मुंबई – भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी पावसाचा दुसरा अंदाज जारी करताना, जून महिन्यात केवळ ९०% पाऊस सांगितला आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये गंभीर पूर येण्याची शक्यताही वर्तवली आहे. दुसरीकडे, मान्सूनवर एल-निनोची गडद छाया असल्याने, जूनच्या सुरुवातीपासून अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसह आठ राज्यांमध्ये उष्णतेचे विक्रम मोडले जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील काही भागालाही तडाखा बसण्याची भीती आयएमडी महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने जून महिन्यात देशाच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कमाल आणि रात्रीचे किमान तापमान दोन्ही सरासरीपेक्षा जास्त राहतील. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये जून महिन्यात सामान्यपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा येतील. महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्येही उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
पॅसिफिक महासागरातील परिस्थिती ‘एल-निनो’च्या दिशेने बदलतेय!
समुद्राच्या स्थितीबद्दल, डॉ. महापात्रा यांनी स्पष्ट केले की, पॅसिफिक महासागरातील तटस्थ ईएसओ परिस्थिती आता एल-निनोच्या दिशेने बदलत आहे. जूनपर्यंत एल-निनोची घटना घडण्याची शक्यता ८२ टक्क्यांपर्यंत वाढेल आणि जुलै व ऑगस्टपर्यंत ती ९० टक्क्यांपेक्षा जास्त होऊ शकते. सामान्यतः, जेव्हा एल निनो सक्रिय असतो तेव्हा भारतीय मान्सून कमकुवत होतो. याउलट, हिंद महासागरीय द्विध्रुव संपूर्ण मान्सून हंगामात तटस्थ राहतो. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे मे महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा ४ टक्क्यांनी जास्त पाऊस नोंदवला गेला आहे आणि २७ मे पर्यंतचा एकूण मोसमी पाऊसही सरासरीपेक्षा १ टक्क्याने जास्त झाला आहे.
पॅसिफिक महासागरात विक्रमी तापमानवाढ
दुसरीकडे, जागतिक हवामानात एक चिंताजनक बदल घडत आहे, ज्यामध्ये जानेवारी २०२६ पासून मध्य पॅसिफिक महासागराचे सरासरी तापमान १° सेल्सियसपेक्षा जास्त वाढले आहे, जो या शतकातील सर्वात वेगवान तापमानवाढीचा कल आहे. महासागराचा निनो ३.४ निर्देशांक मे २०२४ नंतर प्रथमच +०.५° वर पोहोचला आहे, जो एल निनो तटस्थ टप्प्यातून एल निनो सक्रीय टप्प्यात होणाऱ्या संक्रमणाचे संकेत देत आहे.
१९५० पासून सहा वेळा ‘सुपर एल-निनो’
ऐतिहासिकदृष्ट्या, १९५० पासून आतापर्यंत केवळ सहा वेळा ‘सुपर एल-निनो’ची घटना घडली आहे, ज्यामुळे भारतातील मान्सूनवर गंभीर परिणाम झाला आहे. उदाहरणार्थ, १९७२ च्या सर्वात तीव्र सुपर एल-निनोमुळे, समुद्राच्या तापमानात २.३° वाढ झाली होती, अपेक्षित पावसाच्या केवळ ७६% पाऊस पडला, आणि १९८२ च्या मध्यम एल निनोमुळे सुद्धा देशाला तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला, ज्यामुळे आगामी मान्सूनबद्दल चिंता वाढली आहे.
७५ वर्षांतील एल निनोचे गणित
वर्ष | एल निनो परिस्थिती | मान्सून आगमन | पाऊस (%)
१९५१ मध्यम | ३१ मे | ८१.३%
१९५३ कमजोर | ७ जून | ११०%
१९५७ मजबूत | १ जून | ९७.६%
१९६५ मजबूत | २६ मे | ८१.८%
१९६९ कमजोर | १७ मे | १००%
१९७२ मजबूत | १८ जून | ७६.१%
१९८७ मजबूत | २ जून | ८०.६%
१९९७ मजबूत | ९ जून | १०२%
२००४ कमजोर | ४ जून | ८६.२%
२००९ कमजोर | २३ मे | ७८.२%
२०१५ मजबूत | ५ जून | ८६.२%
२०१८ कमजोर | २९ मे | ९०.६%
२०२३ मजबूत | ८ जून | ९४.४%
















