कृषी विधेयक कायद्याच्या विरोधातील आंदोलक पंचपक्वान्न खाताय की सुखी रोटी..?? # कसा आहे त्यांचा रात्रीचा निवारा..?? # भल्या पहाटे हाडे गोठवणाऱ्या थंडीत सार्वजनिक नळाखाली थंड पाण्यात आंघोळ करणे.. # आंदोलकांच्या सुरक्षा व भोजन व्यवस्थेची जबाबदारी कोणी घेतलीय..? # आंदोलनातील एका वाहनावर बोर्ड लटकविलेला होता. त्यावर लिहिले आहे. “Don’t cover us you are fake media” आंदोलकांमध्ये मीडियाबाबत इतकी टोकाची भावना का आहे..? # आतापर्यंत 23 आंदोलकांचा मृत्यू झाला, एका डेरेप्रमुखांनी शासनाचा निषेध करीत आत्महत्या करून घेतली. या मृत्य व आत्महत्येला जबाबदार कोण..?? # भारतीय इतिहासात एकाच पक्षाला शेतकऱ्यांविषयी तळमळ असते.. तो म्हणजे फक्त विरोधी पक्ष..! याबाबत आजच्या राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त अॅग्रोवर्ल्डच्या वतीने सचित्र Ground Reality मांडण्याचा प्रयत्न..
आंदोलनातील गाडीवर लावलेला बोर्ड
नवी दिल्ली (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी व हे तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली – हरियाणा सिंधू सीमेवर २८ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाचा आज (बुधवारी) २७ वा दिवस आहे. आयुष्यभर ऊन, वारा, थंडी यांचा सामना करण्याऱ्या शेतकऱ्यांना आंदोलनातही याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्तरेत थंडीची लाट आली असून आज येथील तापमान ६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. तरीही हे आंदोलन नेटाने सुरुच आहे. देशभरात आज २३ डिसेंबर हा दिवस शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आजच जगाला पोसणारा अन्नदाता या आंदोलनात २४ तासांचा अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. खर तर मनाला सुन्न करणारी ही घटना आहे. त्या आंदोलनचे वास्तव सर्वांसमोर मांडण्याचा अॅग्रोवर्ल्डचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे..
अन्नदात्याची सकाळ अन्नदानाने
काही माध्यमातून चुकीच्या बातम्या
आंदोलनातील एका वाहनावर बोर्ड लटकविलेला होता. त्यावर लिहिले आहे. “Don’t cover us you are fake media” काही संवेदनहीन प्रसार माध्यमातून अंदोलनाबाबत चुकीच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. हातात लेखणी व तोंडासमोर बूम धरायला मिळाला म्हणजे वाट्टेल ते लिहायला / बरळायला आपण मोकळे, अशी काही पत्रकारांची धारणा झाली आहे. काही पत्रकारांनी तर निर्लज्जपणाचा कळसच गाठला. त्यांच्या मते अंदोलकांना बाहेरील देशाची फूस आहे, आंदोलकांच्या पाठीशी नक्षलिस्ट आहेत, विरोधी पक्ष हे अंदोलन घडवत आहे, अंदोलनात लोकांना पंचपक्वान्नांची मेजवानी मिळत आहे, असे धडधडीत खोटे चित्र रंगवले गेले. हे लिहीताना यांचे हात, बोलताना जीभ कशी झडली नाही, याचेच आश्चर्य आहे..?
शिखांची धार्मिक फौजही आंदोलनात
प्राचीन भारताचा इतिहास पहिला तर लक्षात येईल की जेव्हाही देशावर संकट आले आहे त्यावेळी नेहमीच साधू-संत यात पुढे आले आहेत. हीच गोष्ट याही ठिकाणी प्रकर्षाने जाणवते. याठिकाणी शिखांचे धार्मिक डेरे देखील सहभागी झाले आहेत. हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही, तर शेतीसंबध असलेल्या प्रत्येक भारतीयाचे आहे. कोरोना काळात याच शेतीने भारताच्या जीडीपी चे नाक उंच ठेवले याची जाणीव असणारे नागरिक यात आपला सहभाग नोंदवत आहेत. ल्युटियन्स दिल्लीत एक उच्चभ्रु लोकांची वस्ती देशाचे सर्व मंत्री-खासदार आणि वरिष्ठ अधिकारी येथेच राहतात. याच भागातून काही रहिवाशी हे आंदोलनात सहभागी असलेल्या आपल्या नातेवाईकांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत.
रस्त्यावरील आंदोलकांच्या पंक्ती पुरुषांच्या बरोबरीने कामाचा भार उचलणाऱ्या महिला
धार्मिक डेऱ्यांनी उचलली आंदोलकांच्या सुरक्षाव्यवस्था व भोजन व्यवस्थेची जबाबदारी
शिखांचे धार्मिक डेरे देखील या ठिकाणी आपला पाठिंबा देण्यासाठी हजर झाले आहेत. हे डेरे वर्षभर नांदेड, पटना साहिब, दिल्ली या धार्मिक ठिकाणी दौरे करत असतात. पण यावेळी त्यांनी सर्व दौरे रद्द करून सर्व फौज ही या सीमेवर तैनात केली आहे. जोपर्यंत हे आंदोलन सुरु आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांची सुरक्षाव्यवस्था व भोजन व्यवस्था या फौजेमार्फत पार पाडली जात आहे. सकाळी प्रत्येक डेऱ्यामध्ये लंगर सुरू होतात. आंदोलनात रस्त्याच्या दुतर्फा चहा, बिस्कीट आणि वेगवेगळा नाष्टा वाटला जातो. आंदोलकांना स्थानिक गावातील रहिवाशी देखील मदत करत आहेत. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांचाही समावेश असल्यामुळे त्यांच्या प्रांत:विधीची व्यवस्था ही तेथे केली जाते, तर बहुतांश पुरुषांची सकाळीच अंघोळ ही ६ डिग्रीच्या तापमानातही सार्वजनिक नळांखाली गार पाण्याने पार पडते. दिवसभरच्या अंदोलन व निषेधानंतरही येथील सुरक्षा व्यवस्था व रात्रीचा पहारा ७२ वर्षीचे शेतकरी मोठ्या जोशाने पार पडत आहेत. त्यांच्या सोबतीला डेऱ्यांतील सदस्य आपली उपस्थिती देतात. आंदोलनातील शेतकरी फक्त स्वतःच जेवण करत नाही तर त्यांच्या सोबतीला असलेल्या सरकारी सुरक्षाव्यवस्था सांभाळणाऱ्या सुरक्षादलालाही ते जातीने चहा- जेवण देतात.
आंदोलनाची दाहकता थेट अमेरिकेत
सिंधू सीमेवर तीन आठवड्याहून अधिक काळ सुरु असलेल्या आंदोलनाची दाहकता ही अमेरिकास्थित भारतीय समुदायांना समजली, पण आपण अजूनही याबाबत अनभिज्ञ आहोत. या आंदोलनात सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमेरिकास्थित दोन शीख सामाजिक संस्थांनी तंबू, अन्नधान्य, शौचालय, गिझर अशा विविध वस्तूंचा पुरवठा केला आहे. इतर ठिकाणाहून अशी मदत येत असली तरी जमिनीवरील खरी स्थिती वेगळीच आहे. आजवर सर्वाना पोसणाऱ्या शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी स्वतःच्या हिमतीवर ६ महिन्यांचे अन्नधान्य सोबत घेत या आंदोलनाला सुरुवात केली आहे.
रस्त्यावरील संसार आणि हातावर भाकर हेच का ते पंचपक्वान्ने ?
शेतकरी समर्थनार्थ भावी पिढीचाही पाठिंबा
सिंधू सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनात आपलाही सहभाग असावा, या भावनेतून विविध घटक या ठिकाणी आपली हजेरी लावत आहेत. गुरगाव, दिल्ली, नोयडा व तत्सम ठिकाणाहून विविध क्षेत्रात कामानिमित्त कार्यरत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींनीही आपला सहभाग नोंदविला आहे. यात कंपनीत काम करणारे युवक सुट्टीच्या दिवशी आपला सहभाग नोंदवत आहेत, तर पंजाबच्या विविध हॉस्पीटलमध्ये कार्यरत असणाऱ्या नर्सेस या आंदोलनासह आंदोलकांच्या आरोग्याचीही काळजी घेत आहेत.
नेहमी शेतकऱ्याच्या पाठीशी असणारा एकच पक्ष
समाजातील सर्वच घटकांमध्ये उपेक्षित असलेला परंतु सर्वच अडचणीत सतत सर्वांच्या पुढे असणाऱ्या शेतकऱ्यांना खर तर कोणीही पाठीराखा नसतो. एव्हाना निसर्गदेखील सतत शेतकऱ्यांची परीक्षाच घेत असतो. तरीही एक पक्ष असा आहे जो नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी इमान-इतबारे उभा असतो. प्रत्येक आंदोलनात त्याच्या सोबत असतो. त्याच्या प्रत्येक मागणीचा तो बुलंद आवाज असतो तो म्हणजे विरोधी पक्ष…! खरंच कोणतीही सत्ता असली तरी मागच्या वेळेचा सत्ताधारी विरोधक झाल्यावर आणि आताचा विरोधक सत्ताधारी झाल्यावर जगाच्या पोशिंद्यांचा पद्धतशीरपणे वापर करतो. तेच चित्र आताही पाहायला मिळत आहे. त्यामुळे सत्तेत कोणताही पक्ष निवडून आला तरी शेतकऱ्यांचा कळवळा (कोरडा) फक्त विरोधी पक्षालाच असतो, हे कटू सत्य एव्हाना आता शेतकरी वर्गालाही उमजले आहे.
आंदोलनातील सहभागी महिला व वयोवृद्ध व आरोग्य सेवा देणाऱ्या नर्सेस
सत्य स्थिती.
कोरोनाचा कालावधी असूनही भावी पिढीच्या भविष्यासाठी हे आंदोलक जीवावर उदार होऊन यात सहभागी झाले आहेत. बहुतांश अंदोलक हे आपल्यासोबत जवळपास ६ महिने पुरेल इतक्या प्रमाणात रसद घेऊन या अंदोलनात सहभागी झाले आहेत. अंदोलन आहे म्हणजे सर्व सोडून शेतकरी दिल्लीकडे निघाला आहे असे नाही, तर त्यांच्या पुढच्या पिढीने व महिलांनी शेतीचा ताबा सांभाळला असून त्यांच्या मार्फत शेतीचे नियोजन व अंदोलकांना दुध व भाजीपाला पुरवठा केला जात असून, याकामी दिल्ली व नोयडास्थित आयटीच्या मुलांनी धूरा सांभाळली आहे. प्रत्येक गावात त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांचे ग्रुप तयार करून आंदोलनस्थळावरून शेतकऱ्यांकडून शेतीबाबत विविध मार्गदर्शन आपल्या गावातील परिवारांना केले जाते. एकूण काय तर शेतकऱ्यांची पूर्वतयारी पाहता ” ये लढाई लंबी चलने वाली है “ हे निश्चित…
“आज खुद को आग लगा दी है, देखूँ तो जरा कौन पानी कौन घी है” असाच काहीसा भाव या चेहऱ्यांवर दिसतोय का ?