बाजी-फुलाजी प्रथमच राजगडावर येत होते. गडाच्या पहिल्या दरवाज्याशी ते आले. दरवाज्यावर चार भालेकरी पहारा करीत होते. त्यांच लक्ष बाजी, फुलाजी, यशवंत आणि पाच शिलेदार यांच्याकडं गेलं. पहारेकऱ्यांनी बाजींना मुजरा केला.
दरवाज्याच्या देवडीवर बसलेला एकजण बाजींच्या सामोरा आला. नम्रतेनं हात जोडून म्हणाला.
‘आपलं नाव?’
‘आम्हाला बाजीप्रभू देशपांडे म्हणतात.’
‘गाव?’
‘सिंद गावचे आम्ही.’
‘गडावर येण्याचे प्रयोजन?…’
बाजीप्रभू मनातून अस्वस्थ झाले होते. फुलाजी, यशवंतचा संताप वाढत होता. आपला संयम आवरत बाजींनी उत्तर दिलं,
‘शिवाजी राजांनी आम्हांला बोलावलं होतं. राजांना आम्ही आल्याची वर्दी द्या.’
दरवाज्याच्या देवडीकडं बोट दाखवीत तो इसम म्हणाला,
‘आपण थोडा वेळ तिथं बसावं. मी वर्दी देऊन येतो.’
यशवंतला राहवलं नाही,
‘अहो! आमचं बाजी राजांचं सरदार हाईत.’
त्या माणसाच्या चेहऱ्यावरची रेषही बदलली नाही. डोक्याला पागोटं, मांडचोळणा घातलेल्या त्या माणसाच्या गळ्यात मोठी चांदीची पेटी लटकत होती. तो शांतपणे म्हणाला,
‘आपण थोडा वेळ थांबावं मी वर्दी देऊन येतो.’
त्या माणसाचा अडाणी वेष आणि शुद्ध बोलणं यावर बाजी, विचार करीत असता संतापलेला यशवंत म्हणाला,
‘ही काय रीत झाली?’
बाजी हसले. म्हणाले,
‘तसं नाही, यशवंत. ही गडाची शिस्त आहे. परका माणूस चौकशीविना गडावर घेणं हे चूक आहे.’
थोड्याच वेळात तो इसम आणि तानाजी झपझप पावलं टाकीत येताना दिसले. तानाजी-बाजी भेटले. तानाजी बाजींना म्हणाला,
‘आमच्या बहिर्जींनी अडवलं, वाटतं!’
‘बहिर्जी?’ बाजी त्या इसमाकडं पाहत म्हणाले.
‘होय! मीच बहिर्जी नाईक!’ बहिर्जी म्हणाले.
‘तरीच! मी तोच विचार करीत होतो. भाषा शुद्ध आणि वेष मावळ्याचा—कळत नव्हतं. दादा! हे बहिर्जी नाईक. राजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख, आणि राजांचे अत्यंत विश्वासू.’
तानाजी म्हणाला,
‘चलावं.’
तानाजीसह सर्वजण गडावर प्रवेश करते झाले.
गड अत्यंत स्वच्छ होता. गडाच्या इमारती निरखीत बाजी जात होते. तानाजी गडाची माहिती देत होते.
संजीवनी माचीवर येताच तानाजींनं सांगितलं,
‘या गडाला सुवेळा माची हाय. तशीच ही संजीवनी माची. ही माची बांधत असता एकाएकी दारूचं कोठार पेटलं. हवालदार उडून पडला. पन जिता ऱ्हायला, तवा राजांनी ह्या माचीचं नाव संजीवनी ठेवलं. अजूनबी बालेकिल्ल्याचं काम चालू हाय.’
‘राजे केव्हा भेटणार?’ बाजींनी विचारलं.
‘राजांनीच सांगितलं, तुमांस्नी गड दावून वाड्यावर घेऊन या.’
वाड्याच्या सदर-सोप्यावर खूप माणसं जमली होती. त्यांत येसाजी, मोरोपंत, अनाजी, फिरंगोजी, नेताजी, तुकोजी वगैरे राजांचे मानकरी दिसत होते.
बाजी-फुलाजी सदरेवर जाताच मोरोपंतांनी त्यांचं स्वागत केलं. एवढी माणसं जमा होऊनसुद्धा वातावरण गंभीर होतं.
मोरोपंतांनी सांगितलं,
‘आपण येताच राजांनी आपल्याला व फुलाजींना आत घेऊन येण्याची आज्ञा दिली आहे. आपण चलावं.’
यशवंताला सदरेवर सोडून बाजी, फुलाजी वाड्यात प्रवेश करते झाले. ज्या महालात राजे होते, तिथं बाजी, फुलाजी गेले आणि बाजींच लक्ष राजांच्या शेजारी बसलेल्या जिजाबाईंच्याकडं गेलं. बाजी जिजाबाईंच्याकडं पाहत होते. बाजींना जाणवली, ती जिजाबाईंची नजर. शिवाजी राजांच्या भेदक दृष्टीचं रहस्य बाजींना उलगडलं होतं. बाजी, फुलाजींनी राजांना, जिजाबाईंना मुजरे केले.
‘या, बाजी! आम्ही तुमचीच वाट पाहत होतो.’ फुलाजींकडं बोट दाखवून राजांनी जिजाबाईंना सांगितलं, ‘मासाहेब, हे फुलाजी; बाजींचे थोरले बंधू.’
जिजाबाई म्हणाल्या,
‘बाजी, फुलाजी राजांनी आम्हांला सारं सांगितलं आहे. तुम्ही आम्हांला मिळालात, याचं समाधान वाटतं. तुम्ही मोहनगड नामी उभा केलात, असं राजे म्हणाले.’
धीर करून बाजींनी सांगितलं,
‘आऊसाहेब, ते राजांचं कौतुक! पण राजगड बघितला आणि गर्वहरण झालं.’
जिजाबाईंच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.
राजे म्हणाले,
‘बाजी, फुलाजी, आम्ही तुम्हांला इथं बोलवलं. आमचा अंदाज खरा ठरला. आमच्यावर एक परचक्र चालून येत असल्याची बातमी आली आहे.’
‘परचक्र?’ बाजी उद्गारले.
‘हो! आम्ही इथले गड घेतले. वतनदारांच्या तक्रारी आदिलशाहीत जाऊन पोहोचल्या… आणि कळस म्हणजे, आम्ही फत्तेखानाचा पराभव केला. झोपलेल्या आदिलशाहीला जाग आली आहे. आदिलशाहीचा खासा सरदार अफजलखान आमच्यावर चालून येतो आहे.’
‘बातमी खरी आहे?’ बाजींनी विचारलं.
‘त्यात शंका नाही. आता उसंत घेऊन चालणार नाही. रात्र वैऱ्याची आहे, हे आम्ही जाणतो.’
‘येवढी अफजलखानाची भीती?’ बाजी छाती रूंदावत म्हणाले.
‘बाजी, शत्रू नेहमी पारखून घ्यावा. अफजलखान साधा नाही. तो वाईचा सोळा वर्ष सुभेदार होता. त्याला हा मुलूख परका नाही.’
‘मग आम्ही का परके आहोत? त्याला या मुलखातलं झाडन् झाड परिचयाचं असेल.’ फुलाजी न राहवून बोलले, ‘पण आम्हांला गवताची काडीन् काडी ठाऊक आहे, म्हणावं.’
राजे हसले.
‘फुलाजी, आपण योग्य तेच सांगितलंत! पूर येतो, तेव्हा झाडं जातात, पण लव्हाळी वाचते. बाजी! पण हा शत्रू प्रबळ आहे. त्यानं येण्याआधीच खूप जखमा आमच्या छातीवर कोरल्या आहेत.’
‘जखमा?’ बाजी उद्गारले.
‘हाच तो अफजल की, ज्यानं कट करून बाजी घोरपडे आणि मुस्ताफखानामार्फत आमच्या वडिलांना, दाजीसाहेब महाराजांना जिंजीच्या छावणीत बेसावध, निद्राधीन असता पकडलं आणि याच उन्मत्त अफजलखानानं दाजीसाहेब महाराजांच्या पायांत बेड्या चढवून त्यांची विजापुरात धिंड काढली.’
‘राजे!’ जिजाबाईंच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
‘मासाहेब, कनकगिरीच्या वेढ्यात याच आफझलनं आमच्या दादासाहेबांचा, संभाजीराजांचा वध करवला. हा शत्रू अत्यंत खुनशी आहे. त्यानं अनेकांचे विश्वासघातानं वध केले आहेत.’
‘म्हणून तह करायचा?’ मोरोपंतांनी विचारलं.
‘मुळीच नाही! अफझलभेटीची ही संधी आम्ही मुळीच सोडणार नाही. तर तो राहील, नाहीतर आम्ही!’
राजांची ही करारी मुद्रा पाहून सारे भारावून गेले.
जिजाबाई म्हणाल्या,
‘राजे, उतावीळपणानं काही करायला जाऊ नका.’
‘मासाहेब, आम्ही उतावीळ नाही. करू, ते विचारानंच करू. पण ही संधी सोडली, तर स्वराज्याचा डाव परत मांडता येणार नाही. आम्ही सदरेवर जातो. बाजीss’
‘जी!’
‘चला, सदरेवर जाऊ. आपली सारी ताकद किती भरते, याची खात्री करायला हवी. ते झालं, की प्रतापगड गाठायला हवा.’
‘जशी आज्ञा!’ बाजी म्हणाले.
मोरोपंत, बाजी, फुलाजीसह राजे सदरेवर गेले, तरी जिजाबाई सचिंतपणे बैठकीवर बसून होत्या.
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया )