राजे फुलाजींसह चालत होते. कोवळ्या सूर्यकिरणांत उजळला जाणारा किल्ला पाहत होते. ठायी ठायी धारातीर्थी पडलेल्या वीरांभोवती मूक अश्रू ढाळत बसलेल्या मावळ्यांच्याकडं राजांचं लक्ष जात होतं. ते दृश्य पाहून राजांचं मन विषण्ण बनलं होतं.
‘बाजी, आपापसांतल्या कलहात आपली गुणी माणसं कामी येणं यासारखं दुःख नाही. जगदंबेची इच्छा!’ राजांनी स्वतःला सावरलं. ते म्हणाले, ‘बाजी! तुम्ही, फुलाजी, आबाजी जखमी आहात. प्रथम त्या जखमांकडं लक्ष द्या.’
‘आपण वाड्यात चलावं.’
‘नाही, बाजी! तिथं आम्ही आता जाणं योग्य होणार नाही. ती मंडळी शोकाकुल आहेत. आम्ही काही काळ इथं कुठंतरी थांबू आणि परत जाऊ.’
‘एक विनंती आहे.’
‘बोला.’
‘आपण आमच्या वास्तव्यस्थानी चलावं.’ फुलाजींनी विनंती केली.
‘चला.’
राजांनी फुलाजींच्या घरी जाताच आपल्या वीरांची चौकशी केली. जखमींना औषधोपचार करवले.
राजे म्हणाले,
‘बाजी, आबाजी, फुलाजी, आता तुमची पाळी. अंगरखे उतरा. जखमांची काळजी घ्यायला हवी.’
‘आपण गेल्यावर…’ बाजी म्हणाले.
नकारार्थी मान हलवीत राजे म्हणाले,
‘ते चालणार नाही. तुम्हाला आता उसंत नाही. पडलेल्या वीरांची विल्हे लावायला हवी. इथ वैद्य आहेत ना?’
फुलाजी म्हणाले,
‘वैद्य कशाला? जुनं तूप लावलं, की झालं. दोन दिवसांत जखमांवर खपली धरेल.’
‘तसं करा.’
जुनं तूप म्हणताच आबाजींचा चेहरा गोरामोरा झाला. ते म्हणाले,
‘राजे s s’
राजे हसून म्हणाले,
‘ते चालणार नाही.’
सेवकांनी थाळीतून जुनं तूप आणलं.
तिघांनी आपले अंगरखे काढले.
राजांनी तिघांच्या जखमा पाहिल्या. जखमा फार खोल नव्हत्या.
आबाजीच्या जवळ सेवक आले. आबाजीला घाम फुटला होता. सेवक जखमांवर तूप भरू लागले. जुन्या तुपाची आग शरीरात भिनत होती. राजांच्या अस्तित्वामुळं आबाजीला ओरडता येत नव्हतं, पण होणारा दाह तोंडावर प्रगटत होता.
राजांनी विचारलं,
‘आबाजी, येवढा त्रास होतो?’
डोळ्यांत पाणी भरलेला तरुण आबाजी म्हणाला,
‘महाराज, खरं सांगू? लढताना मेलेलं परवडतं; पण हे जुनं तूप नको!’
राजे हसले.
आबाजीच्या जखमा भरून होताच बाजींच्याकडं सेवक गेले.
बाजींच्या दंडावर एक जखम खोलवर उतरली होती. सेवक त्या जखमेत तूप भरत होते. पण बाजींचा चेहरा शांत होता. त्यावर वेदनेची थोडीही जाणीव दिसत नव्हती.
राजांनी आश्चर्यानं विचारलं,
‘बाजी, त्रास होत नाही?’
‘राजे, त्रास कसला? ज्याला वार झेलण्याची सवय असते, त्याला वेदनेचा सराव असायला हवा!’
‘व्वा ss!’ राजे प्रसन्नपणे म्हणाले, ‘काय सुरेख जबाब दिलात! आम्ही जरूर हा ध्यानी ठेवू.’
तिघांचे औषधोपचार झाल्यानंतर राजे उठले.
‘आम्ही आता चलतो. बाजी, रोहिडा बांदल देशमुखांच्याच ताब्यात राहील. आता तुम्ही आमचे. तुम्ही गडाची जोखीम घ्या. आम्ही आमच्याबरोबर आमची शिबंदी घेऊन जात आहो.’
‘पुरी?’ फुलाजींनी विचारलं.
‘हो! आमचा एकही माणूस या गडावर राहणार नाही. जेव्हा कोणी आपले म्हणून आम्हाला भिडतात, तेव्हा आमच्या मनात शंका नसते. बाजी, गड सांभाळा.’
राजांच्या त्या निर्णयानं बाजी-फुलाजी थक्क झाले होते.
राजे गड उतरले. आपल्या शिबंदीला आज्ञा दिली.
बाजींचा निरोप घेत असता बाजी म्हणाले,
‘राजे, वाटेवरच आमचं सिंद आहे. घरी पायधूळ झाडलीत, तर…’
‘नाही, बाजी! तो आग्रह आता धरू नका. कृष्णाजी बांदलांचं आणि वीरांचं क्रियाकर्म पार पडू दे. नंतर केव्हाही आम्हाला बोलवा. आम्ही आनंदानं आपल्या घरी येऊ. त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहो.’
बाजींचा निरोप घेऊन राजे स्वार झाले आणि आपल्या अश्वदळासह राजगडाच्या दिशेनं दौडू लागले.
भरल्या नजरेनं बाजी-फुलाजी दूर जाणाऱ्या अश्वपथकाकडे पाहत होते.
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया )