मुंबई:- आज सकाळपासूनच महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने जोर धरला आहे. मुंबईतील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु असून घाटकोपर, मुलुंड, भांडूप, ठाणे, कल्याण, पालघर, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली अशा बऱ्याच ठिकाणी पावसाने सकाळपासून जोरदार हजेरी लावली आहे.
ठाणे, रायगड, पालघर या तीन जिल्ह्यात पुढील दोन दिवसासाठी ( शनिवार व रविवार दि.३ व ४) मुंबई वेधशाळेने रेड अलर्ट जारी केला असून अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पश्चिम किनार पट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. अशी माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.
समुद्रात ताशी ५० किमी वेगाने वारे वाहतील व २०० मी.ली. पेक्षा जास्त पाऊस किनारपट्टीवर होईल असा अंदाज आहे. त्यामुळे स्थानिक आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर नाविक दल व तटरक्षकदल सुद्धा सज्ज ठेवण्यात आले आहे.