दीपक देशपांडे, पुणे –
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका शेतकऱ्याने गेल्या 10 वर्षात स्वतःच्या शेतात ज्वारीमध्ये विविध प्रयोग करताना त्यातून सकस असलेले व भरपूर उत्पादन देणारे ज्वारीचे बियाणे वेगळे करून एकरी 20 क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन घेतले आहे. त्याचबरोबर तुर्कस्तानमधून बाजरीचे बियाणे आयात करून एकरी 26 क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊन विक्रम प्रस्थापित केला आहे. अशा या पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आपण यशोगाथा आज पाहणार आहोत.
पूर्वीच्या जीवनात पोळीला महत्त्व नव्हते चारी ठाव जीवनामध्ये भाकरी, भात, वरण, भाजी, चटणी, कोशिंबीर व अन्य पदार्थ असे ताट भरलेले असायचे. ज्वारी आणि बाजरी या दोन्ही पिकाला या परिसरात पेरणीला चांगला वाव असतो. असेच एक बार्शी तालुक्यातील उंडेगाव, पोस्ट पानगाव येथील एक तरुण शेतकरी पदविकाधारक अतुल बिरमल सलगर असून त्यांचे वय अवघे 27 वर्षे आहे. दोन भावाचे एकत्र कुटुंब असून या कुटुंबाकडे 25 एकर जमीन आहे. त्यांच्याकडे पारंपारिक पिकांमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, ऊस, भाजीपाला व वांगी ही पारंपरिक पिके घेतली जात असताना अतुल हे कृषी पदविका घेऊन गेल्या 8 वर्षांपासून शेती करत आहेत. त्यांचे मोठे भाऊ मुंबई येथे नोकरी करतात. तर वडील शेती पाहतात.
ज्वारीचे उत्पादन एकरी 28 क्विंटलपर्यंत
अतुल यांनी शेती करताना ज्वारी पेरल्यानंतर ज्वारीच्या शिवारात फेरफटका मारण्यास सुरुवात केली. यातून गेल्या आठ वर्षापासून या शेतातील सर्वोत्कृष्ट कणसे तोडून ती एकत्र करून पुढील वर्षी त्याचे बियाणे पेरणे सुरू केले. त्यांच्या असे लक्षात आले की, या बियाण्यांपासून येणारी ज्वारीचे उत्पादन हे नेहमीच्या ज्वारीपेक्षा निश्चितच अधिक असते. त्यांनी त्या वर्षापासून दरवर्षी ज्वारी पिकल्यानंतर त्यातून मोठी असलेली कणसे व मोठे दाणे असलेले ज्वारी हे वेगळी करण्यास सुरुवात केले व त्यांनी त्याला फुले सुचित्रा असे घरगुती नाव ठेवले. या ज्वारीचे उत्पादन एकरी 28 क्विंटलपर्यंत मिळू लागले. यासाठी ज्वारी पेरताना १८:४६ चे एक पोते तर त्यानंतर ज्वारी कोळपणी करताना एक गोणी 10:26:26 व एक गोणी युरिया असे पेरून देणे सुरू केले. ज्वारीवर चिकटा, मावा असे रोग पडतात. त्यासाठी रोबोट व एखादी बुरशीनाशकाची फवारणी करत असत.
ज्वारीतून एकरी एक लाख रुपये नफा
ज्वारीच्या फक्त विषय करताना तयार झालेली ज्वारी त्यातील चांगले बियाणे वेगळे केले. तर दरवर्षी या बियाणाला तीनशे रुपये किलो प्रमाणे मागणी असते. मात्र, असे बियाणे हे कमी स्वरूपात असते. त्यात स्वतःची पेरणी झाल्यानंतर उर्वरित बियाणे या दराने विकले जाते, तर ज्वारीची बाजारात विक्री हे साडेचार हजार रुपये ते 4800 रुपये क्विंटल प्रमाणे विक्री होते. म्हणजे जवळपास एक एकर क्षेत्रामध्ये त्यांना सव्वा लाख रुपये मिळतात. यामध्ये खत, मशागत याचा खर्च वजा जाता निव्वळ नफा हा एकरी एक लाख रुपये प्रमाणे होतो. ते सुद्धा फक्त साडेतीन महिन्यांमध्ये आणि नेमके हेच शेतकरी विसरून किंवा इतर नगदी पिकांच्या मागे पडतो आहे.
बाजरीचे बियाणे मागवले तुर्कस्तातून
भले त्यात लाखो रुपयांचा फायदा होत असला तरी तो वर्षातून एकदाच होतो व त्यासाठी खर्च सुद्धा बेसुमार होतो. याच पद्धतीने अतुल सलगर हे बाजरीचे सुद्धा उत्पादन घेतात. खरीप आणि रब्बीच्या शेवटी म्हणजे डिसेंबरमध्ये ही बाजरी पेरली जाते. त्यांच्या लक्षात आले की, बाजरीचे उत्पादन अपेक्षेप्रमाणे होत नाही आणि बाजरीला भाव चांगला मिळतो. उत्पादन भरघोस प्रमाणात मिळते मात्र, त्यासाठी नवनवीन वाण पेरावे लागतात. यातूनच त्यांना 2023 – 24 मध्ये मोबाईलवर पाहताना तुर्कस्तानची बाजरी या संदर्भात एक लेख व फोटो पाहण्यास मिळाले. त्यातून त्यांनी बाजरीचे बियाणे तुर्कस्तातून मागवले. त्यांना दीड किलो साठी पाच हजार शंभर रुपये खर्च आला. त्यांनी त्यावर्षी एक एकर क्षेत्रावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजरीची पेरणी केली. ही पेरणी करताना त्यांनी टोकन पद्धत वापरली.
बाजरीतून एकरी सव्वा लाख रुपये नफा
अनेक शेतकरी हे पाहण्यासाठी येत असत तेसुद्धा एवढे मोठे कणीस पाहून आश्चर्यचकित होते. याचे उत्पादन किती येईल ? याबाबत कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नव्हते. त्याची उंची वाढत होती. त्यामुळे बाजरीला बुडाला पुन्हा मातीचा थर द्यावा लागला. त्यामुळे गणेश वाण हे चार फूट झाले किंवा पाच फूट झाले तरीही बाजरीचे झाड पडत नव्हते. बाजरीचे गणेश वाण पाहून येणाऱ्या शेतकऱ्यांपैकी अनेक जणांनी बियाण्यांची मागणी केली. त्यांनी या बाजरीच्या बियाणाला सातशे रुपये किलो असा भाव ठेवला. अनेक जणांनी हे बियाणे ऍडव्हान्समध्ये बुकिंग करून ठेवले होते. अपेक्षित उत्पादन किती होईल ?, याबद्दल कोणालाच अंदाज येत नव्हता. अनेक तज्ञ शेतकऱ्यांनी सुद्धा या बाजरीच्या शिवाराला भेट देऊन पाहणी करून सलगर यांची कौतुक केले व त्यांना सतत कशा पद्धतीने ही बाजरी पेरायची, त्याची काय काळजी घ्यावयाची, याबद्दल विचारणा केली होती. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या बाजरीची काढणी करण्यात आली.
या बाजरीचे उत्पादन जवळपास 41 क्विंटल झाले होते. हे एक प्रकारचे रेकॉर्ड होते, पण त्याबद्दल शासनाने अथवा कृषी विभागाने कुठेही दखल घेतली नाही आणि अतुल सलगर यांना त्याची गरज ही नव्हती. कारण, त्यांचे बियाणे सातशे रुपये किलो प्रमाणे विकले जात होते. हा पैसा किती झाला हा वाचकांनी ठरवावा, पण तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटल असा भाव जरी गृहीत धरला तरी त्यांना एकरी दीड लाख रुपये मिळत होते. यातील खर्च वजा जाता एकरी सव्वा लाख रुपये निव्वळ फायदा ते सुद्धा साडेतीन महिन्यात घेतले, याबद्दल त्यांचे कौतुकच करावे लागेल.
अतुल सलगर यांचे बाजरी व ज्वारी हे दोन्ही मिळून एकूण चार एकर क्षेत्र आहे तर दोन एकर क्षेत्रावर ज्वारी सारखे असलेले जूट याची पेरणी केली जाते. त्यांच्या चार एकर क्षेत्रात वर्षातील फक्त साडेतीन महिन्यात त्यांना 4 लाख 75 हजार रुपयांचे उत्पन्न निघते. पेरणी, खते, फवारणी, काढणे, मोडणे हा सर्व खर्च गृहीत धरला तर या उत्पन्नातून खर्च वजा जाता 4 लाख रुपये त्यांना मिळतात. उसाची तुलना केली तर हे उत्पन्न जास्त आहे, शिवाय जर रब्बी हंगामात बाजरी दुसऱ्यांदा पेरली तर उत्पन्नात निश्चितच चांगली वाढ होते. शेतातील कांदा, भाजीपाला, सोयाबीन व इतर अनेक नगदी पिकांचे दर अनेक वेळेला कोसळतात आणि मग शेतकऱ्याची ओरड उडते शेती परवडत नाही. पण ज्वारी, बाजरी यासारख्या नित्य उपयोगी शेतीमाल उत्पन्नात दरामध्ये फार मोठी घसरण होत नाही, कारण या पिकांसाठी लागवडीचे क्षेत्र अत्यंत कमी झाले आहे आणि मागणी तर कायम आहे. त्यामुळे ज्वारी, बाजरी सारख्या पिकांमधून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. शिवाय याच्या कडव्याचा या उत्पन्नामध्ये वेगळाच समावेश करता येतो. यापासून चांगले कंपोस्ट खतही तयार होऊ शकते.
संपर्क :-
अतुल सलगर
मो. नं. 8888143494