नावच विध्वंसाचा पर्यायी शब्द म्हणून ठरू शकते इतके नुकसान यामुळे होते. सायक्लोन (चक्रीवादळ)या शब्दाची निर्मिती सायक्लोस या ग्रीक भाषेतील शब्दापासून झाली आहे. या शब्दाचा अर्थ सापाचे वेटोळे असा होतो. बंगालची खाडी व अरबी समुद्रामध्ये या वादळांचे सापाच्या वेटोळ्यासारखे चित्र दिसल्यामुळे हेन्री पेडिंगटन यांनी या वादळांना सायक्लोन असे नाव दिले. तेथून पुढे या चक्रीवादळांना ‘सायक्लोन’ असे संबोधले जाऊ लागले.
- चक्रीवादळे कशी तयार होतात व त्यांचे प्रकार.
जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर वादळ तयार होते व समुद्रात झाला तर चक्रीवादळ निर्माण होते. चक्रीवादळात हवा एका कमी दाब असणाऱ्या बिंदूच्या अवतीभोवती फार मोठ्या गतीने चक्राकार फिरत राहते. उत्तर गोलार्धात घड्याळाच्या उलट्या दिशेने व दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या सरळ दिशेने वाहणा-या जोराच्या वा-यामुळे हवेमध्ये भोवरा निर्माण होतो. त्याची पोकळी व तीव्रता वाढत जाते व वादळ तयार होते. अशा वादळांचा साधारण वेग प्रती तास ३० ते ५० किमी इतका असू शकतो. हे चक्रीवादळ हवेतल्या कमी दाबाच्या दिशेने नेहमी सरकत राहते. पण जेव्हा हे वादळ जमिनीला टेकते तेव्हा पाण्याची ऊर्जा न मिळाल्याने ते शांत होऊन जाते. पण तत्पूर्वी आपल्यासोबत आणलेल्या पाणी व पाण्याच्या वाफेला पावसाच्या रूपाने जमिनीवर सांडून जाते. समुद्राचे तापमान हे चक्रीवादळाच्या निर्मितीतील महत्त्वाचा घटक आहे. चक्रीवादळे समुद्रातील पाण्याच्या उष्ण भागातील गरम वाफेमुळे निर्माण होतात. समुद्रावर जिथे २६ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असते, तो भाग वादळांच्या निर्मितीसाठी पोषक ठरतो. बंगालच्या उपसागरात तापमान विसंगती जास्त असल्या कारणाने तिथे चक्रीवादळ निर्मितीचे प्रमाण अरबी समुद्राच्या तुलनेत जास्त आहे. म्हणजे एक प्रकारे वाढत असलेले जागतिक तापमान हे सुद्धा एकप्रकारे या वादळांना वाढण्यास हातभार लावत आहे.
चक्रीवादळात वाऱ्यांचा वेगामुळेच मुख्यतः नुकसान होते. या वाऱ्यांमध्ये असलेल्या बाष्पाच्या प्रमाणामुळे चक्रीवादळ जेथून प्रवास करते तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे पूरही येऊ शकतो. चक्रीवादळांना जगभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखण्यात येते. हिंदी महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना इंग्रजीत ‘सायक्लोन’, अटलांटिक महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना ‘हरिकेन’ तर पॅसिफिक महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळाला ‘टायफून’ असे संबोधण्यात येते.
युनिवर्सिटी ऑफ मेलबर्नच्या संशोधकांनी प्रा.इयान यंग यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी केलेल्या संशोधनानुसार आगामी काळात जर पृथ्वीचे वातावरण जर असेच वाढत राहिले तर भविष्यात चक्रीवादळे व त्याचा प्रकोप हा खूप वाढणार आहे असा अहवाल त्यांनी सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध केला आहे. हा संपूर्ण अहवाल १९८५ ते २०१८ पर्यंत ३१ उपग्रहाद्वारे पाठविलेल्या माहितीच्या आधारे व सुमारे चार अब्ज निरीक्षण याआधारे तयार केला आहे. त्यांच्या निरीक्षणानुसार मागील ३० वर्षात वादळी वाऱ्यांचे प्रमाण प्रती सेकंद १.५ मीटर वेगाने वाढले आहे तसेच लाटांची उंची ३० सेंटीमीटरपर्यंत वाढली आहे. अशाच प्रकारचा बदल जर सातत्याने चालू राहिला तर महापूर व सागरी किनाऱ्यांची धूप होऊन त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असा निष्कर्ष या अहवालात नमूद करण्यात आहे. अजून एका संशोधकांच्या मते वादळांना कारणीभूत हे पृथ्वीवरील प्रदुर्षण आहे. कारण प्रदुर्षणामुळे ओझोनच्या थराला मोठे छिद्र पडले असून त्यामुळे महासागरात हे बदल घडत आहेत.
चक्रीवादळाचे मापन कसे होते?
चक्रीवादळाच्या तीव्रतेचे मापन श्रेणींमध्ये करण्यात येते. चक्रीवादळातील वाऱ्यांच्या वेगावरुन त्याला श्रेणी देण्यात येते. हे वारे ताशी ९० कि.मी. ते कमाल ताशी २८० कि.मी. या वेगाने वाहतात. वाऱ्यांच्या वेगावरच त्याची विध्वंसक शक्ती अवलंबून असते. हा वेग विविध उपकरणे व उपग्रहानी पाठवलेली माहिती याआधारे मोजला जातो. वातावरणीय स्थिती, वाऱ्यांचा वेग (प्रतितास किमीमध्ये), कमी दाबाचा पट्टा, वातावरणशास्त्र(क्लायमॅटॉलॉजी) व रडार वापरून या चक्रीवादळांचे मोजमाप होते. तसेच खालीलप्रमाणे वाऱ्याच्या वेगानुसार होणाऱ्या नुकसानीचा अंदाज बांधता येतो.
श्रेणी-१ ताशी ९० ते १२४ किमी
श्रेणी-२ ताशी १२५ ते १६४ किमी
श्रेणी-३ ताशी १६५ ते २२४ किमी
श्रेणी-४ ताशी २२५ ते २७९ किमी
श्रेणी–५ ताशी २८० किमी किंवा त्यापेक्षा जास्त
चक्रीवादळाला समुद्राकडून मिळालेली ऊर्जा ही १०० हायड्रोजन बॉम्बपेक्षा अधिक असते. इतकी मोठी प्रचंड ऊर्जा धारण केलेले चक्रीवादळ जमिनीवर येताच तीन प्रकारे विनाश घडवते.
१) चक्रीवादळातून वाहणारे प्रचंड वेगाचे वारे वाटेत येणाऱ्या सर्व अडथळ्यांना जमीनदोस्त करायला सुरुवात करतात. लहान घरे, झोपड्यांची वाताहत होते, झाडे उन्मळून पडतात, विजेचे, दूरध्वनीचे खांब पडतात, घराची छप्परे उडून जातात, अनेकदा पक्क्या इमारतींच्या भिंतीही कोसळतात.
२)दुसरीकडे प्रचंड बाष्प धारण केलेले ढग मुसळधार कोसळत असतात. अशा ढगांकडून ५०० मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस एका दिवसात कोसळतो. यांमुळे अक्षरशः प्रलय येऊन वाटेत येणारे सर्व काही वाहून जाते.
३)चक्रीवादळाचा तिसरा फटका समुद्राच्या लाटांमार्फत बसतो. कमी दाब आणि वेगवान वाऱ्यांमुळे लँडफॉलदरम्यान समुद्र किनारपट्टीवर पाच मीटर उंचीच्या लाटा उसळू लागतात. यांमुळे सखल भागात किनाऱ्यापासून एक किलोमीटरपर्यंत पाणी आत येते. समुद्राच्या या पाण्याखाली शेती असल्यास शेकडो हेक्टरची जमीन काही काळासाठी नापीक होते.
वादळाच्या या तीनही परिणामांचा थेट फटका बसल्यामुळे माणसांची आणि जनावरांची जीवित हानी मोठ्या प्रमाणात होते. हजारो लोक बेघर होतात, वीज, पाणी, संपर्क यांच्या यंत्रणा कोलमडल्यामुळे अडचणी आणखी वाढतात. वादळानंतर निर्माण होणारे आरोग्य, पुनर्वस हे प्रश्न सोडवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहते. समुद्रावरून जमिनीवर येणारे एक वादळ लाखो लोकांवर थेट परिणाम करते आणि अब्जावधी रुपयांचे नुकसान घडवते.
लँडफॉल म्हणजे काय ?
वादळ अधिक काळ समुद्रावर राहिले तर दाब आणखी कमी होत जातो, वाऱ्यांचा वेग आणखी वाढतो. चक्रीवादळाचा घेरा शेकडो किलोमीटरपर्यंत पसरतो. पूर्णतः विकसित झालेल्या चक्रीवादळाचा घेरा ५०० ते २००० हजार किलोमीटरपर्यंत पसरलेला असतो. त्यावेळी केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी २०० किलोमीटरचा टप्पाही ओलांडतो. असे चक्रीवादळ दिवसाला ५०० ते ६०० किलोमीटर वेगाने जमिनीकडे सरकत असते. ज्या क्षणाला ते जमिनीला येउन धडकते, त्याला शास्त्रीय भाषेत चक्रीवादळांचा लँडफॉल म्हणतात
जगात चक्रीवादळाची नावे कशी ठेवली जातात.
जल,लैला,फोनी,निलोफर,ओखी,पायलीन,नर्गिस, हुडहुड,फयान, कॅटरिना, वरदा,वायू, यांसारख्या चक्रीवादळांची नावे ऐकलीच असतील. मात्र, ही नावे कशी ठरविली जातात, हा प्रश्न साहजिकपणे तुमच्या मनात असेल. तुम्हीसुद्धा या वादळांना नाव देऊ शकतात.
एखाद्या चक्रीवादळाचा वेग ३४ नॉटिकल मील प्रति तासांपेक्षा जास्त असेल तर त्याला विशेष नाव देणे आवश्यक असते. चक्रीवादळांचे नाव ठेवण्याची सुरुवात अटलांटिक क्षेत्रात १९५३ मध्ये एका करारानुसार झाली. ही पद्धत ऑस्ट्रेलियातील हवामानतज्ज्ञ यांनी सुरु केली. यासाठी मियामी येथील राष्ट्रीय हरिकेन सेंटरने पुढाकार घेतला होता. हिंदी महासागराच्या लगत असणाऱ्या बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड या आठ देशांकडून आगामी चक्रीवादळांसाठी आठ नावे मागवली जातात. संबंधित देशांच्या भाषेत असणाऱ्या या नावांमधून निसर्गातील विविध घटक किंवा संस्कृतीची झलक दिसत असते. चक्रीवादळांना दिलेले नाव छोटे असावे, उच्चार सोपा असावा आणि ते सहजतेने लोकांमध्ये प्रचलित होणारे असावे अशी अपेक्षा असते. एकापाठोपाठ निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना बांगलादेशपासून थायलंडपर्यंत आठ देशांनी सुचवलेली नावे ओळीने देण्यात येतात. पहिल्या आठ नावांचा संच संपला कि पुढील आठ नावांचा संच वापरण्यात येतो. अमेरिकेत पहिल्यांदा येणाऱ्या वादळाचे नाव पुरुषाच्या नावावरून आणि दुसऱ्यांदा येणाऱ्या वादळाचे नाव स्त्रीच्या नावावरून ठेवले जाते. इंग्रजी वर्णमालेनुसार सदस्य देशांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून वादळाच्या नावाचा क्रम निश्चित केला जातो. सर्वांत आधी बांगलादेश, भारत, मालदीव आणि यानंतर म्यानमारचे नाव येते. या देशांमध्ये वादळ पोहोचताच यादीतील वेगवेगळी सोपी नावे दिली जातात. यामुळे चक्रीवादळाची ओळख पटविणे सोपे जाते आणि बचाव कार्य सुरळीतपणे राबविण्यासही या नावांची मदत होते. नोव्हेंबर २०१७ मध्ये आलेल्या चक्रीवादळाचे नाव बांगलादेशने ‘ओखी’ असे ठेवले होते. या शब्दाचा बांगला भाषेतील अर्थ ‘डोळा’ असा होतो. यानंतरच्या चक्रीवादळाचे नाव भारताने ‘सागर’ असे ठेवले. आतापर्यंत चक्रीवादळाची ६४ नावे सूचीबद्ध करण्यात आली आहेत. चक्रीवादळांना हवामान खात्याच्या सांकेतिक आणि शास्त्रीय नावांनी ओळखण्याऐवजी त्यांना त्या त्या देशातील वैशिष्टपूर्ण नावे देण्याचा प्रघात १९५० च्या दरम्यान सुरू झाला. आधी गंमतीने महिलांची नावे या चक्रीवादळांना दिली जात.
भारतीय उपखंडात थडकणाऱ्या चक्रीवादळासाठी रिजनल स्पेशलाइज्ड मेटिअरोलॉजिकल सेंटर, दिल्ली ही संस्था नावे ठरवते. चक्रीवादळाची नावे ठरवताना पुढील निकष पाळले जातात. नावे छोटी आणि लक्षवेधी असावीत. नाव सामाजिक-धार्मिक तेढ निर्माण करणारे नसावे. उपखंडातील त्या-त्या देशाची ओळख किंवा वैशिष्ट्यपूर्ण बाब त्यात असावी. काही दिवसांपूर्वी धडकलेल्या वादळाला ‘हुदहुद’ हे नाव ओमानने सुचवलेले होते. तर, अरबी समुद्रात तयार झालेल्या वादळाला ‘निलोफर’ हे नाव पाकिस्तानने सुचवले होते. या पुढे येणाऱ्या चक्रीवादळांना पुढील नावे देण्यात येतील. प्रिया (श्रीलंका), गोहमेन (थायलंड), चोपोला (बांग्लादेश), मेघ (भारत), क्यांत (म्यानमार). आतापर्यंत दिलेली काही निवडक नावे अग्नी, हिबारू, प्यार, बाज, फानूस, माला, मुक्दा, फोनी ,निलोफर, हुदहुद, ओखी, सागर,वायू इ.
चक्रीवादळाला तुम्हीही सुचवू शकता नाव
सामान्य नागरिकसुद्धा चक्रीवादळाला नाव सुचवू शकता. तशी सुविधा भारतीय हवामान खात्याने दिली आहे. तुम्ही डायरेक्टर जनरल ऑफ मेटेरोलॉजी, इंडिया मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट, मौसम विभाग, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३ या पत्त्यावर चक्रीवादळासाठी सुचलेले नाव पाठवू शकता. यातून काही निवडक नावे ठरविली जातात.
आशियाखंडातीलतील सर्वात विध्वंसकारी १० चक्रीवादळे
१) ग्रेट बोहा चक्रीवादळ, बांगलादेश वर्ष 1970 मृत्यूची संख्या अंदाजे ५५०,००० पर्यंत आहे.
२) हुगली नदी चक्रीवादळ, भारत आणि बांगलादेश, वर्ष 1737. मृत्यूची संख्या: 350,000.
३) हैफोंग टायफून, व्हिएतनाम, वर्ष 1881. मृत्यूची संख्या: 300,000.
४) कोरींगा चक्रीवादळ, भारत, वर्ष १८३९ मृत्यूची संख्या: 300,000.
५) बॅकरगंज चक्रीवादळ, बांगलादेश, वर्ष १८५४ . मृत्यूची संख्या: २००,०००.
६) ग्रेट बॅकरगंज चक्रीवादळ, बांगलादेश, वर्ष १८७६ मृत्यूची संख्या: २००,०००.
७) चटगांव चक्रीवादळ, बांगलादेश, वर्ष 1897. मृत्यूची संख्या: 175,000.
८) सुपर टायफून नीना, चीन, वर्ष 1975. मृत्यूची संख्या: 171,000.
९) चक्रीवादळ 02-बी, बांगलादेश, वर्ष 1991 मृत्यूची संख्या: 140,000.
१०)ग्रेट बॉम्बे चक्रवात, भारत वर्ष 1882. मृत्यूची संख्या: 100,000.
चौकट
मे २००८ मध्ये आलेले नर्गिस हे चक्रीवादळ अत्यंत विनाशकारी आणि प्राणघातक म्हणून म्यानमारच्या इतिहासामध्ये नोंदविले गेले आहे. शुक्रवार 2 मे 2008 रोजी म्यानमारमध्ये या चक्रीवादळाने 40 किलोमीटर किनाऱ्यावर धडक दिली. या दुर्घटनेमुळे 138,373 लोकांचा मृत्यू झाला. बोगलेत एकट्या लबत्ता टाउनशिपमध्ये 80,000 लोक मरण पावले आहेत. सुमारे 55,000 लोक बेपत्ता होते. (१०यूएस अब्ज डॉलर्स) च्या नुकसानीचे अंदाज होते.
जगात आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या ३५ सर्वात विध्वंसक चक्रीवादळांपैकी २६ चक्रीवादळे बंगालच्या उपसागरात तयार झालेली आहेत. दोन दशकांत चक्रीवादळाशी संबंधित मृत्युंपैकीमध्ये ४२ % मृत्यू एकट्या बांगलादेशात झाले आहेत. त्यात भारताचा वाटा २७ % आहे.
भारतातील काही विध्वंसक चक्रीवादळे व नुकसान आकडेवारी
राज्य | महिना व वर्ष | नुकसान |
प.बंगाल | Oct., 1847 | 75,000 लोक आणि 6,000 जनावरे मृत्युमुखी. मोठ्या प्रमाणात दळणवळण विस्कळीत व वित्तहानी |
प.बंगाल | Oct., 1874 | 80,000 लोक मृत्युमुखी. मोठ्या प्रमाणात दळणवळण विस्कळीत व वित्तहानी |
आंध्रप्रदेश | Nov., 1946 | 750 लोक and 30,000 जनावरे मृत्युमुखी . वित्तहानी व रस्त्याचे नुकसान |
तामिळनाडू | Dec., 1972 | 80 लोक आणि 150 जनावरे मृत्युमुखी दळणवळण विस्कळीत. |
प.बंगाल | Sept., 1976 | 10 लोक आणि 40,000 जनावरे मृत्युमुखी . वित्तहानी व रस्त्याचे नुकसान, दळणवळण विस्कळीत |
आंध्रप्रदेश | Nov., 1977 | 8547 लोक आणि 40,000 जनावरे मृत्युमुखी. वित्तहानी, दळणवळण विस्कळीत |
तामिळनाडू | May, 1979 | 700 लोक आणि 3,00,000 जनावरे मृत्युमुखी. दळणवळण विस्कळीत |
Orissa | Sept., 1985 | 84 लोक आणि 2,600 जनावरे मृत्युमुखी,जमिनीचे नुकसान |
आंध्रप्रदेश | Nov., 1987 | 50 लोक आणि 25,800 जनावरे मृत्युमुखी 8,400 घरे नष्ट,रस्ते आणि दळणवळण विस्कळीत |
ओरिसा | June,1989 | 61 लोक आणि 27,000 जनावरे मृत्युमुखी 145,000 घरे नष्ट दळणवळण विस्कळीत |
आंध्रप्रदेश | May, 1990 | 928 लोक मृत्युमुखी, 14,000 घरे नष्ट. |
तामिळनाडू | Nov., 1991 | 185 लोक आणि 540 जनावरे मृत्युमुखी ,रस्ते व Rs. 300 crore ची वित्तहानी |
प.बंगाल | April, 1993 | 100 च्यावर मृत्युमुखी, वित्तहानी, दळणवळण विस्कळीत |
प.बंगाल | Nov., 1994 | २६ गावातील एक हजारावर घरे नष्ट, दळणवळण प्रभावित, तलाव नष्ट झाल्याने मासेमारी प्रभावित |
आंध्रप्रदेश | Oct., 1996 | 1,057 मृत्युमुखी, 647,000 घरे नष्ट, दळणवळण प्रभावित |
गुजरात | June, 1998 | 1,261 नागरिक जखमी, 2.57 घराचे नुकसान |
ओरिसा | Oct., 1999 | 10,086 नागरिक जखमी, 21.6 घराचे नुकसान |
भारतीय उपखंडातील सन १८९१ ते २००२ च्या कालावधीत भारतातील किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आलेले चक्रीवादळ खालीलप्रमाणे आहेत.(कंसात वादळांची संख्या)
पश्चिम किनारपट्टी
केरळ (३)- मलप्पुरम, कन्नूर, कोझिकोड वादळ संख्या प्रत्येकी १
कर्नाटक- (२)दक्षिण कन्नड,उत्तर कन्नड प्रत्येकी १
महाराष्ट्र-(१३) सिंधुदुर्ग(३), रत्नागिरी(३),ठाणे(४),मुंबई(३)
गोवा(२)-गोवा(२)
गुजरात(२८)- सुरत(१) कैरा(१) भावनगर(४) अमरेली(४) जुनागढ(७) जामनगर(६) कच्छ(५)
पूर्व किनारपट्टी
पश्चिम बंगाल(६९) – 24 परगणा (उत्तर आणि दक्षिण).(३५) मिदनापूर(३४)
ओडिसा(९८) – कटक (३२)पुरी(१९) गंजम(१५)
आंध्र प्रदेश(७९) – श्रीकाकुलम(१४) विशाखापट्टणम(९) पूर्व गोदावरी(८) पश्चिम
गोदावरी(५)कृष्णा(१५) गुंटूर(५) प्रकाशम(७) नेल्लोर(१६)
तामिळनाडू(५४) – चेन्नई(१८) कुडलोर(७) साउथारकोट(५) तंजावर(१२)पुडुकोकोटल(५) रामनाथपुरम(३)
तिरुनेलवेली(२) कन्याकुमारी(२) पांडिचेरी(के.प्र.)(८) – पांडिचेरी (८)
दरवर्षी सर्वाधिक वादळाचा धोका असलेले देश
इतर देशांच्या तुलनेत खालील देशांना वादळांचा सर्वात जास्त संख्येने सामना करावा लागतो.
चीन, फिलीपिन्स, जपान, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स (हवाईसह), ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, मेडागास्कर, क्यूबा, अमेरिका
१९७० पासून १२७ हून अधिक टायफून वादळे चीनचे आर्थिक व जीवित हानी करून गेलेत
२०१४ मधील टायफून रमासुन वादळाने चीनची सर्वाधिक वित्त व जीवितहानी केली. चीनच्या दक्षिणेकडील भागात याचा वेग 160 मी. प्रति.तास इतका होता.
चीन नंतर अमेरिकेत सर्वात जास्त वादळे येतात. जून ते नोव्हेंबर हा काळ अमेरिकेचा वादळ सीझन असतो. 1935 मधील श्रमिक दिवस या नावाचे वादळ फ्लोरिडा राज्यात 185 मील प्रति तास वेगाने येऊन खूप नुकसान करून गेले. 1970 पासून 63 हून अधिक वादळांनी देशात भरपूर हानी केली आहे. परंतु देशाची अर्थव्यवस्था, प्रगत तंत्रज्ञान इतक मजबूत आहे की, प्रत्येक विध्वंसकारी वादळांना देश समर्थपणे तोंड देत लगेच उभा राहतो. अमेरिकेप्रमाणेच क्युबाचाही तोच वादळाचा सीझन आहे. पण अमेरिकेच्या उलट, क्यूबाची अर्थव्यवस्था चक्रीवादळाने पुनउभारणीसाठी संघर्ष करते. 1924 च्या क्यूबा नामक चक्रीवादळाने देशात खूप नुकसान केले होते. क्यूबा चक्रीवादळ 165 मील प्रति तासपर्यंत पोहोचल होत.
जगातील सर्वात जास्त वेग असलेली वादळे
नॅन्सी वादळ- १९६१ साली जपानच्या तटावर आलेले हे वादळ ७ सप्टेंबर १९६१ पासून बनण्यास सुरुवात झाली, या वादळाने दहा दिवस थैमान घालते होते. याचा वेग सर्वात जास्त ३४५ किमी प्रती तास होता. जो इतिहासातील सर्वात जास्त वेग होता. नॅन्सी वादळामुळे जपानमध्ये १९१ लोकांचा मृत्यू झाला.
वायलेट वादळ- हे वादळ १९६१ मध्ये जपानच्या तटावर ३३० किमी प्रती तास या वेगाने धडकले होते. यामध्ये फार मोठी जीवितहानी जरी झाली नाही तरी मोठ्या प्रमाणात वित्तीय नुकसान झाले होते.
आइडा वादळ-आइडा वादळ सप्टेंबर १९५८ मध्ये १८५ किमी प्रती तास या वेगाने जपानच्या किनाऱ्यावर धडकले आणि त्यानंतर त्याचा वेग ताशी ३२५ किलोमीटर वाढला. या वादळामुळे जपानमध्ये एकूण १२६९ लोकांचा मृत्यू झाला, तसेच जवळपास ३२५ कोटींचे नुकसान झाले होते.
सॅली वादळ-सॅली हे वादळ ३ सप्टेंबर १९६४ मध्ये पोनोपेच्या जवळ तयार झाले आणि पश्चिमेकडे सरकले. चार दिवसांनी या वादळाचा वेग ताशी ३१४ किमी एवढा झाला. हे वादळ ९ सप्टेंबरला फिलिपिन्सला पोहचल्यानंतर आणि त्यानंतर १८५ किमी प्रती तास या वेगाने १० सप्टेंबरला चीनला पोहोचले. हे वादळ त्यावेळेच्या प्रचंड वादळांपैकी एक होते.
टीप वादळ-१२ ऑक्टोबर १९७९ मध्ये जपानला या वादळाचा तडाखा बसला. या वादळाचा वेग ताशी ३०५ किमी एवढा होता. या वादळामुळे जवळपास १०० लोकांचा मृत्यू झाला. तसेच, कृषी आणि मासेमारीचा उद्योगाचे करोडोंचे नुकसान झाले.
मोरा वादळ- मोरा वादळ हे ३० ऑगस्ट १९६६ मध्ये तयार झाले होते आणि ५ सप्टेंबर १९६६ ला ओकिनावा बेटाच्या जवळ धडकले होते. या वादळाचा वेग २८० किमी प्रती तास एवढा होता. यामुळे घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, पण एक गोष्ट जमेची होती कि या वादळामुळे कोणत्याही माणसाला आपला जीव गमवावा लागला नाही. याचा वेग इतका प्रचंड होता कि ७ सप्टेंबर १९६६ ला हे वादळ उत्तर – पूर्व चीनला होते आणि ९ सप्टेंबरला १९६६ मध्ये कोरियाला पोहचले.
कॅटरीना वादळ-कॅटरीना हे ऑगस्ट २००५ मध्ये अमेरिकेच्या लुसियाना आणि मिसिसिपीमध्ये आले होते. याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली. २३ ऑगस्ट २००५ ला हे वादळ ताशी २८० किमी या वेगाने तयार झाले होते आणि हा वेग आठ दिवसांपर्यंत टिकून राहिले. कॅटरीना वादळामुळे एकूण १८३३ लोकांचा मृत्यू झाला, तसेच एकूण १०८ अब्ज अमेरिकेन डॉलर्सच्या संपत्तीचे नुकसान झाले.
अँड्रू वादळ-अँड्रू वादळ हे १६ ऑगस्ट १९९२ ला तयार होण्यास सुरुवात झाली होती आणि २८ ऑगस्ट १९९२ ला फ्लोरिडा, दक्षिण – पश्चिम लुसियानामध्ये धडकले. या वादळाचा वेग ताशी २८० किमी होता. या वादळामुळे एकूण ६५ लोकांचा मृत्यू झाला, तसेच २६.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स संपत्तीचे नुकसान झाले.
आधुनिक तंत्रज्ञान आणि चक्रीवादळाचा अंदाज
कृत्रिम उपग्रह, डॉप्लर रडार, वेदर स्टेशन यांचे जाळे आणि शास्त्रज्ञांनी त्या निरीक्षणांच्या आधारावर विकसित केलेली अंदाज वर्तवणारी मॉडेल. या मॉडेलच्या आधारे चक्रीवादळाच्या स्वरुपात होणारे बदल, त्याचा समुद्रावरील बदलत जाणारा मार्ग आणि जमिनीवर प्रवेश करताच त्यात होऊ शकणारे बदल आधीच अचूक वर्तवण्यात येतात. यामुळे पूर्वीच्या काळी होणाऱ्या नुकसानच्या तुलनेत या तंत्रज्ञानामुळे सद्यस्थितीत नुकसान कमी करता येते.
भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे तीन ते चार दिवस आधीच चक्रीवादळाच्या मार्गाचा अंदाज देण्यात येत असल्यामुळे किनारपट्टीच्या भागात प्रतिबंधक उपाय योजण्यास प्रशासनाला वेळ मिळतो. या अंदाजांमुळेही देशभरातून संबंधित विभागांच्या सर्व यंत्रणा आपत्कालीन स्थितीशी मुकाबला करण्यासाठी त्या त्या भागांत रवाना करणे शक्य होते. वरीलप्रमाणे अंदाज वर्तवल्यामुळे वित्तीय नुकसान जर होत असले तरी मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळणे शक्य झाले आहे.
परादीपचे चक्रीवादळ
१९९९मध्ये भारतातील ओडीसा हे राज्य सर्वात विध्वंसक चक्रीवादळाला सामोरे गेले. या वादळाला १९९९चे चक्रीवादळ किंवा ‘सायक्लोन 05-बी’ किंवा ‘परादीपचे चक्रीवादळ’ असेही संबोधण्यात येते. भारतीय हवामानखात्याच्या परिभाषेत हे ‘सुपर सायक्लोनिक स्टॉर्म’ होते. २५ ऑक्टोबर १९९९ला मलय द्वीपकल्पाच्या आसपास तयार झालेले हे चक्रीवादळ २९ ऑक्टोबरला भुवनेश्वरजवळ धडकले. सरकारी नोंदींनुसार या चक्रीवादळात आणि नंतर झालेल्या मुसळधार पावसात सुमारे १० हजार व्यक्तींनी प्राण गमावला होता.
चक्रीवादळाची चाहूल
पक्ष्यांना चक्रीवादळाची चाहूल ते वादळ सुमारे 900 किमी अंतरावर असतानाच लागत असल्याचे अमेरिकी संशोधकांना आढळले आहे. पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी करण्यात आलेल्या संशोधनामध्ये या संदर्भातील पुरावे मिळाले आहेत.काही पशू, पक्षी आणि प्राण्याच्या संवेदना अधिक तीक्ष्ण असतात. त्यांना निसर्गात होणाऱ्या बदलांची चाहूल खूप आधी लागते. संशोधनामध्ये भूकंपाची चाहूल कुत्र्यांना प्रत्यक्ष भूभागाला धक्का बसण्यापूर्वी पाच मिनिटे आधी होते. अमेरिकी पैदास केंद्रामध्ये पक्ष्यांच्या स्थलांतरासंदर्भात अभ्यास करण्यात येत होता. त्या वेळी पक्ष्यांच्या वर्तनविषयक नोंदी ठेवण्यात येत होत्या. त्या वेळी पक्ष्यांना महाभयानक वादळांमुळे सुमारे 900 किलोमीटर अंतरावरून आपली दिशा बदलल्याचे दिसून आले. अशी माहिती मिन्निसोटा विद्यापीठातील संशोधक डेव्हिड अँडरसन यांनी दिली