मुंबई- राज्यात पावसाची मुसळधार तीव्रता तुलनेने कमी झालेली असली तरी अनेक भागांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. गेले काही दिवस कोकण आणि घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात येत आहे. 7 जुलै रोजी अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता, तर आज, बुधवार 8 जुलैसाठी 9 जिल्ह्यांना यलो आणि 2 ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही सरासरीपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या नकाशानुसार नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे
आज, बुधवार, 8 जुलै रोजी उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) अहिल्यानगरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता वर्तविली आहे. नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकणात मुसळधार कायम
राज्यातील कोकण विभागात पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात जोर ओसरतोय; घाटात धुमशान सुरूच
पश्चिम महाराष्ट्रात पुणे शहर व परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुणे आणि सातारा घाटमाथा भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे.
मराठवाड्यात कमी पाऊस
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भात विजांचा कडकडाट
विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून येलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत सध्या पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल
















