महाजन कुटुंबियांनी शेंदळी फळपिकाचे केले जतन
नामशेष होणार्या रानभाज्या संवर्धनाच्या वेडाने काही शेतकर्यांना झपाटून टाकले आहे. अशा शेतकर्यांमध्ये चुंचाळे (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील तरुण शेतकरी उदय महाजन यांचा समावेश होतो. आहारातील विविध पोषक घटक युक्त अनेक रानभाज्या शिवारात सहज उपलब्ध होतात. या रानभाज्यांच्या उपयुक्ततेची जागरूकता नसल्याने यापैकी अनेक भाज्या लुप्त होत चालल्याचे दिसते. यापैकीच शेंदळी ही एक.
या शेंदळीच्या उत्पादन आणि विक्रीचा ध्यास महाजन कुटुंबाने घेतला आहे.
चंचाळे येथील उदय महाजन हे तरुण शेतकरी. त्यांची एकत्रित कुटुंबाची 60 एकर शेती आहे. विहीर व बोअरवेल ही सिंचनाचे साधने त्यांच्याकडे आहेत. बागायती शेती करण्यासाठी पुरेशे व शाश्वत जलस्रोत त्यांच्याकडे उपलब्ध असल्याने संपूर्ण शेती बागायती आहे. उदय यांचे ेवडील बालमुकुंद महाजन व काका अवधूत महाजन असे हे कुटुंब. शेतीत सतत प्रयोग करणारे म्हणून महाजन कुटुंब सर्वत्र परिचित आहे. केळी, काकडी, ऊस, कांदा ही पिके घेण्यात ते अग्रेसर आहेत. अवधूत महाजन यांना शेतीतील यशस्वी प्रयोगांबद्दल उद्यान पंडित पुरस्कार देऊन शासनाने सन्मानित केले आहे.
शेंदळी रानभाजी
खान्देशात शेंदळी नावाने प्रचलित असलेल्या या काकडी वर्गीय फळभाजीला प्रदेशनिहाय वेगवेगळे नाव आहे. काळी भागात शेंदाड म्हणूनही याला ओळखले जाते आणि खरबुजाप्रमाणे खाल्ले जाते. निसर्गतः पेरणी होवून उगवणारी रान फळभाजी आहे. क्वचितच बाजारात दृष्टीस पडणारी शेंदळी खेड्यातल्या शेतकरी कुटुंबाच्या भोजनात अधून मधून आढळते. पावसाळा सरता सरता पक्व झालेल्या शेंदळी फुटून बी शेतात पडते व पुढच्या पावसाळ्यात पुन्हा उगवून येते. अलीकडे तणनाशकांच्या वापरामुळे पूर्वी सहज नजरेस पडणारे शेंदळीचे वेल आता दिसत नाहीत. ही फळभाजी काळाच्या पडद्याआड जाण्याआधी तिचे संवर्धन व्हावे, हा ध्यास उदय महाजन व त्यांच्या कुटुंबाने घेतला असून येत्या काळात शेंदळी ग्रामीण व शहरी कुटुंबाच्या आहारात दिसावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
बीजोत्पादन करून लागवड
तूर, कापूस या सारख्या पिकात पावसाळा संपूनही शेंदळीचे वेल दिसतात. अंतर मशागत करतांना हे वेल जपले जातात. सातपुडाच्या रांगांमधील आदिवासींच्या शेतात उत्तम प्रतीच्या शेंदळ्या आढळतात. महाजन यांनी याची लागवड पहिल्या वर्षी पिकात केली. त्या वर्षीच्या वेलांपासून उपलब्ध शेंदळ्यांची सुरवातीला 10 गुंठे क्षेत्रात स्वतंत्र लागवड केली. पहिली 3 वर्षे तर बिजोत्पादनातच गेली. मोठ्या व समान आकाराच्या व नारंगी रंगाच्या निवडक शेंदळ्यांचे बीज तयार करून 2018 च्या हंगामात मोठ्या स्वतंत्र क्षेत्रात शेंदळी लागवड केली.
पेरू, शेवग्यात आंतरपीक
शेंदळीचे वेल सावलीतही चांगले पसरत असल्याने कोणत्याही उंच वाढणार्या पिकात चांगले येते, हा महाजन यांचा अनुभव असल्याने त्यांनी 7 एकर पेरू व 3 एकर शेवगा पिकात आंतरपीक म्हणून शेंदळीची लागवड केली. पावसाळ्याच्या सुरुवातीला खरीप हंगामातील इतर पिकांची पेरणी करतांना शेंदळीची लागवड केली. पेरू व शेवग्याच्या ओळीतच 2 फूट अंतरावर बिया टोचण्यात आल्या. पेरू व शेवग्याला ठिबक सिंचन व्यवस्था करण्यात आली असून 2 फुटावर ड्रीपर असल्याने गरजेच्या वेळी पाणी देता आले.
बीनखर्ची, टिकाऊ फळपीक
कोणत्याही प्रकारच्या खते-औषधांची गरज या पिकाला नसते. पावसाळ्यातील नैसर्गिक वातावरणात शेंदळीचे वेल चांगले फोफावतात. कमी पावसात देखील हे पीक येऊ शकते. वेलींना फळ लागल्यानंतर मात्र ढगाळ वातावरणामुळे फळ माशीचा प्रादुर्भाव होतो. त्यापासून बचावासाठी संपूर्ण शेतभर एकरी 2 या प्रमाणे फेरोमेन सापळे लावले होते. याव्यतिरिक्त कोणताही खर्च आला नाही. कोल्डस्टोरेज शिवायही हे फळ अनेक दिवस टिकू शकते, असा अनुभव महाजन यांनी यावर्षी घेतला. टिकाऊ असल्याने उत्पादन निघाल्यापासून 3 ते 4 महिन्यांपर्यंत बाजारात विकता येतात. हंगाम संपल्यावर विक्री न झालेली शेंदळी कापून तिला वाळविल्यास ती अधिक चविष्ट बनते. तरीही माल उरल्यास त्यापासून बियाणे तयार होते.
परदेशात निर्यातीचा प्रयत्न
ऑगस्ट – सप्टेबर महिन्यात पक्व झालेल्या शेंदळीची तोडणी केली जाते. स्थानिक बाजारात चांगली मागणी असल्याने महाजन यांनी यावर्षी सुमारे 50 क्विंटल शेंदळीची विक्री केली. परदेशात माहिती नसलेली ही फळभाजी निर्यात करण्याचा प्रयत्न उदय महाजन यांनी करून पाहिला. त्यात त्यांना थोड्या प्रमाणात यश आले आहे. अपेडा व पाल कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने काही माल त्यांनी परदेशात पाठवला. परंतू, मार्केटिंगच्या दृष्टीने अद्याप या पिकाचा अभ्यास झालेला नाही. या रानभाजीबाबत बाजारातील ग्राहकांसह कृषी विद्यापीठे व शास्रज्ञ आदी अद्यापही अनभिज्ञ आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन आल्यानंतर मार्केटींगचा प्रश्न निर्माण होतो. हे उत्पादन पूर्णतः नैसर्गिक असल्याने विषमुक्त आहे. येत्याकाळात आंतरराष्ट्रीय बाजारात माल विक्रीसाठी पाठवण्या आधीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची निर्यात करण्यात येणार आहे. सध्या रानभाज्यांचा चांगला प्रसार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शेंदळीचे संवर्धन झाल्यास शेतकर्यांना कमी खर्चाच्या आंतरपिकातून उत्पन्न मिळेल व ग्राहकांना नैसर्गिक फळभाजीचा आस्वाद घेता येईल.
शेंदळी पिकाचे संशोधन व्हावे!
शेंदळी हे तसे रानटी पीक आहे. त्यामुळे ते नैसर्गिक वातावरणानुसार वाढते. कमी जास्त पाऊस झाला तरी हमखास पीक हाती येते. आंतरपीक म्हणूनच घ्यायचे असल्याने स्वतंत्र लागवडीची गरज नाही. यात भरपूर पोषक अन्नघटक असावेत. त्याबाबत संशोधन होऊन त्याचा प्रचार झाल्यास शेतकर्यांना कमी खर्चाचे एक चांगले उत्पादन घेता येऊ शकेल.
- उदय बालमुकुंद महाजन,
रा. चुंचाळे ता. चोपडा, जि.जळगाव
मो.नं. 9767713332