एकाच पिकावर अवलंबून राहिल्याने आर्थिक गणित बिघडते हा अनुभव आल्यानंतर मिश्र व आंतरपिके घेऊन नवा पायंडा राजवड येथील निळकंठ पाटील यांनी पाडला आहे. सिताफळ एकरी 1 लाख व आंतरपीक पपईचे एकरी 50 हजार रुपये उत्पन्न निळकंठ पाटील यांनी मिश्र पिकातून घेतले. पपई, सूर्यफूल, भुईमूग, सीताफळ, पेरू, कापूस, मका, टरबुज, भेंडी अशी विविधता असलेली पिके घेणारे निळकंठ पाटील परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
पारोळा (जळगाव) तालुक्यातील राजवड हे एक आदर्श गाव म्हणून सर्वदूर परिचित आहे. धरणगाव पासून 10 आणि पारोळ्यापासून 12 किमी अंतरावर टेकड्यांनी आणि झाडाझुडपांनी वेढलेले सुंदर गाव. येथील प्रत्येक शेतकरी हा प्रयोगशील असल्याने उत्तम शेती करण्यात येथे स्पर्धा दिसून येते. जलसंधारण आणि वृक्ष लागवडीत हे गाव अग्रेसर आहे. येथील शेताच्या बांधावरील वृक्ष लागवड लक्ष वेधून घेणारी आहे. अशा प्रयोगशील आदर्श गावाचे संस्कार झाल्यामुळे नीळकंठ पाटील देखील एक उत्तम आणि आदर्श शेतकरी ठरले आहेत.
गावापासून जवळच धरणगाव रस्त्याला लागून त्यांची शेती आहे. त्यांची 22 एकर शेती असून सिंचनासाठी 5 विहिरी व एक शेततळे तयार केले आहे. त्यांचे वडील ज्वारी, बाजरी, कापूस व कडधान्ये हीच पिके घ्यायचे. नीलकंठ पाटील 2002 पासून शेती करू लागले आणि त्यांनी शेतीचे रूप पालटवायला सुरूवात केली. 2000 यावर्षी ठिबक सिंचनावर कापूस लागवड करणारे ते पहिले शेतकरी होते. या शेतात पोहोचलो तेव्हा सीताफळाच्या बागेत पपईचे जोमदार पीक उभे होते. एका फळपिकात दुसरे तेवढेच चांगले फळ उत्पादन घेण्याची किमया निळकंठ पाटील यांनी साधली होती.
सीताफळ लागवड:
राजवड शिवारात बोर उत्पादन घेण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल दिसतो. असे असून निळकंठ पाटील यांनी मात्र 2005 यावर्षी बाळानगरी सीताफळाची लागवड केली. थोडे थोडके नाही तर तब्बल 8 एकर क्षेत्रात 1750 इतक्या रोपांची 20x 13 अंतरावर लागवड केली. 2010 पासून उत्पादन यायला प्रारंभ झाला असून 16 वर्षाची बाग होऊन देखील ते आजही विविध आंतरपिके घेत आहेत.
आंतर पिकातून उत्पन्न वाढ:
बहुतांश शेतकरी फळ बागायत करतांना प्रत्यक्ष फळ उत्पादन यायच्या सुरुवातीची जास्तीत जास्त 5 वर्षे मूग, उडीद, सोयाबीन यासारखी कमी वाढणारी व कमी कालावधीची आंतरपिके घेतात. निळकंठ पाटील मात्र अपवाद आहेत. ते सीताफळाची झाडे 15-16 वर्षाची होऊनही पपई सारखे उंच वाढणारे पीक घेण्यातही यशस्वी झाले आहेत. पपई प्रमाणे त्यांनी सीताफळ पिकात भुईमूग, टरबूज, भेंडी व कापूस देखील घेतला आहे. सीताफळाचे खर्च वजा जाता ते एकरी 1 लाख उत्पन्न घेतात.
सिंचन, खत व्यवस्थापन व रोगराई नियंत्रण :
अतिशय कमी पाण्यात येणारे हे पिक आहे. पावसाळ्याच्या पाण्यावरच हंगाम येऊ शकतो. पावसाळा सुरू होतो तेव्हाच या झाडाला फुलं येऊ लागतात. ऑक्टोबर महिना येईपर्यंत फळे पक्के होऊ लागतात. एकूण सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पाणी दिले जाते.
झाडांना बहर येतांना व पिके पक्व होण्यापूर्वी प्रतीझाड 1 किलो नत्र, स्फुरद, पालाश एकत्रित दिले जाते. तसेच पावसाळ्यापूर्वी बुरशीनाशक मिश्रित 10 किलो शेणखत दिले जाते. मिलीबग वागळता कोणतीही कीड रोग येत नाही. फळावर मिलीबाग आल्यास कोणतेही रसशोषक किडींवर वापरावयाचे कीडनाशक किंवा निंबोळी अर्काची फवारणी केली जाते.
कमी खर्चाचे पीक:
सिताफळ हे कमी खर्चाचे व कमी पाण्यात येणारे पीक असल्याने ते परवडते असे ते सांगतात. रोगराई फारशी येत नाही व फळ काढणी वगळता मजुरीचा खर्चही येत नाही. मालाची काढणी सुरू झाली की जळगाव, धुळे व गुजरात राज्यातील व्यापारी शेतावर येऊन माल घेऊन जातात.
पपई पासून घेतले बोनस उत्पन्न:
सिताफळ हंगाम डिसेंबर –जानेवारी महिन्यात संपतो. त्या अनुषंगाने त्यांनी पपईच्या सह हजार रोपांची लागवड केली होती. सिताफळ नंतर लगेच फेब्रवारीपासून पपईची काढणी सुरू झाली. आंतरपीक असून देखील पपईपासून त्यांनी 3 लाख रुपये इतके उत्पन्न घेतले. सिताफळ उत्पादन घेतल्यानंतर हा एक प्रकारे त्यांना बोनसच मिळाला.
सूर्यफूल आंतरपीक तेही ठिबकवर:
पाच एकरात पेरूची लागवड केली असून त्यात यावर्षीच्या रब्बी हंगामात त्यांनी सुर्यफुलाचे आंतर पीक घेतले. आंतरपीक असूनही एकरी 12 क्विंटल असे भरघोस उत्पादन घेतले. उत्तम दर्जाचे उत्पादन आल्याने त्यांना 6 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. अशाप्रकारे फक्त 90 दिवसात सूर्यफुलपासून एकरी 72 हजार रुपये उत्पन्न मिळविले. त्याचप्रमाणे ठिबक सिंचनाचा उपयोग करून मक्याचे एकरी 42 क्विंटल उत्पादन त्यांनी घेतले.
जलसंधारण कामातही योगदान:
निळकंठ पाटील यांच्या शेताच्या भोवतीने छोटे छोटे नाले आहेत. पूर्वी डोंगर उतारावरील पाणी एक तर त्यांच्या शेतात घुसून पिकांचे नुकसान व्हायचे किंवा सरळ वाहून जायचे. अलीकडे मात्र हे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी त्यांनी शिवारात ठिकठिकाणी नाला खोलीकरण केले आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढीस मदत झाली आहे.
निळकंठ पाटील यांच्या शेतातील विविध पिकांचे नियोजन पाहता ते एकाच क्षेत्रात विविध मिश्र पिके व आंतरपिके घेऊन आपले उत्पन्न वाढवितात असे दिसून आले.
पोकरा योजनेचा मिळाला लाभ:
राजवडगावाची निवड शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा ) यात झाली असल्याने शेतकऱ्यांना विविध कामे अनुदानातून करून घेता आली आहेत. या योजनेचे जिल्हा अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निळकंठ पाटील यांनी आपल्या शेतीत सुधारणा केली आहे. त्यानुसार फळबाग, ठिबक सिंचन प्रणाली, मोटार पंप, शेततळे, कांदा चाळ आदी लाभ त्यांनी मिळविला आहे. संजय पवार यांच्याप्रमाणे तालुका कृषी अधिकारी शेळके, कृषी सहायक बोरसे यांचेही त्यांना मार्गदर्शन मिळते.
सिताफळ, पेरू ही फळ पिके कापूस पेक्षाही कितीतरी पटीने फायदेशीर आहेत. या पिकांना मजुरी कमी लागते. तसेच रोगराई नगण्य असल्याने त्यावरील खर्च देखील वाचतो. फळ बागायत व मिश्र लागवडीमुळे माझी आर्थिक घडी बसली.
निळकंठ दगडू पाटील,
मु.पो. राजवड ता. पारोळा, जिल्हा जळगाव
मो.न.9766576655