शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), IoT, ड्रोन, रोबोटिक्स यांचा वापर जगभर वेगाने वाढत असताना महाराष्ट्र मागे कसा राहणार? महाराष्ट्रातही 500 कोटींच्या निधीसह शेतीसाठी नावे ‘एआय’ धोरण मंजूर झालं आहे. त्याअंतर्गत राज्यात फळपिके, ऊस, इ. पिकांसाठी AI वापर सुरू झाला आहे. हे धोरण पुढील काही वर्षांत महाराष्ट्रातील शेतीचे स्वरूप बदलणार आहे.
सध्या जगभरात शेती क्षेत्रात काही मोठे ट्रेंड्स दिसत आहेत. जसे की, –
1. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), IoT, ड्रोन, रोबोटिक्स यांचा वापर वाढतोय.
2. डिजिटल शेती, हवामान-संवेदनशील शेती आणि प्रक्रिया तंत्रज्ञानावर भर आहे.
3. सेंद्रिय शेती, टिकाऊ उत्पादन आणि शाश्वत बाजारपेठेची मागणी वाढली आहे.
AI ने शेतकऱ्यांना नेमके काय फायदे मिळतात?
AI वापरल्याने शेतकऱ्यांना पिकांचे रोगनिदान, खत व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज, आणि पाण्याचा वापर यामध्ये अचूकता मिळते. उत्पादनात वाढ, खर्चात बचत आणि वेळेवर योग्य निर्णय घेता येतात.
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त AI टूल्स, अॅप्स
> भारतात शेतकऱ्यांसाठी काही लोकप्रिय AI टूल्स आणि अॅप्स असे आहेत
1. ‘किसान ई-मित्र’ – AI-चॅटबॉट, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देतो.
2. राष्ट्रीय कीट निगराणी प्रणाली – कीटक व रोग ओळख, फोटो अपलोड करून लगेच माहिती मिळते.
3. ड्रोन व सेंसर्स – पिकांची स्थिती, खत, पाणी व्यवस्थापनासाठी मदत करतात.
महाराष्ट्राच्या AI शेती धोरणाचा उद्देश, स्वरूप
– ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025- 2029’ हे राज्यातील शेती क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात तीन वर्षांसाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
– या धोरणाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जेनरेटिव्ह AI, IoT (Internet of Things), ड्रोन, संगणकीय दृष्टिक्षमता, रोबोटिक्स, बिग डेटा अॅनालिटिक्स यांचा वापर शाश्वत, शेतकरी-केंद्रित उपायांसाठी केला जाणार आहे.
– धोरणाची अंमलबजावणी त्रिस्तरीय यंत्रणेच्या माध्यमातून केली जाईल आणि तीन वर्षांनी फेरआढावा घेऊन पुढील आर्थिक तरतूद केली जाईल.
शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होईल?
– पीक नियोजनाचा सल्ला : AI आधारित सल्ल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी, योग्य प्रमाणात पाणी, खत, औषधे वापरता येतात. यामुळे उत्पादनात वाढ व खर्चात बचत होते.
– डेटा- आधारित निर्णय : जमिनीचा डेटा, हवामान, पिकांची स्थिती, रोग व कीड नियंत्रण, बाजारभाव यांचा अचूक अंदाज मिळतो. त्यामुळे धोके कमी होतात आणि नफा वाढतो.
– उत्पादन व गुणवत्ता वाढ : AI तंत्रज्ञानामुळे पिकांची वाढ, दर्जा आणि उत्पादकता वाढते. उदाहरणार्थ, ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेचे प्रमाण 20% नी वाढले आहे.
– खर्चात बचत : मजुरी, पाणी, खत यांचा अपव्यय कमी होतो. AI वापरलेल्या ऊस शेतीत मजुरी खर्च 35,000 रुपयांवरून 23,200 रुपयांपर्यंत कमी झाला आहे.
– शाश्वत शेती : संसाधनांचा तंतोतंत वापर, हवामान-प्रतिरोधक तंत्रज्ञान, आणि पर्यावरणपूरक शेतीसाठी मदत होते.
AI ने कशी केली बचत, कसा वाढला नफा ?
* फळपिके, ऊस, इ. पिकांसाठी AI वापर सुरू झाला असून त्याची उपयुक्तता दिसून येत आहे. खर्चात बचत होत आणे अन् नफ्यात वाढ! ती आकडेवारी आणि उदाहरणे पाहूया –
ऊसाच्या शेतीतील AI वापर
– बारामती येथील ‘फार्म ऑफ द फ्युचर’ प्रकल्पात AI वापरून 1,000 शेतकऱ्यांकडे चांगले निष्कर्ष मिळाले. पुढील टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांपर्यंत विस्तार केला जाणार आहे.
AI वापरलेल्या ऊस शेतीत बचत :
– पूर्वीचा मजुरी खर्च: 70 मजूर (35,000 रु.) आता AI मजुरी खर्च→ 40 मजूर (23,200 रु.)
– उत्पादनात 30% वाढ व रिकव्हरी उत्तम होऊन उत्पादित साखरेचे प्रमाण 20% वाढले
– पीक तयार होण्याचा कालावधी 18 महिन्यांवरून 12 महिने झाला.
फळपिके व इतर पिके यात AI
– टोमॅटो, भेंडी, इ. 12 पिकांवर AI आधारित प्रयोग करण्यात आले आहेत.
– AI तंत्रज्ञानामुळे पाणी, खत, औषधे कमी लागतात व उत्पादनात वाढ होते. शेतकऱ्यांना मोबाईल ॲपद्वारे रोज मार्गदर्शन मिळते – पाणी द्या, खत फवारणी करा, किडींसाठी तपासा, अशी सूचना AI टूल्सद्वारे दिली जाते.
राज्यस्तरीय प्रकल्प
– महा-ॲग्रीस्टॅक, महा-ॲग्रीस्टेक, महावेध, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महाडीबीटी यांसारख्या प्रकल्पांमध्ये AI चा वापर सुरू आहे.
– पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला AI तंत्रज्ञानाचा थेट फायदा होईल, असा अंदाज आहे.