महाराष्ट्रात आजच्या घडीला ठिबक सिंचन संचाचे विक्रमी उत्पादन व विक्री करणारी कंपनी म्हणजे श्री साईराम प्लास्टिक अॅण्ड इरिगेशन..! “शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्याच्या मुलाने सुरु केलेली कंपनी” अशी बिरुदावली मिरवणाऱ्या कंपनीचे संचालक श्रीराम पाटील यांनी त्यांचा आजवरचा जीवनप्रवास उलगडला. निम्मित होते अॅग्रोवर्ल्डच्या जळगाव कार्यालयातील “भेट-कृषीऋषींची” या कार्यक्रमाचे..! या कार्यक्रमात झालेल्या चर्चासत्रादरम्यान त्यांनी हा प्रवास उलगडला. त्यांचा हा प्रवास त्यांच्याच शब्दात खास अॅग्रोवर्ल्डच्या वाचकांसाठी…
जळगांव जिल्ह्यातील सूर्यकन्या तापी नदीच्या किनारी वसलेल्या रावेर तालुक्यातील निमखेड येथील सामान्य शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. गावाकडे शिक्षण घेण्यासाठी कित्येक मैल पायी चालत जावे लागायचे. पावसाळ्यात तर प्रचंड हाल व्हायचे. घरच्या नाजूक परीस्थितीमुळे प्राथमिक शिक्षण हे आजोळी म्हणजे मामांच्या गावी रणगाव येथे झाले. ७ वी पर्यंत इंग्रजीचे शून्य ज्ञान होते. १० वि मध्ये ४८% मार्क मिळाले आणि वैद्यकीय क्षेत्रात जाण्याच्या दृष्टीने सावद्याच्या कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत खूप प्रयत्न करून प्रवेश मिळविला. प्रवेश झाला पण पुढील कॉलेजमधील वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱ्या उपकरणासाठी पैसे नसल्याने पुन्हा अडचणी आल्या. ट्रॅक्टर चालक म्हणून काम करणारे वडिल देखील आर्थिकदृष्टया सक्षम नव्हते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे स्वप्न भंगले, असे सांगताना श्री. पाटील काहीसे भावुक झाले.
कॉलेज शिक्षण अर्ध्यातून सोडल्यावर ही स्थिती पुन्हा येऊ नये यासाठी स्वतः काही उद्योग करण्याचे ठरविले आणि त्यादृष्टीने मोटार रिवाईडिंगचे काम सुरु केलं. सुरुवातीपासूनच कोणत्याही कामात १०० % योगदानाची सवय असल्याने १२-१२ तास मोटार रिवाईडिंगचे काम केले. नंतर काही दिवसांनी माझ्यात असलेला मेकॅनिक जागा झाला आणि त्याक्षेत्रात असलेल्या संधीच्या शोधात १९८८ ला जळगावला ये-जा करून सहा महिन्यात मेकॅनिकलचे धडे गिरविले. नंतर १२ हजार रु खर्च करून रावेरला गॅरेज व ऑटोपार्टस सुरु केले. तोपर्यंत कधीही जळगाव जिल्ह्याच्या बाहेर गेलेलो नव्हतो. मात्र ऑटोपार्टसच्या खरेदीसाठी थेट दिल्ली गाठली. तिथे जाऊन समान खरेदी केले आणि खऱ्या अर्थाने माझ्यात नवीन जोश आला. याचवेळी वयाच्या २० व्या वर्षी लग्न झाले. दरम्यान जळगांवमधील श्री. पगारिया यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्या माध्यमातून बजाज M-80 या गाडीची एजन्सी घेतली. पुढे १९९४ मध्ये रावेरला शोरूम सुरु केले.
कोणताही धार्मिक गुरु नाही पण…
मी आजवर आयुष्यात कोणताही धार्मिक गुरु केला नाही. पण माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून, मित्रांकडून खूप काही शिकलो आणि आजही शिकतच आहे. १९९७ साली माझ्या एका मित्रासोबत त्याच्या मामाच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्याच्या मामांनी सहज सल्ला दिला की, तुम्ही रावेर मध्ये काय करताय..? जळगावमध्ये जाऊन एखादा उद्योग का नाही सुरु करत..? सहज दिलेला हा सल्ला आम्ही गांभीर्याने घेतला आणि त्या मामांच्या सल्ल्यानुसार आज हा उद्योग उभा राहिला. सुरुवातीला मित्राची साथ घेत इरिगेशनचा व्यवसाय सुरु केला. तोपर्यंत मला तर या प्लास्टिकच्या व्यवसायातील P सुद्धा माहित नव्हता, तरीही धाडस केले. आमचे युनिट रावेरजवळील स्मशानभूमी जवळ होते. अनेकदा एकट्याने १२-१२ तास काम करत मशीनची संपूर्ण सेटिंग जाणून घेतली. या सर्व कामांमुळे विविध मशीन तयार करणे व दुरुस्ती करणे इतपर्यंत आमचे ज्ञान वाढले. त्यामुळे आत्मविश्वास आला की आपण हा उद्योग करू शकतो. कालांतराने या व्यवसायात असलेला भागीदार मित्र काही कारणास्तव बाजूला झाला आणि पूर्णपणे मी स्वतःला यात झोकून दिले. सोबतीला लहान भाऊ राजू सुद्धा आला होता. त्याचीही मदत झाली.
कंपनीचे एक हजारांवर डीलर
माझे शिक्षण जरी फक्त १२ वी असले तरी व्यवसायात आधुनिकीकरण करण्यावर माझा कायम जोर आहे. कालानुरूप आपल्याला आपल्यात सतत बदल करत राहावा लागेल तरच आपण या स्पर्धेत टिकाव धरू शकू, हा विचार कायम मनात असतो. याच बदलाच्या व गुणवत्तेच्या जोरावर कंपनीची वाटचाल अल्पावधीतच ISI कडे झाली. सध्या कंपनीचे प्रामुख्याने सहा राज्यात काम सुरू असून एका हजारांवर डीलर आहेत. व्यवसाय सुरु करतांना साधारणपणे आपण किती कमवणार याचे टार्गेट ठेवतो. पण, मी १५ वर्षांपूर्वी भारत सरकारला दोन कोटी रु कर (TAX) भरणार, असे उद्दिष्ट ठेवले होते. मी २००५ पासून पूर्ण वेळ फक्त कंपनीचे काम पाहू लागलो. तेव्हापासून २५ ते ५० लाख असलेली उलाढाल वाढत वाढत आज रोजी ९५ कोटीपर्यंत पोहोचलीय.
—————-
२५० रु ची सायकल
लहानपणी वडिलांनी २५० रु ची सायकल दिली होती त्यावेळी इतका आनंद झाला होता, तो आनंद आज कशातही मिळत नाही. तापीकाठी गाव असल्याने मनसोक्त पोहण्याची हौस भागायची. तापीमाईत पोहण्याने जणू मरणाची भीतीच संपवली आहे. लहानलहान गोष्टीतही आम्ही आनंदी असायचो. पण आज त्याकाळी मिळणारा आनंद कुठेच नाही. आज जरी माझ्याकडे मोठ्या अलिशान गाड्या असल्या तरी २५० रु ची सायकल मिळाल्याच्या आनंदा इतका आनंद कशातच नाही. हे सर्व सांगताना श्री. पाटील स्वतः भूतकाळाशी एकरूप होऊन भारावल्यासारखे बोलत होते.
————————
पहिला परदेश दौरा
जळगाव सोडून फक्त एकवेळ दिल्लीला गेलो होतो. त्यामुळे परदेशात जाण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही २००७ साली मित्रांसोबत व्यवसायाच्या निम्मिताने चीनला गेलो. तेव्हा भाषेची अडचण जाणवेल असे वाटले, पण तरीही १२ वी पास असलेल्या मला हा दौरा फार काही अडचणीचा ठरला नाही. त्यांनतर मी आजवर जवळपास २१ वेळा चीनला गेलो असून या देशाचा ४०% भूभाग पहिला आहे. चिनशिवाय इतरही अनेक देशात दौरे झाले.
—————-
डबल ड्रीपरचे पेटंट
मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल की पहिल्यापासून माझ्यात निरीक्षणशक्ती खूप आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी मी नवीन काहीतरी शोधतच असतो. याच वृत्तीने मला एक पेटंट मिळवून दिले आहे. आमच्या कंपनीकडे डबल ड्रीपरचे पेटंट आहे. शेतकऱ्यांच्या हितार्थ आणि आहे त्याच किंमतीत शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून दिले आहे. या ड्रीपरचा फायदा असा झाला की काही कारणास्तव जर एक ड्रीपर जर बंद पडला तर दुसऱ्यामधून पाणीपुरवठा सुरूच राहतो आणि पिकाचे नुकसान होत नाही.
———
प्रामाणिकता, नीती, नैतिकता, प्रयत्नशीलपणा आणि निरीक्षणशक्ती हेच आजवरच्या माझ्या यशाचे सूत्र आहे. हिशोबाच्या बाबतीतही मी अतिशय काटेकोर असतो. आपल्यासोबतच सहकाऱ्यांना देखील मोठे करण्याची आपली संस्कृती असल्याने आमचा एकही डीलर आज रोजी नुकसानीमध्ये नाही आणि शेतकऱ्यांनाही आमच्या कंपनीच्या सहकाऱ्यांच्या मदतीने गुणवत्तापूर्ण उत्पादने आम्ही देत आहोत. आजवर न मागता सर्व काही मिळत गेले. त्यात आपण नुकतीच मागीलवर्षी ऐकलेली राजकीय उमेदवारीचा विषय देखील आहे. कंपनीची जबाबदारी आता लहान भाऊ व मुलगा सांभाळत असल्याने मी थोडा इतर सामाजिक क्षेत्रातही लक्ष घालत आहे. रावेरला आम्ही ८०० विद्यार्थी क्षमतेचे डे-बोर्डिंग स्कूल सुरु केले असून त्यात उच्च दर्जाच्या सर्व सुविधा पुरविल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत ने – आण करण्यासाठी २२ स्कूलबस असून ग्रामीण भागात सर्व सुखसोयींनी युक्त असे शैक्षणिक वातावरण तयार करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे.
एकत्र कुटुंब..
आमचा परिवार हा एकत्र कुटुंबातील आहे. आम्ही दोघी भाऊ, दोघांच्या पत्नी, माझ्या दोन मुली, मुलगा, सून, भावाचा मुलगा असे सदस्य घरात आहेत. एका मुलीचे लग्न झाले असून एक शिक्षण घेत आहे. बऱ्याच जणांना माहित नसेल परंतु मला स्वतः स्वयंपाक करण्याची खूप आवड असून अनेकदा कंपनीत मुक्काम केला तर ही आवडही मी आवडीने पूर्ण करतो.
सतत सर्वाना सोबत घेत चालण्याच्या प्रयत्नामुळे किती लोकांना आपण सोबत जोडले आहे, याचा अनुभव मला नुकताच माझ्या वाढदिवसाच्यामुळे आला. माझ्यावर प्रेम करणारी हजारोंच्या संख्येने मित्र-मंडळी मला यावेळी भेटायला आली. कळत न कळत मला मार्गदर्शन करणाऱ्या या सर्वांनाच मी गुरु मानतो. अनेक माणस जोडली गेली व याच संपत्तीच्या जोरावर, या सर्वांच्या आधाराने आज मी उद्योजक म्हणून घडू शकलो.