रात्रीच्या वेळी राजांचं अश्वपथक संकेतस्थळी पोहोचलं. गर्द रानानं व्यापलेल्या त्या रानात रातकिड्यांचा अखंड नाद उमटत होता. हवेतला गारवा जाणवत होता. राजांच्या स्वागतासाठी आबाजी विश्वनाथ, नेताजी वगैरे उभे होते.
राजांनी विचारलं.
‘आबाजी, बेत कसा ?’
आबाजी म्हणाला.
‘सारे पुढे गेले आहेत. शिड्या पुढं पाठविल्या आहेत. गल्लत कुठंच होणार नाही. चलावं !’
‘ठीक ! चला.’
शिवाजीराजे धारकऱ्यांच्या मागून चालत होते.
बरंच अंतर चालल्यानंतर रान संपलं आणि काळोखातल्या रोहिड्याचं दर्शन राजांना घडलं.
एक शीळ घुमली आणि झाडा-झुडपांतून हजारो मावळे बाहेर पडले.
आबाजी म्हणाले, ‘राजे, आम्ही शिड्या लावून गड गाठतो. पहिल्या दरवाज्याशी तुम्ही या. दरवाजा उघडताच तुम्ही प्रवेश करा. गडात काही धोका होणार नाही. आम्ही येतो. जय भवानी !’
‘जय भवानी !’ राजे नकळत उद्गारले.
काळोखातून दिसेनाशी होणारी माणसं आणि अस्पष्ट होत जाणारे त्यांच्या पावलांचे आवाज ऐकत राजे उभे होते.
गडावर दाट धुकं उतरत होत. बोचरी थंडी अंगावर शहारे आणीत होती. तशा थंडीत दक्षिणेच्या बुरूजाखाली पाच-पन्नास मावळे सरपटत वर चढत होते. दोन शिड्या तटाला लावल्या गेल्या. आबाजी विश्वनाथनं मनातल्या मनात देवाचं स्मरण करुन तलवार उपसली. कपाळी लावून दातात धरली आणि शिडीच्या पायंड्यावर पाय ठेवला. त्याच्या पाठोपाठ मावळे चढत होते.
गडाच्या-बुरूज चौकांतून टेंभे जळत होते. पण धुक्यामुळं त्यांची जाणीव होत नव्हती. तट गाठताच आबाजी विश्वनाथनं तलवार दुशेल्यात खोवली. भाला हाती घेतला. तटावर आलेल्या लोकांना लोकांना इशारत दिली आणि सराइताप्रमाणे चालत आबाजी धुक्यात नाहीसा झाला.
आबाजी सरळ महाद्वाराजवळ आला.
एक पहारेकरी पेंगत उभा होता. देवडीची मशाल पेटत होती. धुमी थंडावत चालली होती.
दुसरा पहारेकरी घोंगडं लपेटून घेऊन झोपला होता.
‘छान पहारा चाललाय् !’ आबाजी म्हणाला.
त्याबरोबर पेंगणारा पहारेकरी दचकून जागा झाला. झोपलेला उठून बसला होता. दोघे तारवटलेल्या डोळ्यांनी आबाजीला बघत होते.
‘अवं, राव, बघताय्सा काय?’
‘आयला, पन तुमी आलासा कवा?’ एकाला वाचा फुटली.
‘असाच पहारा करा! तुमी चिलमी फुकत बसनार आनि मालक हुक्का ओढणार! गडावर कोन, कवा आलं, तेबी कळायचं न्हाई. काल सांजचंच आलो. शिवाजी राजं खलिता देणार आनि तुमचं बांदल राजं खलिता घेनार! मग बांदल राजं खलिता देनार आनि शिवाजी राजं खलिता घेनार! मग शिवाजी राजा…’
‘समजलं! पन येवढ्या रातीचं का आलासा?’
‘ते तुमच्या धन्याला इचारा. घोडं मेलं ओझ्यानं आणि तट्टू मेलं येरझाऱ्यानं. तशी गत झालीया माझी…’
‘पन येवढ्या रातीचं का आलासा?’
‘सांगतो, दम हाय, का न्हाई! तुमच्या मालकाचं वय झालं. झोप येत न्हाई. बोलत बसलं. उठणार कसं?’ आबाजीचा आवाज बदलला. ‘राव, जरा गडाखाली जायला होवं.’
‘या वख्ताला?’
‘व्हय! दिस उगवायच्या आत येतो, बघा.’
‘कुनालाबी दरवाजा उघडायचा न्हाई, असा बाजींचा हुकूम हाय.’ पहारेकरी म्हणाला.
‘दरवाजा उघडू नका. दिंडी उघडा. येवढ्या रातीचं कोन बघतंय?’
‘पन जाता कशाला?’ पहारेकऱ्यानं डोकं खाजवत विचारलं.
दुसरा पहारेकरी तरण्याबांड आबाजीकडं बघत होता.
तो हसला. म्हणाला.
‘पाखरु हेरलं असलं!’
आबाजी लाजला, चोळण्याच्या खिशात हात घालून त्यानं पाच चंद्रमे काढले आणि शिपायांच्या हाती दिले.
क्षणभर विचार करुन पहारेकऱ्यानं हळूवार हातानं दिंडीची साखळी काढली आणि तो कुजबुजला,
‘परवलीचा शबूद हाय कावळा. पन, शिलेदार, लौकर या.’
‘आलोच! म्हणत आबाजीनं दिंडीबाहेर पाऊल टाकलं. पहारेकरी दिंडी लावत असतानाच आवाज आला, ‘कावळा!’
पहारेकऱ्यानं दिंडी किलकिली केली. आबाजी आत पाऊल टाकत म्हणाला,
‘भाला ऱ्हायला!’
आबाजी आत आला. भिंतीला टेकवून ठेवलेल्या भाल्याकडं तो जात असता पहारेकरी पाहत होते. दिंडीतून आत येणाऱ्या मावळ्यांकडं त्यांचं लक्ष नव्हतं. क्षणात दोन्ही शिपाई गारद केले गेले. आबाजीनं दरवाज्याच्या आडण्याकडं बोट दाखवलं. तो प्रचंड आडणा करकरत सरकला. आवाज करीत दरवाजा उघडला गेला. हाती तलवारी घेतलेले मावळे किल्ल्यात घुसत होते आणि त्याच वेळी आबाजी ओरडला,
‘हर हर महादेव ss’
एकच किलकारी उठली. अमावास्या आणि दाट धुकं यांमुळं चार पावलांवरचा माणूस दिसत नव्हता. दक्षिणेच्या तटाकडून ‘हर हर महादेव s’ ची साद उठली, आबाजी विश्वनाथ गंजीखान्याकडं धावला. वाटेत येईल, तो शत्रू कापला जात होता. आबाजीनं गंजीखाना गाठला आणि चकमकीनं गंजीखान्याला आग लावली. गंजीखाना धडाडून पेटत होता. साऱ्या गडावर एकच कल्लोळ माजला होता. पेटत्या गंजीखान्याच्या उजेडात सारा गड प्रकाशित झाला होता.
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया )
क्रमशः