पुण्याच्या मैत्री स्वयंसेवी संस्थेतर्फे आयोजित शिबिरासाठी मेळघाटातील अतिदुर्गम अशा अदिवासी भागात भेटीसाठी गेल्या वर्षी 23 ते 27 सप्टेबर दरम्यान आम्ही गेलो होतो. तेथील आदिवासींची जीवन पद्धती, शेती पद्धती, रीतीरिवाज, परंपरा आदी बाबींचा बारकाईने अभ्यास करता आला. त्यांच्या अनेक गोष्टी या मुळ प्रवाहातील समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे जाणवले. याच गोष्टींचा आढावा थेट मेळघातून मांडला आहे.
मेळघाटात आदिवासी शेतकरी बांधव आजही निसर्गाला अनुकूल असणार्या शेती पद्धतीचा वापर करतात. ते कुटकी, ज्वारी, सावरया, कोदो, भात या पारंपरिक पिकांसोबतच मका, सोयाबीन, हरभरा आणि गहू ही पिके घेतली जातात. ज्या शेतकर्यांना पाणी देण्याची व्यवस्था आहे ते हरभरा आणि गहू ही पिके घेतात. येथील शेतकरी घरचेच बियाणे वापरतात. मागील एका दशतकात हळूहळू संकरित बियाण्यांनी येथील शेतीत शिरकाव केला आहे. येथील शेतकरी मुखत्वे तूर हे पीक आंतरपीक पद्धतीने घेतात. मेळघाटात वनसंपदा मुबलक असल्यामुळे शेती करण्यासाठी लाकडी अवजारांचाच वापर केला जातो. नांगर हा लाकडी असून फक्त फाळ त्याला लोखंडी वापरला जातो. अंतरमशागतीसाठी डवरे, कोळपे आणि वखर यांचा वापर केला जातो. ही साधने शेतकरी स्वतःच तयार करतात. ते कोणावरही अवलंबून राहत नाहीत. मेळघाटात भाजीपाला पिके हे खरीपातच घेतले जाते. पावटा, मिरची, भोपळा, गवार, पालक, मेथी ही भाजीपाला पिके घेतली जातात. ज्या आदिवासी शेतकर्यांकडे सिंचन करण्यासाठी सिंचनाची साधने उपलब्ध आहेत. ते थोड्याफार प्रमाणात बागायती भाजीपाला करतात.
मेळघाटात विहिरीचे प्रमाण तुरळक आहे. विहिरीचे पाणी उपसण्यासाठी मुख्यत्वे तेलपंपाचा वापर तुरळक ठिकाणी केला जातो. वर्ष 2015 च्या नंतर शासनाच्या माध्यमातून सौर पंपाचे वाटप करण्यात आले. परंतु, शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने प्रसंगी लोकवाटा भरण्याएवढे देखील पैसेे त्यांच्याकडे नसतात. ज्या शेतकर्यांनी शासनाचा लोकवाटा भरला त्यांना सौरपंप देण्यात आले. पुण्याच्या मैत्री स्वयंसेवी संस्थेतर्फे रुईपठार (ता.चिखलदरा) गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी सौरपंप देण्यात आला. चिखलदरा तालुक्यातील 20 ते 25 गावात मध्यप्रदेश विद्युत मंडळाकडून वीज पुरवठा करण्यात येतो.
आज आपण शेतीमध्ये रासायनिक खते आणि औषधे यांचा वापर भरमसाठ करून शेतीची अवस्था वाळवंटासारखी करत आहोत. आपण शेती ही उपभोग वस्तू असल्याप्रमाणे वापरीत आहोत. परंतु, आजही मेळघाटातील आदिवासी समाज शेतीचा वापर हे फक्त रोज लागणारे धान्य पिकविण्यासाठीच करतो. जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतीला शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे शेतीची अवस्था चांगली आहे. वनसंपदा विपुल असल्यामुळे जनावरांसाठी जंगलातील गवत, झाडापाला खाद्यासाठी मिळते. मेळघाटातील शेतकरी मुख्यत्वे खरीप हंगामातील पिके घेतात. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मेळघाटातील बहुतेक गावातून फक्त जेष्ठ नागरिक असतात. बाकी लोक सहा महिने पैसे कमविण्यासाठी आपले गाव सोडून इतर भागात जातात. शहरातून मातीकाम करण्यासाठी तसेच नागपूर परिसरात संत्रा तोडणीसाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले जाते. मेळघाटातील अदिवासी बांधवांचा वार्षिक प्रपंचाचा खर्च हा ह्या स्थलांतरातून मिळवलेल्या पैशातून केला जातो. आजघडीला ज्याला आपण मुख्य प्रवाहातील लोक म्हणतो, असा समाज पैशासाठी हपापलेला आहे. परंतु, मेळघाटातील या भागात आजही पोटापुरते मिळाले तरी सगळे आनंदी आहे. आजघडीला संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा विषय मोठा चर्चेचा होऊन प्रशासनापुढे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. परंतु आजही मेळघाटातील पूर्ण परिसरांत आत्महत्येसारखा एकही प्रकार घडलेला नाही. आधुनिक म्हणविणार्यांनी या आदिवासी बांधवाकडून काही बोध घेण्याची वेळ आली आहे.
मेळघाटात मुख्यत्वे चार जमाती आहेत. यात जवळपास 80 टक्के कोरकू ही जमात आहे. कोरकुंचा मुख्य व्यवसाय शेती आणि मजूरी आहे. गोंडजमातीचा मुख्य व्यवसाय जनावरे सांभाळणे आणि शेती करणे आहे. मेळघाटात मुख्यत्वे जनावरे ही दुधासाठी पाळली जात नाही. त्या जनावरांपासून उत्पत्ती करून ती जनावरे बाजारात विक्रीसाठी पाठवली जातात. मेळघाटात मुख्यत्वे बैल जोपासण्याची परंपरा ही पुरातन आहे. तेथील स्थानिक देशी बैल आजूबाजूच्या परिसरात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात पाठवली जातात आणि त्यातून अर्थार्जन केले जाते. त्यामुळे मेळघाटात अदिवासी बांधवांच्या रोजच्या आहारात दुधाला दुय्यम स्थान आहे. बलई (अनुसूचित जाती) या जमातीचा मुख्य व्यवसाय शेतमजुरी हा आहे. यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. गवळी या जमातीचा मुख्य व्यवसाय पशुपालन करून दुध व्यवसाय करणे हा आहे. मेळघाटात मुख्य समाज हा कोरकू हाच आहे. बाकी जमाती तुरळक आहे. इतर ठिकाणी समाज पैशाच्या अधीन जाऊन मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनतेकडे मोठ्या प्रमाणात चालला आहे.
मेळघाटातील युवकांची शरीरसंपदा वाखाणण्याजोगी आहे. मेळघाटातील युवकांना निसर्गदत्त शरीरसंपदा मिळालेली असल्यामुळे त्यांना थोड्याशा मार्गदर्शनाची गरज आहे. आज शहरी भागात लाखो रुपये खर्च करून खेळाडू घडविण्यासाठी अनेक संस्था काम करीत आहेत. तरी या संस्थांनी उपजत गुण असलेल्या युवकांना मेळघाटात जाऊन प्रशिक्षण दिले तर भारतातून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू सहज घडू शकतील. फक्त इच्छाशक्तीची गरज आहे कारण, मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या अपेक्षा आपल्यापेक्षा अगदीच नगण्य आहे. आता हळूहळू शासनाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य सुविधा मेळघाटात पोहचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे युवकांचा शिक्षणाकडे ओढा वाढला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या माध्यमातून मेळघाटातील अनेक युवक पदवी मिळविण्याकडे वाटचाल करीत आहे. मेळघाटातील युवक आणि युवती शिक्षित होत असल्यामुळे व्यसनाचे आणि अंधश्रद्धेेचे प्रमाण हळूहळू कमी होत चालले आहे. मेळघाटात आता हळूहळू रस्त्याचे कामे देखील चालू आहेत.
मेळघाटात काही भाग हा व्याघ्रप्रकल्पात येत असल्यामुळे तेथे विकास कामांसाठी अडचणी येतात. आधुनिकतेच्या नावाखाली आज प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात भस्मासुरासारखे वाढत चालले आहे. त्यावर मोठमोठी चर्चासत्रे आणि परिसंवाद आयोजित केले जातात, तरीही नागरिक अजून प्रदुषणाप्रती जागृत झालेला दिसत नाही. त्या मानाने मेळघाटात प्रदूषणाचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. मेळघाटात शहरी भागातील फिरायला जाणारे शहरी नागरिक प्लॅस्टिकचे साम्राज्य मेळघाटात पसरवत आहे. याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. कारण, आजघडीला शहरी आणि निमशहरी भागातील प्रदूषणाचा मोठा परिणाम मेळघाटातील निसर्गावर दिसत आहे. येथील पर्जन्यमान झपाट्याने कमी होत आहे. मेळघाटातील अदिवासी बांधवांचा काहीही दोष नसतांना त्याची शिक्षा त्यांना विनाकारण मिळत आहे. मेळघाटात जसजसे रस्त्याचे जाळे विणले जात आहे. तसे तेथे शहरी समस्या पोहचण्यास सुरुवात झाली आहे. सुधारणेबरोबर समाज विघातक व्यसने तेथे पोहचणे ही तेथील समाजाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे.
मुलींचा सन्मान…
कोरकू जमातीत विवाहाच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत वरपिता वधुपित्याकडे जाऊन विचार विनिमयाने आपल्या मुलामुलींचा विचार घेऊन लग्न ठरविले जाते. दुसरी पद्धत अशी आहे की, मेळघाटात काही गावांतून यात्रा भरविल्या जातात त्या यात्रेतून फक्त युवक आणि युवतीच सहभागी होतात. ज्या युवकाला जी युवती पसंत पडली त्या युवकाने त्या युवतीला विड्याचे पान द्यायाचे असते. त्या युवतीने विड्याचे पान स्वीकारले तर तो युवक त्या युवतीला आपली पत्नी म्हणून घरी घेऊन जाऊ शकतो. युवकाचे कुटुंबीय त्या युवतीचा स्वीकार करतात. ती यात्रा संपल्यानंतर मुलीकडचे वरपित्याकडे जाऊन त्या मुलीला दंड लावतात. त्यानंतर त्या मुलीचा स्वीकार केला जातो. आज आधुनिक समाजाला मुलीचा जन्म मान्य नाही. परंतु मेळघाटातील अदिवासी बांधवांच्या आजही मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव केला जात नाही. मुलाइतकाच मुलीलाही सन्मान दिला जातो. यातून आधुनिक समाजाने बोध घेण्याची वेळ आलेली आहे. मेळघाटातील अदिवासी बांधवांच्या वरदक्षिणा (हुंडा) अजिबात मान्य नाही. याउलट वरपिता वधुपित्याला जी त्यांच्या आर्थिक परिस्थिनुसार शक्य असेल तितकी पैशाच्या स्वरुपात किंवा वस्तूच्या स्वरुपात मदत करतात. मेळघाटात आत्महत्येप्रमाणेच हुंडाबळीचे प्रमाण शून्य आहे. कुटुंबातील काही वाद असतील तर जेष्ठ नागरिक ते सामोपचाराने सोडवतात. मुलगी झाली तरी मुलाप्रमाणेच आनंद व्यक्त केला जातो. आम्ही त्या परिसरातील अनेक घरात जाऊन या गोष्टीचा प्रत्यय घेतला. मी प्रत्यक्ष काही महिलांशी याविषयी चर्चा केली. एकदा लग्न झाल्यानंतर मला मुलगी पसंत नाही म्हणून घटस्फोट घेणारे नसल्यात जमा आहे.
मेळघाटातील अदिवासी बांधव निसर्गाप्रती आपली भावना व्यक्त करण्यासाठी होळीच्या सणाला गावातील वयोवृद्ध जेष्ठ नागरिक त्या परिसरातील जंगलांच्या चारही बाजूंच्या सीमेवर जाऊन पूजा करतात. त्या पुजेस गावबांधणी असे संबोधले जाते. या कार्यक्रमात त्यांच्या गावातील सर्व महिला पुरुष सहभागी होतात. महाशिवरात्रीच्या अगोदर मेळघाटात महापूजेचा एक कार्यक्रम केला जातो. या कार्यक्रमाच्या निमित्याने अदिवासी महिला आपल्या घराची पूर्ण स्वच्छता करून गावाच्या सीमेवर जांभळाच्या झाडाची फांदी तोडून तो कचरा सर्व शिवेवरती झाकून ठेवला जातो. यासाठी गावातील जेष्ठ नागरिक सर्वांचे मार्गदर्शन करतात. कार्यक्रमात गावातील लहान-थोर सामील होतात. आम्ही ज्या चिखलदरा परिसरातील 20 ते 25 गावात फेरफटका मारला तेव्हा अम्हाला कोणत्याच गावात देवाचे मंदिर किंवा सभामंडप कोठेही नजरेस आले नाही. प्रत्येक गावात उंचच्या उंच एक खांब रोवलेला असतो त्याचीच हे अदिवासी बांधव पूजा करतात, त्याला ते मेघनाथ म्हणून संबोधतात. मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप मोठे आहे. यावर आदिवासी बांधवांच्या कलाने काम करण्याची वेळ आली आहे. जेणेकरून त्यांच्या भावना न दुखवता त्यांना त्या अंधश्रद्धेच्या विळख्यातून मुक्त करणे गरजेचे आहे.
आजही मेळघाटात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला जात नाही. गावातील एक प्रमुख व्यक्ती गावातील तंटे स्थानिक पातळीवरच मिटवितो. त्यामुळे समाजात चांगला एकोपा आहे. या एकोप्याचा फायदा घेऊन येथील आदिवासी शेतकरी मित्रांना एकत्र करून शासनाच्या गटशेतीचे एक आदर्श मॉडेल उभे करणे सोपे आहे. जेणेकरून शासनाच्या विविध योजना अदिवासी शेतकरी बांधवापर्यंत पोहचविणे सोपे जाईल. कारण मेळघाटातील अदिवासी समाजात पक्षीय राजकारणाचा फारसा प्रभाव दिसत नाही. त्यामुळे गावात गटतट नाहीत. प्रशासनाचे अनेक विभाग मेळघाटातील या अदिवासी बांधवापासून कोसो दूर आहे. त्यामुळे शासनाच्या अनेक योजनांपासून अदिवासी बांधव वंचीत राहात आहेत.
मेळघाटात मुख्यत्वे होळी, पोळा, दिवाळी, आखाडी हे सण प्रामुख्याने साजरे केले जातात. अदिवासी आपल्या रोजच्या आहारात भात, मासे, मक्याची भाकरी, गव्हाची पोळी, तसेच तुरडाळ, मसूरडाळ, चनाडाळ याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. हंगामाप्रमाणे उपलब्ध रानभाज्यांचाही वापर केला जातो. शेतात पिकविलेल्या पावटा, मिरची, लालभोपळा, गवारी, पालक, मेथी या भाज्यांचा आहारात समावेश केला जातो. संमिश्र कडधान्य, तृणधान्य, आणि भाज्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथील युवक बलदंड आहेत. आज शहारातील नागरिकांच्या आहारात असा संमिश्र वापर नगण्य होत चालला आहे. मेळघाटात मुख्यत्वे एकत्र कुटुंब पद्धतीच आहे. काही काही घरात आम्ही गेलो तेव्हा पणजोबा, आजोबा, वडील आणि मुलगा अशा चार पिढ्या गुण्यागोविंदाने नांदताना आम्ही बघितल्या. जसे शहरी लोकांचा वावर मेळघाटात वाढत चालला आहे तसे तेथे विभक्त कुटुंब होण्यास सुरुवात झाली आहे. मेळघाटातील कुटुंबांत आजही घरातील निर्णय घेतांना महिलांचा विचार केला जातो. कुटुंब व्यवस्था पुरुषप्रधान असली तरी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सन्मान दिला जातो.
येथील महिलांना आभूषणाची खूप आवड आहे. मागील दहा वर्षापर्यंत तेथील महिला भगिनी सर्व आभूषणे चांदीची वापरीत जसे हातात चांदीचे गोट, कानात आणि नाकात चांदीचीच आभूषणे वापरीत असत. परंतु मागील दहा वर्षापासून मेळघाटातील अदिवासी माता भगिनी सोन्याचे मंगळसूत्र वापरीत आहे. युवतींच्या कानात, नाकात, गळ्यात आता सोन्याची आभूषणे आली आहेत. मागील दहा वर्षापूर्वी मेळघाटातील अदिवासी बांधवांचा पोशाख पुरुषांचा गुडघ्यापर्यंत सुती धोतर आणि वर खमीस आणि डोक्याला आर्थिक परिस्थिती प्रमाणे मुंडासे किंवा उपरणे बांधलेले असे. महिला सुती गोल लुगडे नेसत असत. परंतु मागील एक दशकापासून शहरीकरणाचा परिणाम हळूहळू मेळघाटात निदर्शनात येत आहे. नवीन युवक युवती पँट आणि शर्ट तसेच पंजाबी ड्रेस वापरीत आहेत. आजही मेळघाटात आम्हाला केशकर्तनालय दिसले नाही आम्ही त्या परिसरात युवकांशी चर्चा केली तेव्हा दाढी किंवा हेअर कटिंग ते स्वतःच एकमेकांची करतात.
सणाच्या दिवशी गव्हाच्या गोड पुर्या, तांदुळाचा भात, मासे किंवा कोंबड्याचे मटन, घरात सदस्य संख्या जास्त असेल तर बोकडाच्या मटनाचा ही वापर केला जातो. मेळघाटात मुख्यत्वे मोहाच्या झाडांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथे मोहाचीच दारू पाडली जाते. घरातील जेष्ठ पुरुष आणि महिला दारू पितात. मात्र व्यसनामुळे वाया जाणारे निदर्शनास येत नाही. पुरुषप्रधान संस्कृती असली तरी आठवडी बाजाराला पुरुष आणि स्त्रिया बरोबरीने सहभागी होतात. मेळघाटातील या अतिदुर्गम भागात स्त्रियांच्यावर अत्याचाराचे प्रमाण अजिबात नाही. आम्ही त्या परिसरात फिरत असताना तेथील युवकांशी चर्चा केली असता युवती किंवा महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण अजिबात दिसत नाही. त्यामुळे आमच्या चार दिवसाच्या मेळघाटातील भटकंतीच्या नंतर एक यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. की, मुळ प्रवाहात जगणारे आपण खरोखर सुधारलो आहोत का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.