कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिक असल्याने कापसाची लागवड जिरायती आणि पूर्व हंगामी अश्या दोन्ही प्रकारे मोठ्या प्रमाणावर केली जाते. कापूस पिकाचे व्यवस्थापन करतांना काही छोट्या बाबींवर भर देणे आवश्यक आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी कोरडवाहू कापसाची लागवड ही पाऊस सुरु होण्याआधी करतात आणि नेमकी येथेच शेतकऱ्यांची चूक होते. त्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा झाल्याशिवाय कापसाचे बियाणे लावणे टाळावे.
कापूस पिकाचा कालावधी १४०-१८० दिवसाचा असून पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे ताण सहन करण्याची क्षमता इतर पिकापेक्षा जास्त असते. जिरायती कापसाला साधारणता ६५० ते ७५० मि.मी. पाऊस पुरेसा असतो. पिकास उगवणीपासून ते पात्या अवस्थेत ८० ते १४० मि.मी., फुले व बोंडे भरण्याचा कालावधी २०० ते २५० मि.मी., बोंडे उमल्यापासून २५० ते २७० मि.मी. पावसाची गरज असते. कापूस पिकाची उगवण चांगली होण्याकरता १५ ते २२ अंश सेल्शियस तापमान आवश्यक तसेच कायिक व शाकीय वाढीसाठी २२ ते २७ अंशसे तापमान लागते
महाराष्ट्रात बरेचसे कापसाचे क्षेत्र हे कोरडवाहू आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचा ताण पडत असल्याने किंवा ऑक्टोबर मध्ये उशिरा पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे कापसाच्या वाढीवर,उत्पादनावर व पर्यायाने धाग्याच्या गुनवत्तेवर अनिष्ठ परिणाम होतो. कोरडवाहू कापसाची लागवड करतांना सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. त्यामुळे पाऊस जरी कमी प्रमाणात पडला तरी पाणी वरंब्यामध्ये मुरले जाते व जर पाणी जास्त झाले तर सऱ्या द्वारे त्याचा निचरा होतो. तसेच कापूस पिकात १:१ प्रमाणात उडीद,मुग सोयाबीन किंवा चवळी ह्या अंतरपिकाचा वापर करून पिकांची वाढ जे जोमदार झाली तर ते कापूस पिकाच्या दोन ओळींतील अंतर व्यापते व त्यामुळे त्याचा अछादनासारखा फायदा होऊन जमिनीतील ओल निघून जात नाही.
डॉ संजीव पाटील, कापूस पैदासकार,
कृषी संशोधन केंद्र , जळगाव
शेतकऱ्यांनी धूळ पेरणी टाळावी
काही शेतकरी मान्सूनपूर्व पावसाच्या आधारावर पेरणी करतात. परंतु ही पद्धत चुकीची आहे. जोवर ६५ मिमी. पर्यंत पावसाची नोंद होत नाही तोवर कोरडवाहू कापूस बियाणे लागवड टाळावी. कारण बऱ्याच वेळा अश्या अपूर्ण पावसामुळे जमिनीत उष्णता तयार होऊन बियाणे खराब होते आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येते. आता सर्वत्र बीटी कापसाची पेरणी होते त्यामुळे संपूर्ण जून महिन्यात केव्हाही कापूस बियाणे लागवड केली तरी चालते त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेश्या ओलीतच बियाणे लागवड करावे . कापूस लागवडीची घाई करू नये. धूळ पेरणी टाळावी
श्री.मधुकर चौधरी
प्रकल्प उपसंचालक आत्मा,जळगाव
Farm