कापूस हे आपल्या महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक आहे. जगात कापूस पिकाखाली 336 लाख हेक्टर क्षेत्र असून उत्पादकता 782 किलो रुई/हेक्टरी असुन भारतामध्ये 122 लाख हेक्टर क्षेत्र असून उत्पादकता 524 किलो रुई/हे. आहे. इतर राज्यांमध्ये कापूस पिकाचे 42 लाख हेक्टर क्षेत्र असून उत्पादकता 344 किलो रुई/हेक्टर आहे. महाराष्ट्र मध्ये कापूस पिकाची उत्पादकता खूपच कमी आहे. उत्पादकता कमी असण्याची प्रमुख कारणे म्हणजे राज्यातील 94 टक्के कापूस कोरडवाहू असून निव्वळ पावसावर अवलंबून आहे. फक्त 6 टक्के कापूस क्षेत्र बागायती आहे. सिंचनाची अनुपलब्धता, पावसावर अवलंबून असल्याने पेरणी योग्य वेळी होत नाही, संतुलित पोषण तसेच किडी-रोगांचा प्रादुर्भाव व्यवस्थापनातील उणीवा यामुळे कापूस पिकाचे उत्पादन कमी मिळते.
राज्यातील शेतकऱ्यांना जैन इरिगेशनने ठिंबक सिंचन पद्धतीवर कापूस लागवडीचे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले. ठिंबक सिंचन पद्धतीवर कापूस पिकाचे उत्पादन वाढते हे लक्षात आल्याने शेतकरी कापूस पिकासाठी ठिंबक सिंचन तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. राज्यात चार 4.10 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकासाठी ठिंबक सिंचन तंत्राचा वापर होत आहे. जैन इरिगेशनने ग्रामपातळीवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रगत तंत्राचा प्रसार केल्याने ही फलश्रुती झाली. शेतकऱ्यांनी जैन ठिंबकवर एकरी 1.5 क्विंटल ते 49.5050 क्विंटल विक्रमी उत्पादन मिळविले आहे. जैन ठिंबकवर कापूस लागवड म्हणजे समृद्धी हे समीकरण तयार झाले. जे शेतकरी पावसाच्या पाण्यावर लागवड करतात त्यांचे एकरी उत्पादन 3 ते 4 क्विंटल आहे. मोकाट सिंचन पद्धतीवर कापूस लावणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पादन 7 ते 8 क्विंटल आहे. जैन ठिंबकवर कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे. जैन ठिंबकवर कापूस लागवडीची उत्पादकता जागतिक कापूस उत्पादनापेक्षा अधिक आहे.
श्री संतोष जामसिंग पाटील रा. खडके खुर्द, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव येथील तरुण कापूस उत्पादक शेतकरी असून “बापू” ह्या टोपण नावाने परिचित आहे. बापूंचे शिक्षण बारावी झाले आहे बापूकडे 1.50 हेक्टर( पावणे चार एकर) जमिनीचे क्षेत्र आहे. बापूंचे संपूर्ण क्षेत्र बागायती आहे. सिंचनासाठी एक विहीर असून त्यावर 3 एच.पी.चा पंप बसविला आहे. जमीन मध्यम ते भारी स्वरूपाची आहे. त्यांच्या सर्व क्षेत्रासाठी जैन ठिंबक सिंचन संचाची उभारणी केली असून, कापूस पिकासाठी वापर करीत आहेत. बापू फक्त कापूस पिकाची शेती करतो इतर दुसऱ्या कोणत्याही पिकाची लागवड करीत नाही. बापूच्या खडके खुर्द गावात सुद्धा कापूस हे प्रमुख पीक आहे. अर्थातच राज्यात कापूस पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात कापूस मोठ्या प्रमाणावर घेतला जातो.
बापू आपल्या कापूस शेतीमध्ये विविध प्रयोग करीत असतो. कापूस उत्पादकांसाठी नवीन काही करता येईल का याचा ध्यास असतो, बापूने त्याच्या 2.75 एकर क्षेत्रामध्ये कापूस 4’X2′ अंतरावर लावला. त्यामध्ये भक्ती,जादू,मनी मेकर या जातीचे बियाणे वापरले. कापूस लागवड 2 जून २०१८ ला केली. उरलेल्या एक एकर क्षेत्रामध्ये कापूस 4’X4′ या अंतरावर लागवड केली. पारंपारिक पद्धतीत शेतकऱ्यांचा चौफुली व जास्त अंतरावर कापूस लागवडीकडे कल असतो. परंतु जास्त अंतरावर कापूस लागवड केल्यास उत्पादन कमी मिळते हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना फक्त कापसाची झाडे उंच व पसरलेली बघून आनंद व समाधान वाटते. 4’X4′ अंतरासाठी बापूने राशी 659 या जातीची 2 जून 2018 ला लागवड केली. दोन्ही कापूस लागवडीसाठी जैन ठिंबक सिंचनाचा वापर केला कापूस लागवडीपूर्वी जमिनीची चांगली पूर्वमशागत करून जमीन भुसभुशीत करून घेतली. याकरता नांगरणी करून रोटाव्हेटरचा उपयोग केला. ठिंबक सिंचनामध्ये जैन इरिगेशनच्या जैन टर्बो एक्सेल 16 मिमी. इनलाईन नळीचा उपयोग केला. दोन ड्रीपर मधील अंतर दोन फूट आणि ड्रीपरचा प्रवाह 4 लिटर प्रति तासचा वापर केला. ठिंबक सिंचनाच्या नळ्या पसरवून घेतल्या ठिंबक सिंचन 15 मिनिटे सुरू करून बशीच्या आकाराचा ओलावा निर्माण केला आणि निवड केलेल्या अंतरावर बियाण्याची टोकण पद्धतीने लागवड केली. लागवडी वेळी रासायनिक खतांचा बेसल डोस दिला. त्यात 10:26:26, 12:32:16 प्लॅाटोचा वापर केला. युरिया, फॉस्फरिक अॅसिड आणि पांढरा पोटॅशचा ठिंबक मधून व्हेचुरीद्वारे वापर केला. 18:18:10 चा ही जमिनीतून वापर केला. ठिंबकवर लागवड केल्याने कोठेही गॅप (खाडे) पडले नाही. ठिंबकवर कापूस बियाण्याची उगवण अतिशय चांगली झाली. कापसाच्या झाडाजवळचे तण मजुराद्वारे 2 निंदण्या करून काढून घेतले. दोन ओळींच्या मधल्या जागेत वखराच्या चार वेळा पाळ्या देऊन शेत तणविरहित ठेवले.
कापूस पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घेतली. दोन पावसामध्ये खंड पडल्यावर ठिंबकने पाणी दिले. कापूस पिकांमधील पाणी व खत व्यवस्थापन ठिंबक सिंचनाद्वारे केले. जमिनीत फक्त वाफसा अवस्थेत राहील एवढाच कालावधी ठिंबकने पाणी दिले. सुक्ष्म अन्नद्रव्य व संजीवकाची फवारणी केली. कापूस पिकावरील रस शोषण करणारे किडी, पाणी खाणारी अळी, गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन, रोगनियंत्रणाच्या करिता कीटकनाशके व बुरशीनाशकांच्या 5 फवारण्या केल्या निंबोळी अर्क, पिवळे चिकट सापळे, कामगंध सापळे याचाही वापर केला. गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून डोम कळ्या तोडून नष्ट केल्या. ठिंबक सिंचनाद्वारे पाणी आणि रासायनिक खताचे व्यवस्थापन केल्याने पिकाची वाढ जोमदार झाली. पात्या फुलांची गळ कमी झाली कापसाची बोंडे मोठे व वजनदार मिळाले.
कापसाच्या एकूण 5 वेचण्या झाल्या. बापूला 4’X2′ अंतरावर लागवड केलेल्या कापूस पिकाचे एकरी 20.250 क्विंटल उत्पादन मिळाले तर ज्या ठिकाणी 4’X4′ अंतरावर कापूस लागवड केली होती तेथे एकरी 13 क्विंटल कापूस मिळाला. म्हणून बापुची कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विनंती केली की, त्यांनी कापूस पिकाची लागवड 4’X2′ किंवा 4.5’X1.5′ किंवा 5’X1.25′ किंवा 5’x1.5′ अंतरावर कापूस पिकाची जात बघून लागवड करावी. सरळ वाढणारी जात लावायची असल्यास दोन झाडांमधील अंतर 50 ते 60 सेंमी अंतर ठेवावे.
कापूस पिकाचे अर्थशास्त्र
बापूने 4’X2′ अंतरावर लागवड केलेला कापूसाकरिता 37254 रु.खर्च आला आणि जैन ठिंबक वर लागवड केलेल्या कापूस पिकाचे एकरी 20.250 क्विंटल उत्पादन मिळाले. कापूस पिकास सरासरी 5800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. 20 क्विंटल कापसापासून 116000 रु.ढोबळ उत्पन्न मिळाले. त्यातून 37254 रु. खर्च वजा केल्यावर एकरी 78764 रु. निव्वळ नफा मिळाला.
बापूने 4’X4′ अंतरावर केलेल्या कापूस लागवडीतून एकरी 13 क्विंटल उत्पादन मिळाले. त्यासाठी सुरुवातीला ते कापूस वेचणी पर्यंत एकरी 31850 रुपये खर्च आला. कापसाची व्यापाऱ्यास ५८००/- रुपये प्रति क्विंटल दराने विक्री केली. त्यापासून ढोबळ उत्पन्न एकरी 75400 रु. मिळाले. यातून संपूर्ण खर्च 31850 रु.वजा केल्यास 43550/- रु. एकरी निव्वळ नफा मिळाला.
बापूने दोन्ही कापूस पिकाचे क्षेत्र ठिंबक सिंचनावर लागवड केली होती. 4’X2′ अंतरावर कापूस लागवड केल्यावर एकरी 78746/- रुपये निव्वळ नफा मिळाला. तर 4’X4′ अंतरावर कापूस लागवड केल्यावर एकरी 43550/- रुपये निव्वळ नफा मिळाला.
तरी शेतकरी बंधुंनी कापूस पिकाची लागवड जर करायचे असेल, तर ठिंबक सिंचन पद्धतीवर करावी व उत्पादन एकरी 20 क्विंटल मिळेल असे व्यवस्थापन करावे. लागवड करतांना लागवडीचे अंतर 4’X2″, 4.5’X1.5′, 4.5’X1.25′, 5’X1.25′, 5’X1.5′ असावे. जैन ठिंबक ची गुणवत्ता अतिशय चांगली असून मी १० वर्षांपासून वापर करीत आहे. ठिंबक सिंचन संच उत्तम काम करीत आहे. कोणतीच अडचण नाही ठिंबक असताना खते हाताने देऊ नये ,व्हेंचुरी मधून द्यावे त्यामुळे उत्पादन वाढते.
बी.डी.जडे वरिष्ठ कृषी विज्ञान शास्त्रज्ञ
जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड
मोबाईल नंबर 94 22 77 49 81