सचिन कावडे ,नांदेड
मराठवाडा म्हटल की, डोळ्यासमोर येतो दुष्काळ, पाण्याच्या एका हंड्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन रानोरान वणवण फिरणाऱ्या महिलांचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे रहाते; मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या चक्रात बदलत होत असल्याने कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ अश्या विपरीत स्थितीत शेतकरी शेती कसत आहे. त्यामुळे पारंपारिक शेती संकटात आली असून शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन प्रयोग करणे गरजेचे बनले आहे. नांदेड येथील नाळेश्वर या गावातील संभाजी मैठे यांनी मागील काही वर्षांपासून पारंपरिक शेतीला बाजूला सारुन फुलशेती सुरू केली आहे. फुलशेतीतून मैठे हे वर्षाकाठी दीड लाखांचा निव्वळ नफा मिळवित आहेत.
नांदेड शहराच्या दक्षिण मतदारसंघातील नाळेश्वर हे गाव शहरापासून १० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. या गावातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेतीच आहे. या छोट्याशा गावातील लोक आनंदाने आणि एकमेकांसोबत एकोप्याने मिळून मिसळून राहतात. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती करत असतांना आपल्या शेतीला काही जोडधंदा म्हणून काही नव-नवीन प्रयोग करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. काळाची हीच पाऊले ओळखत संभाजी यांनी फुलशेतीची वाट धरली आहे. गावापासून शहर जवळ असल्याने फुलांना उपलब्ध बाजारपेठचा फायदा घेत त्यांनी फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक शेती करणारे नाळेश्वर येथील संभाजी नामदेवराव मैठे यांनी आपल्या वडिलोपार्जित असलेल्या अडीच एकर शेतीत फुलशेती करण्यास सुरुवात केली आहे. १२ वीपर्यंतच शिक्षण झालेले संभाजी हे लहानपणापासून वडिलांना शेती कामात मदत करत असत. लहानपणापासूनच शेतीची आवड असल्याने शेतीतीच करिअर करायचे ठरवून पुढील शिक्षण त्यांनी थांबवून पुर्ण वेळ शेती कामात स्वतःला झोकून दिले.
अल्पभूधारक असूनही प्रयोगशील शेती
सन २००२-०३ मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ बचत गटाच्या माध्यमातून मिळालेल्या मार्गदर्शनातून संभाजी मैठे यांनी पारंपरिक शेतीला बाजूला सारत फुलशेती करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे या बचत गटाच्या अध्यक्षा त्यांच्या पत्नी सुरेखा मैठे ह्या आहेत. संभाजी यांनी आपल्या अडीच एकर शेतीपैकी एका एकरमध्ये झेंडूची तर आणखी एका एकरमध्ये गलंडा फुलांची रोपे लागवड केली. सुरुवातीला फुल शेतीला अपेक्षित यश साधता आले नसले तरी संभाजी यांनी फुलशेतीत माघार घेतली नाही. निराश न होता त्यांनी प्रयोगशीलतेत सातत्य ठेवले. त्यांनी दोन एकर क्षेत्रावर फुलशेती तर अर्धा एकर क्षेत्रावर ऊस लागवड केला आहे.
सामन्यात अल्पभूधारक शेतकरी नवीन प्रयोग करण्यास धजावत नाहीत परंतु प्रयोगशील संभाजी यांनी कमी क्षेत्र असूनही फुलशेतीचा प्रयोग यशस्वीपणे केला आहे.
निशिगंध, गुलाब, झेंडू, गलांडावर भर
संभाजी मैठे यांनी पहिल्यांदा दोन एकरमध्ये झेंडू आणि गलांडा फुलांच्या रोपांची लागवड केली होती. रोपे खरेदीसह जमिनीची मशागत, खत, औषध फवारणी व फुलांची काढणी आदी कामासाठी मैठे यांना जवळपास १ लाख ७० हजार रुपये खर्च करावा लागला. ९० दिवसानंतर फुले काढणीला सुरवात होते. नोव्हेंबर २०२० मध्ये मैठे यांनी २० गुंठ्यातील जमिनीमध्ये शेणखत टाकून जमिनीची नांगरणी करून ८ बाय ४ वर एक हजार गुलाबांच्या रोपांची लागवड करण्यात आली होती. यामध्ये अंतरपीक म्हणून एक हजार कलकत्ता झेंडूची रोपे लावण्यात आली होती. ९० दिवसानंतर फुले काढणीस येतात. मे महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून दररोज ४ ते ५ किलो गुलाब आणि झेंडू काढून विक्री करण्यात आला. त्यांच्या शेतीत निशिगंध, गुलाब, झेंडू, गलांडा या फुलावर विशेष भर असतो.
दीड लाखांपर्यंत निव्वळ नफा
गुलाब ५० रुपये तर झेंडू १० रुपये किलो दराने विक्री करण्यात आला. या महिन्याभरात जवळपास ४० ते ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गुलाब हा पुढील वर्षभर तर झेंडू हा दोन महिन्यापर्यंत काढता येतो. महिन्यापर्यंत दररोज फुले काढून बाजारात विक्रीसाठी नेण्यात येतात. या कालावधीत २० ते २५ क्विंटल झेंडूच्या फुलांची २० रुपये किला दराने विक्री करुन १ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. तर ६० ते ७० हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला. तसेच २० क्विंटल गलांडा १० रुपये दराने विक्री करुन १ लाख २० हजार रुपये उत्पन्न मिळवून ५० ते ६० हजार रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. इतर सर्व फुल विक्रीतून एकूण ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून १ लाख ३० हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.
२० वर्षापासून फुलशेतीत सातत्य
सन २०००-०३ मध्ये फुल शेतीतून मिळाणारे उत्पन्न हे रोजच्या रोज असल्याने संभाजी मैठे यांनी तेंव्हापासून ते आजपर्यंत पारंपरिक शेतीला बगल देत फुलशेती सुरु ठेवली आहे. यातून त्यांना रोजच्या रोज पैसे मिळत असल्याने त्यांची आर्थिक अडचण दूर झाल्याचे संभाजी मैठे हे सांगतात. दरम्यान यावर्षी जानेवारी २०२१ मध्ये मैठे यांनी २० गुंठ्यातील जमिनीमध्ये शेणखत टाकून जमिनीची नांगरणी करून बेड तयार करून निशिगंधाच्या कंदाचे १२ पाॅकीट लागवड करण्यात आले. यादरम्यान दोन, तीन दिवसआड (ठिबक सिंचनाद्वारे) पाणी देणे, महिन्यातून एक, दोनवेळा बुरशीनाशक फवारणी करण्यात येते. ६ महिन्यानंतर फुलांचा बहर गच्च भरुन येतो; परंतु साधारण ९० दिवसानंतर फुले काढणीस येतात. रोजच्या रोज तीन, चार किलो फुले नांदेड येथील हिंगोलीगेट उड्डाणपुलाच्या ब्रीजखाली भरणाऱ्या फुल बाजारात विक्रीसाठी नेण्यात येतो. निशिगंधाच्या १ किलो फुलांना ८० ते ९० रुपयांचा भाव मिळतो. व्यापाऱ्यांच्या मागणीप्रमाणे फुलांचा दर कधी कमी तर कधी यापेक्षाही जास्त मिळतो. तरीही त्यांनी मागील २० वर्षांपासून फुल शेती व्यवसाय सातत्य ठेवले आहे.
पत्नीची लाख मोलाची मदत
संभाजी मैठे यांच्या पत्नी सुरेखा ह्या महिला आर्थिक विकास महामंडळ बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या बचत गटाच्या सर्व महिला मिळून फुलशेतीचा व्यवसाय करत असत. २००२-०३ मध्ये पत्नी सुरेखा, बचत गटाच्या महिला व कृषी विभागाच्या आत्माकडून मिळालेल्या मार्गदर्शनाखाली संभाजी यांनी आपल्या आपल्या अडीच एकर शेतीमध्ये फुलांची शेती करण्यास सुरुवात केली. या कामासाठी पत्नी सुरेखा ह्या पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. या दाम्पत्यांना दोन मुले व एक मुलगी असून एक मुलगा एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत आहे. एक मुलगा इयत्ता दहावीत तर मुलगी बीफार्मसीचे शिक्षण घेत आहे. त्यांचे दोन्ही मुल व मुलगी फुलशेतीत त्यांना मदत करतात.
जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी यांच्या भेटी
संभाजी मैठे हे मागील १९ वर्षापासून फुल शेतीचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या फुल शेतीला तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व जिल्हा कृषी अधिकारी चलवदे यांनी भेट देऊन त्यांच्या फुलशेतीचे कौतुक केले. तसेच दरवर्षी कृषी विभागाच्या आत्माकडून दोन ते तीनवेळा त्यांच्या शेतात शेती कार्यशाळा घेण्यात येते.
फुलांसाठी वर्षभर हमीभाव मिळावा
फुलांची असो की कोणत्याही पिकांची विक्री यामध्ये शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे कधीच भाव मिळत नाही. शेतकरी वर्षभर राबराबून पिकांचे उत्पादन घेतो; परंतु मालाला किती भाव मिळावा हे त्यांच्या हाती नसते. फुलांची विक्री करताना व्यापाऱ्यांच्या बोलीप्रमाणे फुलांची विक्री करावी लागते. फुलांना कधी चांगला भाव मिळतो तर कधी मुद्दलही निघणे अवघड होते. त्यामुळे फुलांना वर्षभर हमीभाव मिळावा. फुलशेती करण्यासाठी इच्छूक असणाऱ्या शेतकऱ्यांना मी मोफत मार्गदर्शन करत आहे.
संभाजी नामदेवराव मैठे
९७३०५४७८२२