शेतीपूरक व्यवसाय म्हणूनही कृषी पर्यटन क्षेत्र नवीन संधी आहे. शहरी लोकांना ग्रामीण जीवन, संस्कृती, परंपरा आदी गोष्टींची ओळख करून देण्यासह शेतकर्याला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे कार्य कृषी पर्यटन उपक्रमामागे आहे. खरे तर शेती हा उद्योग किंवा व्यवसाय नसून ती एक संस्कृती आहे. कृषी पर्यटन म्हणजे कृषी व पर्यटन या दोन क्षेत्रांचा समन्वय आहे. जेथे पर्यटक शेतीला भेट देतील, शेतीच्या विविध पैलू समजून घेतील, शेती कामाचा काही काळ प्रत्यक्ष अनुभव घेतील. कृषी पर्यटन म्हणजे नेमके काय? यासाठी कोणत्या आवश्यक बाबी आहेत? यासाठी कशा प्रकारची गुंतवणूक अपेक्षित आहे? आदी बाबींचा आढावा या कव्हर स्टोरीतून घेतला आहे.
कृ षी पर्यटन हा शेती आणि ग्रामीण आर्थिक विकासास हातभार लावण्यासाठी एक चांगला पूरक व्यवसाय आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र विकसित झाले आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन विकास यासारख्या संस्था देखील आज कार्यरत झाल्या आहेत. या संस्था कृषी पर्यटनचा व्यवसाय करणार्यांसाठी प्रशिक्षण देतात. कृषी पर्यटन केंद्र चालकांना एकत्र आणण्याचा देखील प्रयत्न या संस्थांच्या माध्यमातून होत आहे. नुकतेच कृषी पर्यटन विकास धोरण शासनाने आखल्याने आता या व्यवसायास चालना मिळू शकेल. कृषी पर्यटन केंद्र नोंदणीकृती केल्याने बँका देखील कर्ज मंजूर करू शकतील. शासनाने शेतकर्यांना पर्यटन विभागामार्फत देखील प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कृषी पर्यटन केंद्रांच्या विकासासाठी शासनाच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकर्यांनी कृषी पर्यटन केंद्र सुरू केल्यास ग्रामीण भागातील आर्थिक विकासास चालना मिळू शकेल
कृषी पर्यटन म्हणजे काय?
कृषी पर्यटन म्हणजे काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. यामुळे ही संकल्पना नेमकी काय आहे, हे सुरवातीला समजून घेऊ. हौशी पर्यटक विविध पर्यटन स्थळांचा नेहमी शोधात असतात. विशेषतः शहरातील काँक्रीटच्या जंगलातील लोक निसर्गाचे सान्निध्य शोधत असतात. पर्यटन स्थळांमध्ये त्यांना नावीन्य पाहिजे असते. याच नाविन्याच्या शोधात असणार्यांना कृषी पर्यटन केंद्र उत्तम पर्याय आहे. कृषी पर्यटन म्हणजे शेती व पर्यटनाचा एकत्रित संगम आहे. शेती, निसर्गरम्य वातावरण आणि ग्रामीण जीवन यातील एक वेगळा अनुभव घेण्याची संधी म्हणजे कृषी पर्यटन. शहरी आणि ग्रामीण भागातील अंतर कमी करण्यासाठी कृषी पर्यटन हे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. कृषी पर्यटनाचे एकदिवसीय सहल आणि निवासी पर्यटन सहल असे दोन प्रकार आहेत. एक दिवसाच्या सहलीत पर्यटक सकाळपासून सायंकाळपर्यंत पर्यटन केंद्रात असतात. या दरम्यान मनोरंजनासह सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आदी सुविधा केंद्र चालक पुरवितात. आजच्या धावपळीच्या युगात सर्वांनाच शांतता आणि निवांतपणा हवा असतो. कृषी पर्यटनाच्या केंद्रातून शांतता आणि निवांतपणा मिळू शकतो. यामुळे शांतता आणि निवांतपणा अनुभवण्यासाठी शहरी पर्यटक निवासी पर्यटनाला महत्व देतात.
कृषी पर्यटनाचा उगम
कृषी पर्यटनाचा उगम जगात साधारण 70 वर्षांपूर्वी व्यावसायिक पातळीवर सर्वप्रथम ऑस्ट्रेलियात झाल्याचे मानले जाते. ऑस्ट्रेलियासह ब्राझील, न्यूझीलंड, कॅनडा, इटली या देशांमध्येही कृषी पर्यटन पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात होते. युरोपीय देशांनी तर कृषी पर्यटनाला चालना देऊन त्याला शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यताही दिली आहे. जागतिकीकरणामुळे कृषी पर्यटनाचा विस्तार जगभरात होऊ लागला आहे. भारतात कृषी पर्यटनाची सुरवात करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम बारामतीतील प्रगतशील शेतकरी स्व. आप्पासाहेब पवार यांनी अॅग्री अॅण्ड इको टुरीझम केंद्र सुरू केले होते. कृषी पर्यटला नेरुळ येथील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी व्यापक स्वरूप दिले. त्यांनी हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व शेतकर्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा आहे, हे सिद्ध करून दाखवले.
कृषी पर्यटन केंद्राचा उद्देश
कृषी पर्यटन केंद्राचा उद्देश समजून घेणे देखील आवश्यक आहे. कृषी पूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन केंद्र सुरू करता येऊ शकते. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला चालना देता येईल. ग्रामीण लोककला शहरात पोहचवण्याचे हे माध्यम असून गावातच रोजगार
मिळवून देण्याचे मुख्य साधन होऊ शकेल. शहरी नागरिक व विद्यार्थ्यांना शेती व ग्रामजीवनाची ओळख करून देणे, त्यांना प्रत्यक्ष शेतीचा आणि प्रदूषणमुक्त जगण्याचा अनुभव घेता येईल. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतमाल विक्रीची थेट बाजारपेठ निर्माण होईल. शेतमाल प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन मिळेल. ग्रामीण भागातील पडीक, गायरान व क्षारपड जमिनी कृषी पर्यटनातून उपयोगात आणता येतील. राज्यातील शेतकर्यांनी एकात्मिक पद्धतीने पर्यटन केंद्र सुरू केले तर इतरही स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकतो.
शेतीपूरक फायदेशीर व्यवसाय
ग्रामीण भागात फक्त शेतीवर अवलंबून असणार्या उपक्रमशील शेतकर्याला वर्षातून दोन ते तीन वेळा उत्पादन मिळते. दोन ते तीन महिन्यातून एकदा त्याच्या हातात पैसा येतो. खर्च मात्र रोजचाच असतो. अशा परिस्थितीत शेतीचा उपयोग रोज उत्पन्न मिळवून देणार्या व्यवसायात करता येईल का? या विचारातूनच कृषी पर्यटन या शेतीपूरक व्यवसायाची संकल्पना नावारूपास आली. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात वाढलेली दरी भरून काढता येऊ शकते. शिवाय शेतीतून उत्पादित झालेला सेंद्रिय शेतमाल जागेवरच थेट पर्यटकांना विकून उत्पन्न मिळवणे सहज शक्य आहे. कमी भांडवली खर्चात कृषी पर्यटन हा शेतीपूरक व्यवसाय सुरू करता येतो.
कृषी पर्यटनासाठी शासनाचे धोरण
राज्य सरकारने कृषी पर्यटन धोरणास नुकतीच मान्यता दिली आहे. शेती उत्पादनांना थेट बाजारपेठ, गावातच रोजगाराची संधी, लोककला आणि परंपरांचे दर्शन घडवणे, पर्यटकांना नावीन्यपूर्ण पर्यटन स्थळ उपलब्ध करून देणे, असे उद्देश या धोरणात आहेत. पर्यटन विभागाकडे रितसर नोंदणी करून कृषी पर्यटन केंद्र आता सुरू करता येणार आहे. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे. शेतकरी, कृषी सहकारी संस्था, अशासकीय संस्था, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, शेतकर्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या भागीदारी संस्था किंवा कंपन्या, ग्रामपंचायत, शेतकर्यांचे गट यापैकी कुणीही कृषी पर्यटन केंद्र सुरू करू शकतो.
कृषी पर्यटन केंद्र उभारणी
कृषी पर्यटन केंद्र उभारायचे कसे? त्यासाठी काय आणि किती भांडवल लागेल? असे प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे. शेतकर्यांच्या स्वतःच्या क्षेत्रात आणि त्या आसपासच्या उपलब्ध नैसर्गिक संसाधातून कृषी पर्यटन केंद्र उभारणी करता येते. आसपासच्या नैसर्गिक साधनाचा उपयोग केल्यास पर्यटन केंद्र उभारणीसाठीचा खर्च अत्यल्प येतो. स्थळाच्या सजावटीसाठी उपलब्ध नैसर्गिक साधनाचा वापर सहज करता येतो. परिणामी कमी खर्चात पर्यटकांना अकर्षित करणारे ठिकाण उभारता येते. निवास व्यवस्था आणि इतर काही आवश्यक बाबी निर्मितीसाठी खर्च येतो. यासाठी आवश्यक वित्त पुरवठा नाबार्ड व विविध बँकांच्या मार्फत होवू शकतो. निसर्गाशी जवळीक साधताना पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्याचा संदेश देखील कृषी पर्यटनाच्या माध्यमातून देता येतो. विविध पिकांची लागवड, देखभाल आणि काढणी याचे कुतूहल शहरी पर्यटकांमध्ये असते. रान वनस्पती, रान भाज्या, रानात आढळणारे पशू, पक्षी यांचीही ओळख त्यांना करून देता येते. अस्सल ग्रामीण खेळांचा आनंद देखील लुटता येतो. ग्रामीण कलाकुसर आणि लोककला यांनाही यातून चालना मिळते. स्थानिक लोककलेच्या कार्यक्रमामुळे पर्यटकांची सफर अविस्मरणीय होते. पर्यटकांमुळे लोककलेचे जतन होते आणि कलाकारांना सुद्धा रोजगार उपलब्ध होतो.
केंद्रासाठी आवश्यक गोष्टी
कृषी पर्यटन केंद्रासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत, याचाही विचार करूयात. कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी कमीत कमी राज्य शासनाच्या धोरणानुसारदोन एकर शेती असणे गरजेचे आहे. पर्यटन केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण बाजांच्या घरांची, झोपड्यांची किंवा राहूट्यांची उभारणी आवश्यक आहे. केंद्राजवळ नदी, तलाव किंवा ओढा असल्यास सौंदर्यात आणखी भर पडते. पर्यटकांसाठी विहीर, शेततळे किंवा पोहण्याच्या कृत्रिम तलावाची निर्मिती करता येणे देखील शक्य आहे. शिवारात मोठमोठी वृक्ष असावेत, सोबतच फळ आणि फूल झाडांची लागवड करावी. फेरफटका मारण्यासाठी बैलगाडी किंवा घोडागाडीची व्यवस्था करावी. पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचा उत्तम स्त्रोत असावा. पिण्याचे पाणी हे शुद्धीकरण केलेले असणे सर्वात महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवासासाठी सुरक्षित व्यवस्था आणि नीटनेटके स्वच्छतागृह असावे.
निसर्ग संपन्न ठिकाणाची निवड
निसर्ग संपन्नतेचा वारसा लाभलेले गाव कृषी पर्यटनासाठी आदर्श ठरते. शेती, जंगल, डोंगर, नदी, नाले, ओढे, तळे आणि पाण्याने वेढलेले बेट आदी गोष्टी पर्यटकांना आकर्षित करणार्या आहेत. यामुळे पर्यटन केंद्र उभारणीचा खर्च कमी येतो.
गावामध्ये निसर्गाने भांडवली गुंतवणूक केलेली असते. त्यामुळे कृषी पर्यटन केंद्र उभारणीत गाव महत्वाचा घटक आहे. गावात शहरी सुविधा नसतील तर शहरी पर्यटक गावात रमतात. निसर्गरम्य गावासोबत शेतशिवार संपन्न असणे आवश्यक आहे. प्रांतानुसार शेतीची पद्धत विभागली गेली आहे. विभागलेल्या शेती पद्धतीचे शहरी लोकांना आकर्षण असते. जसे की, कोकणातील भात शेती, जळगावातील केळीच्या बागा, नाशिक मधील द्राक्ष शेतीचे शहरी नागरिकांना आकर्षण असते. वेगवेगळ्या प्रांतातील पर्यटकाला शेतीतील वेगवेगळ्या पद्धतींची माहिती घेण्याची जिज्ञासा असते. त्यामुळे शेतीसंपन्नता पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनते.
विविध गोष्टींची माहिती
कृषी पर्यटन केंद्र चालकाला गावातील आसपासची प्रसिद्ध पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, पर्वत, जंगले, पीक पद्धतीसह शेतीचे आदी गोष्टींची परिपूर्ण माहिती असावी. येणारे पर्यटक ग्रामीण जीवनात मिसळून जावेत यासाठी विविध संकल्पना आणि त्याचे महत्त्व विषद करावे. कृषी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना शिवारफेरी घडवून आणणे महत्वाची बाब आहे. शेतशिवारात फळबागा, गोपालन, शेळीपालन, मधुमक्षिका, फूलशेती इत्यादी बाबी असाव्यात. पर्यटकांना शेतीच्या विविध पैलूंची माहिती देणे अवश्यक आहे. लोककला आणि कलाकुसरीच्या वस्तु ग्रामीण जीवनाचा महत्वाचा घटक आहे. स्थानिक लोकगीत, लोकसंगीत, नृत्य, याचे पर्यटकांना विशेष अकर्षण असते. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी या कार्यक्रमांचे अयोजन करता येवू शकते. गावात भरणारे आठवडी बाजार, स्थानिक स्मारके, ऐतिहासिक वाडे पर्यटकांना दाखवले पाहिजे. पर्यटनासोबत ग्रामीण खेळ देखील आकर्षण असतात. तेव्हा पर्यटकांना गोट्या, भवरा, विटी-दांडू, सुरपारंब्या सारखे ग्रामीण खेळ खेळण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. पर्यटकांना शिवारफेरी करण्यासाठी शक्यतो बैलगाडी अथवा ट्रॅक्टरचा वापर करावा. बैलगाडीमुळे पर्यटकांना खर्या अर्थाने ग्रामीण जीवनाचा आनंद घेता येतो.
पर्यटन केंद्रातील काळजी
कृषी पर्यटन केंद्रात मद्य, मादक पदार्थ, धूम्रपानाला सक्त मनाई असावी. आपल्या केंद्रावर येऊन पर्यटक हुल्लडबाजी करणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. काही नियम बनवून त्यांची अंमलबजावणी करावी. कृषी पर्यटन केंद्रातील निवासाची जागा हवेशीर आणि निसर्गरम्य ठिकाणी असायला हवी. स्वच्छ पाण्याची सोय असावी. जेवणाची सोय उत्तम असायला हवी. बाथरूम आणि शौचालये स्वच्छ असायला हवीत. तिथे भरपूर पाणी पाहिजे. कृषी पर्यटन केंद्रावर लहान मोठे अपघात होऊ शकतात. मधमाश्या, गांधीलमाश्या, साप, विंचू, कुत्रा, मांजर पाहुण्यांना चावण्याच्या घटना घडू शकतात. अशावेळी प्रथमोपचाराची व्यवस्था असलीच पाहिजे. गावातील डॉक्टरही संपर्कात असावेत. म्हणजे काही तात्काळ उपचारांची गरज असेल तर त्यांची मदत घेता येते. केंद्रावर पाळीव प्राणी असतील तर त्यांना लस वेळेवर टोचलेली असली पाहिजे. त्यांची स्वच्छता वेळोवेळो झाली पाहिजे. केंद्राच्या जवळ नैसर्गिक तळे किंवा बॅक वॉटर असेल पोहण्यासाठी रबरी ट्यूब, दोर, लाईफ जॅकेट असायला हवीत. आग लागल्यास आग विझवण्यासाठी सिलिंडर, वाळूने भरलेल्या बादल्या, ठिकठिकाणी पाण्याचे नळ यांची व्यवस्था हवी. केंद्रावर कायमस्वरूपी वीज, टेलिफोन, मोबाईलच्या चार्जिंगची व्यवस्था हवी.
कृषी पर्यटनाचा प्रचार
कृषी पर्यटन केंद्र चालू केल्यावर त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित मार्केटिंग केले पाहिजे. व्यवसायाची माहिती लोकांना देऊन व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी जाहिरात करणे महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून लोकांना कृषी पर्यटन केंद्रावर आकर्षित करण्याचे काम जाहिरातीच्या माध्यमातून करता येते. उदा. पतंग जत्रा, हुर्डा पार्टी, द्राक्ष व आंबा महोत्सव, असे कार्यक्रम आयोजित करून त्याच्या जाहिराती केल्यास मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहचता येते. आजच्या आधुनिक युगात श्राव्य, द़ृक-श्राव्य साधने, इंटरनेट, ई मेल, फेसबुक, व्हॉट्सअॅप, यूट्यूब यासारख्या माध्यमांचा वापर प्रचारासाठी करता येतो. त्याचप्रमाणे वर्तमानपत्र, मासिके यात जाहिरात देऊन किंवा टूर ऑपरेटर कंपनीचीही मध्यस्थ म्हणून नेमणूक करता येईल. परदेशातून भारतात पर्यटक आणण्याचे काम काही कंपन्या करतात. त्यांच्याशी करार करून परदेशी पर्यटकांना आपल्या केंद्रावर आणता येऊ शकते. व्यावसायिक संस्था, शाळा, महाविद्यालये सहलींचे आयोजन करतात. या माध्यमातूनही कृषी पर्यटन केंद्राचा व्यवसाय मिळवता येईल.
मार्ट संस्थेची स्थापना
महाराष्ट्रात विस्तारणारे कृषी पर्यटन, भविष्यातील गरज, पर्यटकांच्या वाढणार्या अपेक्षा या सर्व गोष्टींचा विचार करून 12 डिसेंबर 2008 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट) या संस्थेची स्थापना करण्यात आली. मार्टच्या संस्थापक अध्यक्षा म्हणून सुनेत्रा अजित पवार आहेत. आज राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटनात सुसूत्रता येण्यासाठी मार्ट कार्यशील आहे. महाराष्ट्रात कृषी पर्यटन प्रशिक्षण अभियान राबवून कृषी पर्यटनाविषयी तांत्रिक माहिती, यशोगाथा या माध्यमातून हा व्यवसाय करण्यासाठी मार्टकडून प्रोत्साहन दिले जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या मान्यतेने 16 मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मार्ट या राज्यातील शिखर संस्थेच्या वतीने कृषी पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शेतकर्यांचा या दिवशी कृषी पर्यटन गौरव पुरस्काराने गौरव करण्यात येतो.
विविध वस्तूंचे दालन
पर्यटक वापस जाताना त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी नित्याचा लागणारा शेतमाल देखील विक्री करता येईल. यासाठी थेट शेतमाल विक्रीचे दालन उभारता येईल. गावातील सुतार व लोहार, कुंभार आदी कलाकारांच्या वस्तुंना पर्यटन केंद्रात दालन उपलब्ध करून देता येईल.
कृषी पर्यटन विकास संस्था
या क्षेत्रात मार्गदर्शन करणारी कृषी पर्यटन विकास ही देखील एक संस्था आहे. 16 मे 2004 रोजी कृषी पर्यटन विकास संस्थेची स्थापना झाली. संस्थेच्या माध्यमातून 2005 मध्ये बारामतीत पहिले कृषी व ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र सुरू झाले, अशी माहिती संस्थेचे संस्थापक संचालक पांडुरंग तावरे यांनी दिली. ते म्हणाले दोन वर्ष अथक परिश्रम घेऊन शहरी लोकांपर्यंत कृषी पर्यटन संकल्पना पोचविण्यात आली. त्यामुळे पर्यटक कृषी पर्यटन केंद्रावर जाऊन पर्यटनाचा आनंद घेऊ लागले. कृषी पर्यटनाच्या संकल्पनेला यश आल्याने शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकर्यांना नवा पर्याय उपलब्ध झाला. संस्थेतर्फे कृषी परिषदा, वृत्तपत्र, मासिक, टीव्ही, चर्चासत्र, प्रत्यक्ष भेटी इत्यादींच्या माध्यमातून शेतकर्यांपर्यंत कृषी पर्यटनाची माहिती पोहचवली. मागील पंधरा वर्षांत कृषी पर्यटनाचे जाळे महाराष्ट्रातील कानाकोपर्यात पोहचले.
लेखक:- राहुल कुलकर्णी, औरंगाबाद
कृषी पर्यटन केंद्र माहीती छान आहे .सविस्तर व अधिकृत माहिती मिळणे साठी कोणाला संपर्क करावा लागेल…