पश्चिम आशियामध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खतांच्या पुरवठा साखळीवर मोठी टांगती तलवार आहे. याचा परिणाम आगामी काळात खतांच्या उपलब्धतेवर आणि किंमतींवर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ‘युरिया’ला सक्षम पर्याय शोधण्याचे आणि खतांचा संतुलित वापर करण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांनी खतांच्या उपलब्धतेबाबत धास्ती न घेता, आधुनिक आणि नैसर्गिक पर्यायांकडे वळणे काळाची गरज बनले आहे.
युद्धामुळे पुरवठा साखळीत अडथळा निर्माण झालेला आहे. भारताला लागणाऱ्या खतांपैकी मोठा हिस्सा पश्चिम आशियातील देशांमधून आयात केला जातो. युद्धामुळे वाहतूक आणि उत्पादनावर परिणाम होत आहे. हे युरियावरील अवलंबित्व जागतिक अशांततेच्या काळात अडचण निर्माण करते. भारतीय शेतीमध्ये नत्राचा (नायट्रोजन) पुरवठा करण्यासाठी युरियाचा वापर सर्वाधिक होतो. मात्र, आयातीत घट झाल्यास त्याचा तुटवडा भासू शकतो.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पर्याय आणि मार्गदर्शक सूचना
पारंपारिक युरियाला पर्याय म्हणून खालील बाबींचा वापर करणे फायदेशीर ठरेल –
१. नॅनो युरीयाचा वापर: पारंपारिक दाणेदार युरियाच्या गोणीऐवजी ‘नॅनो युरीया’च्या बाटलीचा वापर करा. ही खते पिकांच्या पानांवर फवारली जात असल्याने ती अधिक प्रभावी ठरतात आणि वाया जात नाहीत.
२. हिरवळीची खते: जमिनीत नत्राचे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी धेंचा किंवा ताग यांसारखी हिरवळीची पिके घेऊन ती जमिनीत गाडावीत. यामुळे जमिनीचा पोतही सुधारतो.
३. सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर: शेणखत, कंपोस्ट खत आणि गांडूळ खताचा जास्तीत जास्त वापर करा. ॲझोटोबॅक्टर सारख्या जिवाणू खतांचा वापर केल्यास हवेतील नत्र शोषून घेण्यास मदत होते, ज्यामुळे रासायनिक युरियाची गरज कमी होते.
४. माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन: आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून घ्या. जमिनीला जितकी गरज आहे तितकीच आणि तीच खते द्या. यामुळे अनावश्यक खर्च वाचेल आणि जमिनीचे आरोग्यही टिकेल.
५. ठिबक सिंचनातून खते (फर्टीगेशन): शक्य असल्यास विद्राव्य खतांचा वापर ठिबकद्वारे करा. यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो आणि कमी मात्रेत जास्त परिणाम मिळतो.
कृषि विभागाचा सल्ला
शेतकऱ्यांनी खतांची साठेबाजी करू नये. बाजारात उपलब्ध असलेल्या नॅनो युरीया आणि इतर पर्यायी खतांची माहिती घेण्यासाठी आपल्या भागातील कृषि सहाय्यक किंवा तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘स्मार्ट’ शेतीचा अवलंब करणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.














