मुंबई: मान्सून केरळातून अगदी वेगाने तळकोकणात दाखल झाला असला तरीही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा कमी होण्याचा नाव घेत नाहीये. मान्सून तळकोकणातून पुढे वाटचाल करण्यास अजून अनुकूल स्थिती नाही. कोल्हापुरात मात्र सोमवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मुंबई शहरातही काही भागात सोमवारी सकाळी रिमझिम पाऊस बरसला. मात्र महामुंबई परिसरात हवेत आर्द्रता वाढली असून भयंकर उकाडा जाणवत आहे.

मान्सून तळकोकणात रखडल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पेरण्यांची घाई करू नका, असे आवाहन केले आहे. 15 जूननंतरच मान्सून राज्यात सर्वव्यापी बरसण्यास सुरुवात होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात उष्ण आणि दमट हवामानासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात मान्सून 10 जूननंतर अधिक सक्रिय होण्याचा अंदाज आहे. सध्या मान्सूनच्या वाटचालीत एल-निनो स्थितीमुळे वारंवार अडचणी येत आहेत.

राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी आज इशारा
राज्यात आज, सोमवार, 8 जून रोजी, अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हवामानात मोठा बदल झाला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागांत सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अरबी समुद्रालगतच्या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे. याशिवाय, डोंगराळ आणि घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगफुटीसदृश पावसाची शक्यता हवामान विभाग (आयएमडी) ने वर्तवली आहे.
वाऱ्यांचा दाब महाराष्ट्राच्या दिशेने सरकतोय
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उत्तरेकडील भागात दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले असून त्यामुळे वाऱ्यांचा दाब महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. दुसरीकडे अरबी समुद्रातून मान्सूनचा प्रवाह राज्याच्या उर्वरित भागाकडे पुढे सरकत आहे. या दुहेरी हवामान प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उत्तर महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज
उत्तर महाराष्ट्रात तुलनेने कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. जून महिना मान्सूनच्या आगमनानंतरही उष्ण राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात ऊन आणि पावसाचा खेळ सुरूच राहणार आहे.
उत्तरेकडे उष्णतेची लाट कायम
दरम्यान, उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर प्रदेशातील तापमान 43° सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. माणसांसोबतच वन्य प्राणीदेखील उष्णतेने त्रस्त आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 11 जूनपासून उत्तर भारतात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या काही भागात मात्र सोमवारी हवामानात बदल पाहायला मिळत आहे. जालौनमध्ये मुसळधार पाऊस असून लखनौमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग 70 किमी/तास राहण्याचा अंदाज आहे. ओडिशातही येत्या 3-4 दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल
















