महाराष्ट्राच्या विदर्भ विभागात येणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालूक्यातील पांगरी (माळी) येथील प्रयोगशिल शेतकरी राजेंद्र गुलाबराव खरात यांनी आपल्या शेतीत विविध भाजीपाला पिकाचे उत्पादन घेत त्यातून बिजोत्पादनाचे प्रयोग यशस्वी केले आहेत. त्यांनी बियाणे विक्रीतून वर्षाकाठी १५ लक्ष रुपये शाश्वत उत्पन्न मिळवून आपली शेती समृद्ध केली आहे. त्यांच्या बिजोत्पादन प्रयोगाने अनेक शेतकरी प्रेरितही होत असल्यामुळे राजेंद्र खरात यांचे कृषी प्रयोग विदर्भासह महाराष्ट्र राज्यात नावारुपाला आले आहेत.
प्रयोगशिल युवा शेतकरी राजेंद्र खरात यांचे २५०० लोकसंख्या असलेलं पांगरी माळी, गाव बुलडाणा, देऊळगाव राजा तालूकाच्या भागातील -चिखली- देऊळगावराजा रोडवर येते. पांगरी गाव शिवारात त्यांची ९ एकर जमीन असून त्या जमिनीची प्रत ही हलकी, भुरकट, मुरमाड आहे. शेतीत सिंचनासाठी एक विहीर, एक शेततळे आणि बोअरवेल आहेत. पारंपरिक पिकाला बगल देत त्यांनी वर्षे २००८ पासून टोमॅटो, वांगी, भेंडी, दोडके, कारले, काकडी, कलिंगड, खरबूज, तिखट मिरची, सिमला मिरची, झेंडू फूले, कांदा, आदि पिकांचे शेडनेट मध्ये व खुल्या क्षेत्रात उत्पादन घेवून एका खासगी बियाणे कंपनीच्या मार्गदर्शनाने या भाजीपाला व फुले फळे पिकापासून बिजोत्पादन तयार करण्याचे प्रयोग राबवण्यास सुरुवात केली आहे. प्रति शेडनेट १० गुंठे क्षेत्रात उभारणी आहे. आज त्यांच्या शेतीत १० गुंठ्याचे ११ शेडनेट आहेत. त्यात ते बिजोत्पादन करतात. उत्पादन खर्च जाता बियाणे विक्रीतून वर्षाकाठी लक्षावधी रुपये निव्वळ नफा मिळू लागल्याने ते या बियाणे निर्मिती प्रयोगात स्थिरावले आहेत.
पारंपरिकतेतून बिजोत्पादनाकडे
दहावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वडिलासोबत शेतीत काम करु लागले. त्यावेळी २ एकर वडिलोपार्जित जमीन होती. त्यानंतर बियाणे विक्रीच्या उत्पन्नातून आणखी ७ एकर जमीन खरेदी केली आहे. या भागात पूर्णा नदी आहे परंतू तेथे कोणतेही धरण नसल्यामुळे बागायती पिके घेण्यासाठी कालव्याच्या पाण्याची सोय नाही. शिवाय जमीनी खडकाळ आहेत. बहुतांश शेतकरी कोरडवाहू ज्वारी, बाजरी, मका, कापूस ही पिके खरीपात घेतात. पूर्वी खरात हे ही कोरडवाहू पारंपरिक पिके घेत असत या पिकाच्या उत्पादनातून पैसे शिल्लक राहतील असे उत्पन्न पदरात पडत नसे. त्यामुळे ते अधिक पैसे उरणारे पीक घ्यावे? या विचारत होते. या भागात अनेक खासगी बियाणे कंपन्या शेतक-यांना बिजोत्पादनासाठी प्लाॅट देतात. पांगरी माळी गावातही काही शेतकरी बिजोत्पादन करतात. यावरुन आपणही बियाणे तयार करावे, ही कल्पना सुचली आणि अशातच एका बियाणे कंपनीचे प्रतिनिधी बिजोत्पादन प्लाॅट घ्या, म्हणून माहिती देण्यासाठी गावात आले होते, तसेच त्यांनी बियाणे तयार करण्या विषयीची पूर्ण तांत्रिक माहिती दिली. त्यामुळे खरात यांनी होकार देवून बिजोत्पादन करण्यास २००८ ला सुरुवात केली. सबंधित सिड कंपनी प्रतिनिधींचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आणि बिजोत्पादन करणारे गावातील आश्रोजी वाघ, छबूराव वाघ, गुलाबराव वाघ, छगनराव वाघ यांच्याकडून देखील बिजोत्पादनाची प्रेरणा मिळाली तसेच त्यांचेही मार्गदर्शन मिळते.
बिजोत्पादनाकरीता शेडनेटची उभारणी
सुरुवातीला लाकडी बल्ल्या, बांबू, नेट कपडा यापासून १० गुंठे जमीनीत शेडनेटची उभारणी केली होती. त्याकरीता ५० हजार रुपये खर्च आला. यानंतर बियाणे उत्पन्नाच्या पैशातून लोखंडी एंगलचे हळूहळू असे ११ शेडनेट उभारले. याकरिता प्रति शेडनेट एक लाख रुपये खर्च लागला. अकरा शेडनेटपैकी अदलून-बदलून ९ शेडनेट मध्ये बिजोत्पादन पिके घेतात. शेडनेट उभारणीसाठी कोणतेही अनूदान न घेता शेडनेट उभारणीही बियाणे विक्रीच्या उत्पन्नातून टप्याटप्याने केली आहे.
पिके उत्पादन
१० गुंठ्याच्या शेडनेटमध्ये बेड तयार करुन त्यावर आवश्यक तो रासायनिक व काही जैविक खतांचा बेसल डोस दिला आणि त्यानंतर ठिबक बसवून मल्चिंग पेपर टाकून छिद्रे पाडली. मग बियाणे कंपनीकडून मिळालेल्या रोपट्यांची लागवड केली. योग्य व्यवस्थापनानंतर पिकांचे जसे, उदा. मिरची, टोमॅटो, कारली, कलिंगड खरबूज, दोडका, भेंडी वेलवर्गीय सर्व फळे परिपक्व (पिकल्यावर) काढणी करुन ती बियाणे काढणी यंत्रातून गर व बिया ते वेगळ्या करतात.
असे होते परागीकरण (पाॅलिनेशन)
रोपटे लागवडीनंतर काही कालावधी लोटल्यावर (शेडनेटमध्ये एका बाजूला नर आणि दूस-या बाजूला मादी रोपांची लागवड केलेली असते.) यापैकी नर झाडांना लगडलेल्या फुलांची एका छोट्या यंत्राच्या साह्याने फुले वेचून त्याच यंत्रात नर फुलांची पावडर जमा होते ती काढून सकाळच्या वेळी स्वता: व महिला मजूराकरवी मादी फूलावर टाकून परागीकरण केले जावून तेथे रंगीत दोरीने बांधून परागीभवनाची खुण करतात. जेणे करुन त्या खुणेच्या देठांना लगडलेली परिपक्व (पिकलेली) फळे काढून बियाणे काढणी होते.
खतमात्रा व पाण्याचे व्यवस्थापन
पिक उत्पादनासाठी ज्या मातीचे बेड करतात ती माती प्रथम तपासणी (परिक्षण) करुन त्यानूसार खताची मात्रा बेडवर बेसल डोस व रोपे लागवडीनंतर काही दिवसाच्या व पिकाच्या वाढीप्रमाणे ठीबकने विद्राव्य खते सोडतात. आवश्यक त्या वेळी बेडवरील वाफस्यानूसार ठीबकमधून पाणी व्यवस्थापन करतात. तसेच या वेलवर्गीय बिजोत्पादनाच्या झाडांना रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास स्व:अनुभव व कंपनी प्रतिनिधी यांच्या सल्याने औषधांची फवारणी करावी लागते. याप्रमाणे पिकाची काळजी घेवून संगोपन चोख करीत बिजोत्पादनाचे वेगवेगळी पिके घेतात.
बियाण्याचे होणारे उत्पादन
पहिल्या वर्षी २००८ ला एका शेडनेटमध्ये टोमॅटो रोपांची बिजोत्पादनासाठी लागवड केली होती. उत्पादीत झालेल्या टोमॅटो फळापासून १२ किलो बियाणे निघाले. त्यानंतर वर्ष २००९ ला सुध्दा टोमॅटो व सिमला मिरची पिक घेतले त्यावर्षी टोमॅटो १४ किलो तर सिमला १६ किलो बियाणे उत्पादन झाले. त्यानंतर शेडनेट संख्या वाढवून त्यात वेगवेगळे बिजोत्पादन पिके घेत गेले. त्यात एका शेडनेट मध्ये तिखट मिरची ८५ ते ९० किलो बियाणे काढले. काकडी ६० ते ७० किलो, कारले ८० किलो, खरबूज ३० ते ३५ किलो, कलिंगड २५ किलो, दोडके ४० किलो, भेंडी १०० ते १२५ किलो, उघड्या क्षेत्रातील एका एकरातील कांदा ४ क्विंटल, झेंडू फूले पिक चांगले आले तर १५ किलो आणि मध्यम आले तर ८ ते ९ किलो या प्रमाणात बियाणे उत्पादन होते.
बियाणे काढणी पध्दत
बिजोत्पादनाकरीता उत्पादीत झालेले वेगवेगळे भाजीपाला, कलिंगड, खरबूज ही परिपक्व पिकलेली फळे शेडनेट मधून काढणी केल्यावर यातील काही फळाची यंत्रातून गर बियाणे अलग करुन तर काही फळे हाताने फोडून बिया व गर अलग करुन बियाणे स्वच्छ धुवून चाळणीतून गाळून वाळवले जाते त्यानंतर काडी कचरा दगडी कणं वेगळे काढून कडक वाळलेले बियाणे बारदाण्यात भरुन देऊळगाव राजा येथील बियाण्याची प्रतवारी व उगवणशक्ती करणा-या खासगी आनंता सिड्स कंपनीला नेवून विक्री करतात. सदर कंपनी ईतर शासन मान्यता प्रमाणीत वेगवेगळ्या खासगी बियाणे कंपनीला शेतक-यांनी उत्पादीत केलेले बियाणे अधिकच्या नफ्यात विक्री करते.
बियाणे विक्रीतून मिळालेले उत्पन्न
प्रथम २००८ या वर्षी १२ किलो टोमॅटो बियाण्यास त्यांना १ लाख ८० हजार रुपये मिळाले तर त्यासाठी ५० हजार रुपये उत्पादन खर्च आला. आणि २००९ ला टोमॅटोच्या १४ किलो बियाण्यास २ लाख १० हजार रुपये आले याकरिता उत्पादन खर्च ९० हजार रुपये आला. त्याच साली सिमला मिरचीचे १६ किलो बियाणे निघाले त्या सिमला बियाण्यास २ लाख २५ हजार रुपये मिळाले तर उत्पादन खर्च ४५ हजार रुपये आला. तिसऱ्या वर्षी तिखट मिरचीचे ९० उत्पादन झाले होते त्या बियाण्याला कंपनीने ६ लाख ५० हजार रुपये दिले. तिखट मिरची उत्पादनासाठी १ लाख १० हजार रुपये खर्च आला. तसेच ८० किलो कारले बियाण्यास १ लाख ६० हजार रुपये मिळाले आणि उत्पादन खर्च २५ हजार रुपये आला. काकडीच्या ७० किलो बियाण्यास १ लाख आले तर उत्पादन खर्च ३३ हजार रुपये लागला. शिवाय ३५ किलो खरबूज बियाण्याचे ८५ हजार रुपये येतात त्याच्या उत्पादनाकरीता ३० हजार रुपये येतो. २५ किलो कलिंगड बियाण्याने १ लाख ६० हजार रुपये दिले. उत्पादन खर्च २५ हजार रुपये या पध्दतीने कमी अधिक प्रमाणात पिकानुसार बियाणे विक्रीतून कमी खर्चात बिजोत्पादनात लक्षावधी रुपये निव्वळ नफा मिळतो.
आता पर्यंत त्यांना उत्पादन खर्च वगळता बियाणे विक्रीतून १५ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. या पैशातून त्यांनी शेडनेट, ट्रॅक्टर, जमीन खरेदी आदी प्रगती केली आहे.
कौटुंबिक सदस्यांची बिजोत्पादन कामात मिळते मोलाची साथ
बिजोत्पादनाच्या कार्यात त्यांना वडील गुलाबराव बापूराव खरात, आई सौ मंदोधरी खरात, पत्नी सौ सविता खरात, बंधू गणेशराव खरात, भावजय सौ सुभांगी गणेश खरात हे कौटुंबिक सदस्य अहोरात्र कष्ट करुन मोलाची साथ देतात. त्यामुळेच प्रयोगशिल आणि धीरोदत्त जिद्दी वृत्ती असलेले शेतकरी राजेंद्र खरात हे बिजोत्पादन शेतीपुरक नवप्रयोगात यशस्वी झाले आहेत. त्यांच्या बिजोत्पादन फार्मला आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र विभागातील अनेक शेतक-यांनी भेटी देऊन पाहणी करुन त्यांच्या प्रयोगाबद्दल समाधान व्यक्त केली आहे.
शेतकरी संपर्क
राजेंद्र गुलाबराव खरात
मु पांगरी माळी, ता देऊळगाव राजा, जि बुलडाणा.
विदर्भ विभाग, महाराष्ट्र.
७७०९५५६३५९.
बिजोत्पादन शेतीपुरक व्यवसाय
या पूर्वी आम्हाला वडिलोपार्जित २ एकर जमीन होती. त्या जमीनीत वडील कापूस, बाजरी, मका हे पावसाळ्यातील खरीप पीक घेत असत. २ एकारातील या कोरडवाहू पिकाच्या उत्पन्नातून वर्षभराचा घरप्रपंचही भागायचा नाही. वडीलासोबत शेतीकामात मदत करीत होते पण मन रमत नव्हते. आमच्या गावात काही शेतकरी कंपनीचे पिक प्लाॅट घेऊन बियाणे तयार करीत होते. त्यांना कमी जागेत कमी खर्चात बियाणे तयार करण्यामुळे लाखो रुपये मिळायचे. हे पाहून आपण सुद्धा बियाणे तयार करावे, असे विचार सतत मनात घोंगावत होते. परंतु सुरुवात करण्यास आर्थिक भांडवलही नव्हते. अशातच एका सिड्स कंपनीचे कृषी तांत्रिक अधिकारी बाबासाहेब मुळे यांच्या मार्गदर्शन व मदतीने ख-या अर्थाने बिजोत्पादनास सुरुवात केली. आता हा बिजोत्पादन शेतीपुरक व्यवसाय विस्तारला आहे. ईतर देखील शेतक-यांनी आमच्यासारखे शेतीत प्रयोग केले तर कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळून शेतीकडे तरुणांचा कल वाढेल.
राजेंद्र गुलाबराव खरात
पांगरी, बुलडाणा.