शेती कामात सातत्य आणि जिद्द ठेवून कष्ट केले की, काळ्या मातीतून मोती उगवतात हे खोटं नाहीच. याच अनूभवाने परभणी जिल्ह्यातील लोहगाव येथील सिताराम लक्ष्मणराव देशमुख (वय ५१ ) या पाचवी पास अल्पभुधारक शेतक-याने आपल्या शेतातील सेंद्रीय अंजीर बाग आणि गांडूळ खत निर्मीती तसेच गांडूळ बिज वाटप करुन हजारो शेतक-यांच्या शेतीत गांडूळ खत निर्मीती प्रकल्प उभारणी मध्ये सातत्य ठेवून सूक्ष्म सिंचन पद्धतीने शेती मोत्यासारखी फुलवून सेंद्रीय शेतीत नावलौकीक केले आहे.
लोहगाव हे गाव परभणीपासून दक्षिण दिशेला कृषी विद्यापीठ – सायाळ खटींग मार्गावर १२ कि मी अंतरावर आहे. गाव परिसरातील काही जमिनीस पैठण येथील जायकवाडी धरणाच्या कालव्याचे पाणी येत असल्यामुळे येथे बारमाही बागायती पिके शेतकरी घेतात. जिथे कालव्याचे पाणी जात नाही तेथील शेतक-यांनी आपल्या शेतीत विहीर विंधन विहीर खोदून पाण्याची सोय केली आहे. लोहगाव येथील शेतकरी खरिपात कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडिद, हळद, भाजीपाला तर रब्बीत ज्वारी, ऊस, केळी, भुईमुग, हळद, भाजीपाला, हरबरा, गहू ही पिके घेतात. फळबागाचे प्रमाण अतिशय कमीच आहे. याच लोहगाव शिवारात आपल्या अडीच एकर शेतीतच फार्म हाउस करुन सिताराम लक्ष्मणराव देशमुख हे शेतकरी राहतात. त्यांनी शेतीत विहीर विंधन विहीर खोदून पाण्याची सोय करून सिंचन पद्धतीने शेती करून उत्पन्नात लक्षणीय वाढ केली आहे.
सालगडी ते बागायतदार: पाण्याची किमया
सुरुवातीला अनियंत्रित पाऊसकाळामुळे शेती फारसी पिकतच नसे. त्यामुळे सिताराम देशमुख यांनी अनेक वर्ष दुस-याच्या शेतावर सालगडी म्हणून काम केले. बराशीने वळणे खोदली. अशी अनेक बिगारी स्वरुपाचे कामं करीत खुप कष्ट घेत कुटुंबाचा चरितार्थ चालवला. अशातच आपण आता बागायती शेती करावी या हेतूने शेतात घामाच्या दामातून सिंचनाची साधने निर्माण करुन म्हशी गायी ही पशूधनेही जमवून ख-या अर्थानं बागायती शेतीकडे वळाले ते आज घडीला त्यातून कृषी क्षेत्रात खुप मोठी उत्तूंग भरारी घेतली आहे.
सिंचन सुविधेमुळे बारमाही भाजीपाला उत्पादन शक्य
शेतीत पाण्याची सोय केल्यानंतर त्यांनी भाजीपाला या बारमाही विविध वाणांच्या पिकाची हंगामानूसार लागवड करण्यास सुरुवात केली. त्यात वांगी, टोमॅटो, मिरची, कांदा, पालेभाज्या तर उन्हाळ्यात टरबूज खरबूज ह्या पिकांचा आर्वाजून समावेश असतो. सिंचन सुविधेमुळे बारमाही भाजीपाला उत्पादन शक्य झाले असून , बारमाही भाजीपाला पिकाच्या उत्पादनातून त्यांना दररोजच चांगले अर्थाजन मिळते.
गांडूळ खतनिर्मीती आणि प्रसाराचे मोठे कार्य
शेती करीत असतांनाच वर्ष २०१० ला त्यांचा परभणी तालूका कृषी कार्यालयातील मंडळ अधिकारी जयवंत कौसडीकर, कृषि साह्यक मस्के, राऊत यांच्याशी संपर्क आला. त्यांनी देशमुख यांना गांडूळ खत निर्मीती व शेतीत गांडूळ खताचे महत्व पटवून दिले. २०१० ला अनुदानावर १० X ४ फूट अकाराचे दोन हौद गांडूळ खत निर्मीतीसाठी बांधून घेतले. त्यांना एका गांडूळ युनीटपासून सुरुवातीला ७ क्विंट्ल गांडूळ खत म्हणजे दोन युनीट मध्ये १४ ते १५ क्विंट्ल गांडूळ खत निर्मीती ४ चार महिन्याच्या कालावधीत होते. वर्षाकाठी दोन युनीट मध्ये २०० किलो गांडूळ खत तयार होते. एका गांडूळापासून ७६ गांडूळाची उत्पती होते. हे खत ते आपल्या शेती पिकाला वापरतात. परंतू हे खत संपूर्ण शेतीला अपूर्ण पडत असल्याने निर्मीती पध्दत बदलून त्यात विस्तार केला.
कडूलिंबाच्या झाडाखाली गांडूळ खत निर्मीती
यानंतर त्यांनी गांडूळ खताची अधिक निर्मीती करण्यासाठी एक शक्कल लढवली. आता हौदात खत निर्मीती करणे बंद करुन एका दाट सावलीच्या कडू लिंबाच्या झाडाखाली शेतातीलच कुजलेला पाला पाचाळा मोकळ्याच जमीनीवर सावलीत टाकला त्यावर चार ट्रॅक्टर ट्रॉली ओले शेण टाकून खत निर्मिती सुरु केली.
कडूलिंबाच्या झाडाखालच्या खत निर्मीतीत पहिल्या संपूर्ण प्रयोगात ४० क्विंट्ल गांडूळ खत निर्मीती झाली. त्यातून ४०० ते ५०० जिवंत गांडूळ बिजाची निर्मीती झाली. त्या नंतर दूस-या या दोन्ही झाडाखालच्या खत निर्मीती प्रकल्पातून जवळपास ५० क्विंट्ल गांडूळ खत निर्मीती झाली. हे गांडूळ खत ते आपल्या शेती पिकाला वापरुन शिल्लक खत ईतर शेतक-यांना ८०० रुपये प्रती क्विंट्ल दराने विक्री करतात. नवीन गांडूळ खत निर्मीती करण्यासाठी सुरुवातीला २०० तर आता ४०० रु प्रति किलो दराने जिवंत गांडूळ बिजाची विक्री इतर शेतकऱ्यांना करतात. गांडूळ खत निर्मीतीची संपूर्ण ईत्यंभूत माहीती शेतावर जावून ते मोफत देतात. त्यांनी आतापर्यंत १०४० शेतक-यांना गांडूळ बिज देवून त्यांच्या शेतीत गांडूळ खत निर्मीती प्रकल्प चालू करुन दिले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील असंख्य शेतक-यांना गांडूळ बिज वाटप करुन तेथे खत निर्मीती युनीट चालू करुन दिले आहेत. तसेच आता जालना जिल्ह्यात काम चालू आहे. शिवाय परभणी जिल्हा आणि मराठवाडा विभागातील अनेक शेतक-यांना मार्गदर्शन करुन गांडूळ खत निर्मीती युनीट चालू करुन देत त्यांना सातत्याने सल्ला देणे चालूच असते.
खत व गांडूळ बीज विक्रीतील उत्पन्न
मागील १० वर्षाच्या कालावधीत जवळपास १० हजार किलो गांडूळ बीज हे हजारो शेतक-यांना देवून तेथे खत निर्मीती प्रकल्प उभे केले आहेत. खत विक्रीतून त्यांना आजतागायत उत्पादन खर्च जाता ३ लाख रुपये तर गांडूळ बीज विक्रीतून खर्च वगळता १० लाख रुपये म्हणजे खत आणि गांडूळ बीज विक्रीतून दहा वर्षांत एकूण १३ लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. अजून हे कार्य महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या सहकार्याने चालूच आहे.
ठीबकवर अंजीर लागवड व सेंद्रीय फळ उत्पादन
गांडूळ खत निर्मीतीचे काम चालू असतानाच त्यांनी आपल्या शेतीत २०१४ ला एक एकर क्षेत्रात दिनकर वाणाच्या २५६ अंजीर रोपांची १२ बाय १२ फूट अकाराने ठीबकवर लागवड केली आहे. लागवड पूर्व मे मध्ये २ बाय २ फुटाचा खड्डा खोदून त्यात काळी माती आणि गांडूळ खत टाकून खड्डे भरुन घेतले. त्यानंतर आॅगष्ट महिन्यात त्या खड्यात अंजीर रोपांची लागवड करुन घेतली.
खत,पाणी व रोग व्यवस्थापन
अंजीर बागेच्या सिंचनासाठी एका नामांकित कंपनीचे १६ एम एम साईजचे ठीबक संच बसवले असून ४ दिवसाआड २ तास कृषी पंप चालवून ठीबकने पाणी दिले जाते. तसेच सप्टेंबर मध्ये फांद्यांची छाटणी केल्यानंतर संपूर्ण बागेला ४० दिवसाच्या फरकाने तिन टप्यात २५ क्विंट्ल गांडूळ खताची मात्रा दिली जाते तर बुरशी, डाउनी, भुरी किडरोग नियंत्रणासाठी निंबोळी अर्क, जिवामृत, गोमूत्र याची फवारणी केली जाते. फळावरील रसशोषण करणा-या किडींच्या नियंत्रणाकरीता बागेत पिवळे चिकट ट्रॅप सापळे लावले जातात. लागवडीनंतर पहिल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झाडांच्या उप फांद्याची छाटणी करण्यात आली व मुळ फांदीचे तिन फुट लांबीवर शेंडा काढतात. फांदी छाटणी नंतर ४० दिवसाला फळधारणा सुरु होते.
बागेवर नेट जाळीचे झाकण
वर्ष २०१८-१९ ला परिपक्व फळे पक्षी खाऊ नये म्हणून बागेच्या चोहू बाजूने सिमेंटचे पोल आणून रोवून त्याला लोखंडी तार ओढून बांधला आणि खालून वरुन नेट जाळे बसवून घेतले.यामुळे पक्षी फळे खाण्यापासून सरंक्षण होते. एकूण २५६ अंजीर फळ झाडापैकी दरवर्षी बागेच्या किना-वरील ओळीतील फळे लगडलेल्या काही झाडावर नेट जाळे न झाकता ती मोकळी ठेवली जातात, जेणेकरुन त्या झाडावरील फळे पक्षी खातात व इतर बागेचे रक्षण होते.
फळांचे उत्पादन
लागवडीनंतर अंजीर झाडांना पहिल्याच वर्षी दहा महिन्याला फळधारणेस सुरुवात झाली. पहिल्या वर्षी ६०० किलो अंजीर उत्पादन झाले त्याची परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ गेटसमोर बसून विक्री (व होम डिलेवरी) केल्याने व सेंद्रीय फळ असल्यामुळे प्रती किलो १०० रु दर मिळाला. दूस-या वर्षी २०१६ ला कोरडा दुष्काळ असल्याने कमी प्रमाणात टिकून राहीलेली संपूर्ण फळे पक्षांनाच खावू दिली. त्यावर्षी दुष्काळावर मात करण्यासाठी बोअरवेल पाडला. बोअर मोटरी करीता एक लाख रु खर्च केले. त्यानंतर तिस-या वर्षी ३५ क्विंट्ल फळांचे उत्पादन झाले. त्यास फळांच्या प्रतवारीनुसार ६० ते १०० रुपया पर्यंत किलोला दर मिळाला. यंदा २०२० ला आता पर्यंत १० क्विंट्ल उत्पादन निघाले असून टप्या टप्या काढणी चालू आहे. एकूण ३८ क्विंटल फळे निघणार आहेत. दर ७० ते १०० रु किलो मिळत आहे. म्हणजे अंजीर फळांच्या विक्रीतून दर वर्षी उत्पादन खर्च ५० हजार रुपये वगळता तीन वर्षाच्या हंगामात १५०००० दिड लाख रु उत्पन्न मिळाले आहे.
आजतागायत गांडूळ खत व गांडूळ बीज तसेच सेंद्रीय अंजीर विक्रीतून चौदा लाख ५० हजार रुपये उत्पन्न लाभल्याचा त्यांचा हिशोब आहे असे. या उत्पन्नातून त्यांनी मुलांचे शिक्षण, शेतात फार्म हाउस बांधकाम ठीबक पाईप विहीर बोअर गांडूळ खत निर्मीती प्रकल्प अशी कामे केली असून राज्यभर गांडूळ खत निर्मीतीचे कार्य चालू असल्याने त्यांचे कृषी व ग्रामविकास क्षेत्रातून नेहमी कौतूक होत असते.
अंजीर रोपवाटीका
देशमुख यांनी आपल्या शेतीत अंजीर वृक्षाच्या मातृवृक्षावरच्या फांदीवरच कलम करुन त्यास पांढ-या मुळ्या वाढल्या की ती कलम झाडावरुन कट करुन नंतर रोपे तयार केली जातात. सिध्दीविनायक नावाने अंजीर रोपवाटीका तयार करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी बाळासाहेब शिंदे यांचे सहकार्य मिळाले.
शेतीकामात कुटूंबीय सदस्यांची मदत
भाजीपाला, अंजीर बाग,गांडूळ खत शेती कामात पत्नी सौ वनमाला, मुलगा महेश,मुलगी कु रेणूका यांची मदत मिळते.मुलगा १२ वी वर्गात शिकत असून तो शिकत शिकत सकाळ सायंकाळ शेती काम करतो आणि मुलगी कु रेणूका ही बिएसस्सी कृषिचे शिक्षण घेत असून ती पण शेतावर भेट देण्यासाठी आलेल्या शेतक-यांना अंजीर बाग व गांडूळ खत निर्मीती विषयी मार्गदर्शन करते.
मिळालेले पुरस्कार
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्या बद्दल त्यांना वर्ष ५ जाने २०१८ रोजी काळेवाडी, पूणे येथील अंजीर परिषदेत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते अंजीर रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर २०१९ ला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणचा पुरस्कार वनामकृवीचे कुलगुरु डॉ अशोक चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला आणि परभणी येथील कृषी संजीवनी कृषि प्रर्दशनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आयोजक आनंद भरोसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आत्माचे के आर श्राफ, प्र संचालक चपळे साहेब, जिल्हाधिकारी महिवाल,एस एस संधू,पोकराचे रस्तोगी, माजी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शेतीला भेट दिली. प्रगतिशील शेतकरी कांतराव देशमुख, मेघा सावंत, दादा पवार, मयांक गांधी, पंडित थोरात सह आदी जणांनी खुप मोठे मोलाचे मार्गदर्शन करुन दुष्काळी कठीण परिस्थीत असताना हातभार लावले.
संपर्क शेतकरी
सिताराम लक्ष्मणराव देशमुख
मु पो लोहगाव फार्म हाउस ता जि परभणी.
मो ९९२२१७९३४०.
प्रतिक्रिया
संतुलित पाणी हा शेतीचा कणा
अतिशय प्रतिकूल परिस्थीतीत शेती करीत असतांना घरच्या शेतीसह दुस-याच्या शेतावर रोजंदारीवर काम करुन दिवसं काढले. पाणी नियोजनाचे महत्व कळल्यामुळे बागायती शेतीकडे वळलो आणि उत्पन्नात चमत्कारिक बदल झाले हे करीत असतानाच कृषी विभागाने गांडूळ खत व गांडूळ बीज निर्मीतीबाबत मार्गदर्शन केले.अंजीर हे स्पर्धेचे पिक नसून आरोग्यवर्धक आहे. शिवाय ते सेंद्रिय उत्पादीत करीत असल्यामुळे कृषि अधिकारी, डाॅक्टर, वकील,शिक्षक, शेतकरी हे शेतावर येवून ताजे फळे खरेदी करतात. त्यामुळे विक्रीची समस्या नाही. माझ्या शेतीत गांडूळ खत निर्मीती व सेंद्रीय अंजीर यामुळे माझे सर्व अर्थकारण सकारात्मक झाले आहे. संतुलित पाणी हा शेतीचा कणा असून त्याने आमच्या जीवनात अमुलाग्र बदल केला आहे.भविष्यात मोठ्या संख्येने अन्य शेतक-यांच्या शेतात सेंद्रीय पध्दतीने अंजीर बाग लागवड करण्यास परावृत करणे व गांडूळ खत निर्मीती तसेच दुष्काळात हतबल झालेल्या शेतक-यांना मोफत गांडूळ बीज देवून त्यांच्या शेतीत गांडूळ खत निर्मीती करण्याचे उदिष्ट आहे.
सिताराम लक्ष्मणराव देशमुख
लोहगाव फार्म हाउस परभणी.