मुंबई –
नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य 300 मिमी पाऊस होण्याच्या भीतीने सर्वच धास्तावले आहेत. मुंबईत गेले काही दिवस धो धो कोसळणाऱ्या पावसाची आता नाशिकला भीती का, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्याचे कारण आहे अरबी समुद्रात निर्माण झालेली कमी दाबाच्या पट्ट्याची हवामान प्रणाली.

मुंबई किनारपट्टीवरुन रविवारी रात्रीतून ही प्रणाली ईशान्येकडे आतल्या भागात सरकली. सोमवारी हे कमी दाब क्षेत्र असलेली वावटळ किंवा भोवरा (व्हर्टेक्स) मुंबईच्या उत्तरेला आणि पालघरमधील सफाळेच्या पूर्वेला वाड्याच्याजवळ कार्यरत राहिले. सोमवारी दिवसभर पालघर आणि घाटांवर व्हर्टेक्समुळे पावसाचा तुफानी मारा सुरू राहीला. रात्रीतून पुन्हा हे व्हर्टेक्स मुंबई-पालघर पासून दूर, उत्तर-मध्य महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करण्याची शक्यता आहे. मुख्यत्वे ताशी 50-70 किमी वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे ही प्रणाली वाहून नेत आहेत आणि मार्गात अतिवृष्टीच्या सरी कोसळवत आहेत.



या वावटळीमुळे माळशेज-इगतपुरीच्या दक्षिणेला पावसाचे प्रमाण जास्त होत जाईल. नंतर ही वावटळ रात्रीतून नाशिकच्या दिशेने सरकेल, त्यामुळे मंगळवारी या भागात पावसाचा जोर वाढेल. आता हळूहळू मुंबई महानगर क्षेत्रातील पावसाचा जोर कमी होत जाईल.
पाऊस आता अंतर्गत भागांत आणि किंचित उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 2 दिवसांत सौराष्ट्र, मध्य प्रदेश, विदर्भ आणि अंतर्गत महाराष्ट्रात अतिवृष्टी होईल, तर सौराष्ट्रात पावसाचा जोर प्रचंड असेल. पूर्व राजस्थान, किनारपट्टी महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात 7 ते 8 जुलै दरम्यान कमी प्रमाणात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. कमी दाब प्रणालीमुळे अंतर्गत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये पावसाची शक्यता वाढणार आहे. आठवडाअखेर मात्र बाष्पयुक्त वाऱ्यांमध्ये तात्पुरती घट झाल्यामुळे महाराष्ट्रभरातून पाऊस तुलनेने कमी होण्याची शक्यता आहे. नंतर पाऊस काही काळ विश्रांती घेण्याचीही शक्यता आहे.
तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल
















