(चिंतामण पाटील)
सिंचनासाठी पुरेसे पाणी नसतांनाही जिद्द आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या बळावर 10 किलोमीटरवरून पाणी आणून 35 एकर मोसंबी लागवड राजुरी येथील प्रविण पाटील यांनी यशस्वी केली आहे. शेती करायची तर त्यासाठी व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे हे समजून घ्यायचे असेल तर प्रविण पाटील यांना गाठायलाच हवे…
दि.26 जुलै, सकाळीच दहा वाजता संपादक शैलेंद्र चव्हाण आणि मी पाचोरा तालुक्यातील राजुरी या गावातील प्रगत शेतकरी प्रविण पाटील यांच्या भेटीला निघालो. पहाटे पासूनच पाऊस भुरभुरत होता. आजूबाजूचे हिरवं शिवार डोळ्यात साठवत पाचोरा – वरखेडी मार्गे राजुरीला निघालो. पाचोरा राजुरी अंतर 15 किलो मीटर…! शिवारातील बहुतांश जमीन काळी कसदार परंतु काळया मातीच्या दीड दोन फुटांवर मुरुमाचा चर असल्याने पाण्याचा निचरा होणारी. परिणामी फळबागायतीला पोषक जमीन असल्याने या भागात पूर्वापार मोसंबी लागवडीची परंपरा चालत आलेली. तिला व्यावसायिक स्वरूप देऊन अधिकाधीक नफेशीर केली ती प्रविण रामराव पाटील यांनी राजुरीत प्रवेश करतानाच गावात स्वच्छता, शिस्त आणि शिक्षणाची गोडी जाणवली. घरांच्या भिंती विविध प्रकारच्या महितीनी रंगवल्या होत्या. एकूणच गाव विकसित आणि आदर्श होतं.
शेतीचा समृद्ध वारसा
प्रविण रामराव पाटील आणि राहुल रामराव पाटील ह्या दोघा भावांचं एकत्र कुटुंब. त्यांचे वडील रामराव पाटील हे पाच भाऊ. असा भावकीचा मोठा गोतावळा. रामराव पाटील यांच्या हिश्याला 35 एकर जमीन आली. त्यात ते कापूस, मका, ज्वारी आणि काही क्षेत्रात मोसंबी उत्पादन घेत. शिक्षण सुरू असतांनाच प्रविण पाटील 1998 पासून शेतीत रस घेऊ लागले होते. सोयगाव येथे बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2002 पासून पूर्णवेळ शेतीत उतरले.
मोसंबीची व्यावसायिक पद्धतीने लागवड
वडील रामराव पाटील यांनी 9-10 एकर क्षेत्रावर मोसंबी लागवड केली होती. त्यामुळे त्याबाबतचे प्राथमिक ज्ञान प्रविण पाटील यांना होतेच. वडीलांपासून प्रेरणा घेऊन 2003 यावर्षी 6 एकर क्षेत्रावर 1100 मोसंबीची कलमे लावली. या झाडांपासून 2006 पासून उत्पादन सुरू झाले. 2008 ला 600 व 2010 मध्ये 1 हजार झाडांची लागवड केली. त्यानंतरही टप्प्याटप्प्याने लागवड होत राहिली. सध्या न्यू सेलर जातीची 35 एकर एवढ्या विस्तृत क्षेत्रावर त्यांनी मोसंबी लागवड केली आहे.
लागवड पद्धत
रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत जामनेर येथील शासकीय नर्सरीतून रोपे उपलब्ध झाली. लागवडीच्या पद्धतीबद्दल त्यांनी पुढील प्रकारे माहिती दिली. जून ते सप्टेंबर या कालावधीत रोपांची लागवड केली जाते. पाण्याचा निचरा होणारी काळी कसदार जमीन असून ती मोसंबीस पोषक आहे. त्यांची बहुतांश लागवड चांगला पाऊस सुरू झाल्यानंतर केली आहे. त्यासाठी 16 बाय 16 फुटांवर दोन फूट रुंद व दीड फूट खोल खड्डा केला जातो. त्यात बुरशीनाशक व पी.एस.बी. कल्चर टाकले जाते. लागवडीपूर्वी लिन्डेन पावडर व 500 ग्रॅम प्रती झाड सुपर फॉस्फेट टाकून रोपे जिवाणू संवर्धन प्रक्रिया करून लावली जातात. लागवड करताना रोपांची निवड महत्त्वाची असते. 18 ते 20 महिने वयाची रोपे घ्यावीत. रंगपुर या लिंबूवर्गीय रोपावर न्यू सेलरचा स्युट (काडी) कलम केल्याची खात्री केली पाहिजे. अन्यथा फसवणूक होऊन बाग डायबॅक रोगास बळी पडू शकते.
बहार व्यवस्थापन
मोसंबीचे आंबेबहार व मृगबहार असे दोन बहार घेता येतात. त्यानुसार पाणी,खत व्यवस्थापन करावे लागते. प्रविण पाटील आंबेबहार घेतात. त्यासाठी पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते 15 डिसेंबर या कालावधीत पाण्याचा ताण (ीींशी) दिला जातो. या कालखंडात मातीतील ओलावा खेचून घेण्यासाठी प्रती झाड 1 किलो सुपर फॉस्फेट झाडाभोवती पसरवून दिले जाते. फॉस्फेट मातीतील ओलावा खेचून घेतो, मुळ्यांना सुप्तावस्थेत नेण्यास प्रवृत्त करतो व जमीन भुसभुशीत होते. झाडावरील सुकलेल्या फांद्यांची छाटणी करून बुंध्याला बोर्डो पेस्ट लावली जाते. बहार धरण्यासाठी कृत्रिम हार्मोन्सचा वापर टाळावा. फळ धारणा होत असताना जीवामृत वापरले जात नाही. फळे लिंबू एवढ्या आकाराची झाल्यानंतर महिन्यातून एकदा वापरणे फायद्याचे ठरते.
खत व कीड रोग व्यवस्थापन
ट्रेसचा कालावधी संपल्यानंतर डिसेंबर प्रती झाड 1 किलो डी.ए.पी. 500 ग्रॅम पोटॅश, 200 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्ये व 600 ग्रॅम दुय्यम अन्नद्रव्ये दिली जातात. खतांचे हे बेसल डोस डिसेंबर व जून – जुलै महिन्यात असे वर्षभरात दोनदा दिले जातात. पावसाळ्याच्या सुरुवातीस जमिनीत भरपूर ओलावा असताना प्रत्येक झाडास एक ते दीड किलो गांडूळखत दिले जाते. नैसर्गिकरित्या फुलधारणा झाल्यानंतर काही जैविक औषधांच्या फवारण्या कराव्या लागतात. त्यात व्हर्टीसिलियम लॅकेनी, मेटारायझम, बिव्हेरियाची फवारणी होते. या सर्व औषधी जैविक असल्याने परागीभवनात महत्वाची भूमिका बजावणार्या मधमाश्यांना इजा पोहोचत नाही. ऑक्टोबरमध्ये झाड ट्रेसमध्ये असताना रसशोषक पतंगाचे नियंत्रण करण्यासाठी एकदाच मिनोथ्रीन या रासायनिक कीटनाशकाची फवारणी करावी लागते. फळझाडांचे पळारीेंव सारख्या रोगापासून बचावासाठी गूळ, ताक, ट्रायकोडर्मा कल्चर याचे मिश्रण ठिबक संचाद्वारे दिले जाते. फळमाशी नियंत्रणासाठी शिकारी सापळे लावले जातात.
पाणी व्यवस्थापन
पावसाळ्याचे दिवस आणि बहार धरण्याच्या दृष्टीने देण्यात आलेला पाण्याचा ताण दिवस वगळता सिंचनाचे नियोजन करावे लागते. खताचा बेसल डोस दिल्यावर 15 डिसेंबर नंतर पहिले हलके पाणी द्यावे (ड्रीप द्वारे 4 तास). त्यानंतर पाच दिवसांच्या अंतराने 4 ते 6 तास पाणी द्यावे. पहिले पाणी दिल्यानंतर 20 दिवसांनी फुलधारणा होते. त्यानंतर मात्र दोन-तीन दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे लागते. हिवाळ्यात प्रती झाड 80 ते 100 लिटर तर उन्हाळ्यात 200 लिटर पाणी द्यावे लागते. हलक्या व भारी जमिनीनुसार व फुल ते फलधारणा या अवस्थेनुसार पाणी देण्याचे प्रमाण कमी जास्त होत असते. उन्हाळ्यात बागेत गारवा राहावा यासाठी ठिबकशिवाय मोकळे पाणी दिले जाते.
आंतरमशागत
खत आणि पाणी व्यवस्थापना इतकेच आंतरमशागतीला महत्व आहे. खोलवर आणि अतिरिक्त मशागत फळगळ होण्यास कारणीभूत ठरते. मशागत करताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. बाग तणविरहित ठेवण्यासाठी (इउड) कंपनीच्या पावर टिलरने वखरणी व निंदणी फायदेशीर ठरते.
गुणवत्तापूर्ण उत्पादन
बहार धरण्यापासूनच प्रविण पाटील बागेचे चोख व्यवस्थापन ठेवतात. त्यामुळे ते मोसंबीचे विक्रमी व दर्जेदार उत्पादन घेतात. प्रत्येक झाडांपासून कमीत कमी 80 ते 150 किलो उत्पादन मिळते. दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, मालदा, सिलिगुडी येथील व्यापारी शेतात येऊन माल घेऊन जातात. कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 60 रुपये असा दर मिळतो. एकरी 50 ते 60 हजार खर्च वजा जाता अडीच लाखापर्यंत उत्पन्न मिळते.
नियोजनबद्ध शेती करताना त्यांना कृषी विभागातील अनेक अधिकार्यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. त्यात तत्कालीन उपविभागीय अधिकारी एन.व्ही. देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, पाचोरा तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर, उपविभागीय अधिकारी नैनवाड, तालुका कृषी अधिकारी गोरडे यांचा समावेश आहे.
शेतीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाची ठळक वैशिष्ट्ये :
1) शासकीय योजनांचा लाभ : प्रविण पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजना शेतात राबविल्या आहेत. राष्ट्रीय फळबाग योजनेतून पैक हाऊस, 1 कोटी लिटर क्षमतेचे शेततळे, कृषी यांत्रिकीकरण योजनेतून पावर टिलर त्यांना मिळाले आहे.
2) गांडूळ खत प्रकल्प : फळ बागायात सेंद्रिय पद्धतीने करण्यावर त्यांचा भर आहे. त्यासाठी उपलब्ध काडी कचरा व शेणखत डी-कंपोजर वापरून कंपोस्ट केले जाते. या कंपोस्ट खताचे रूपांतर गांडूळ खतामध्ये करण्यासाठी त्यांनी सिमेंटची 20 कुंडे तयार केले आहेत. त्यापासून 35 ब्रास गांडूळ तयार होते. ते पावसाळ्यात जमिनीत ओल असताना प्रत्येक झाडास एक ते दीड किलो दिले जाते.
3) जिवामृत प्रकल्प : 200 लिटरच्या 7 टाक्यांमध्ये जीवामृत तयार केले जाते. शेण, हरभरा डाळीचे पीठ, गूळ व गोमुत्राचा त्यासाठी वापर होतो. तयार होणारे जीवामृत ड्रिपद्वारे दिले जाते.
4) फवारणीसाठी नळ्यांचे जाळे : 35 एकरात पसरलेल्या बागेतील बहुतांश झाडें 5 ते 20 वर्षाची झाली आहेत. ते उंच असल्याने फवारणी हातपंपाद्वारे करणे अशक्य आहे. म्हणून विहिरीजवळ एका टाकीला मोटार पंप बसवून तेथून सर्व शिवारात अर्धा इंची नळी टाकली आहे. बागेत ठीक ठिकाणी त्याचे कनेक्शन जोडून लांब नळीद्वारे फवारणी होते. अशाप्रकारे सुमारे दीड किलोमीटर नळी शेतात टाकली आहे.
5) शेततळ्यात मत्स्यपालन : 2012 या दुष्काळी वर्षात 1 कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले. बागे च्या सिंचनासोबत त्याचा वापर मत्स्यपालन करण्यासाठी त्यानी सुरू केला आहे.
6) मोसंबी रोपांची नर्सरी : दर्जेदार मोसंबी उत्पादन घेता घेता बागेतच मोसंबीची नर्सरी त्यांनी निर्माण केली आहे. रंगपुर लाईमच्या खुटीवर न्यू सेलरच्या काडीचे कलम केलेली रोपे तयार केली जातात. 30 हजार रोपांची क्षमता असून शासकीय योजनेतून शेतकरी रोपे मिळवू शकतात.
7) मृदसंधारण: पाण्याचा निचरा व्हावा व पावसाचे जादा पाणी निघून जावे यासाठी त्यांनी शेतात खोल नाल्या काढल्या आहेत. माती वाहून जाऊ नये म्हणून ठीक ठिकाणी सिमेंट बांध घातले असून गाळ थांबून फक्त पाणी वाहून जावे अशा पद्धतीने पाईप टाकण्यात आले आहेत.
8) शेतात राबणार्या 6 सालदारांसाठी 6 पक्के शेड त्यांनी बांधली आहेत. तेथे वीज, पाण्याची चोख व्यवस्था आहे.
9) सिंचनासाठी 5 विहिरी व 1 कोटी लिटर क्षमतेचे शेततळे व जवळच्या राजुरी बंधार्यातून पाइपलाइन टाकून पाणी आणले आहे. तसेच बागेला ठिबक सिंचनाद्वारे सिंचीत केले जाते.
…आणि 10 किमी वरून आणलेले पाणी पोहोचले
2012 व 2018 या वर्षी दुष्काळाचे चटके प्रविण पाटील यांच्या बागेने अनुभवले. 2012 च्या दुष्काळात तर मिळेल तिथून टँकरने पाणी आणूनही 1000 झाडें सुकून गेली. तिच परिस्थिती 2018 ची. विहिरी आटल्या. शेततळे कोरडे पडले. बागांना तासभर देखील पाणी देणे शक्य नव्हते. आजूबाजूच्या सर्वच विहिरी कोरड्या. नऊ-दहा किलो मिटर वरील बाजूला धरणाशिवाय दुसरा स्रोत नव्हता. त्यावेळी धरणा जवळील एका विहिरीवरून पाणी आणण्याचा निर्णय घेतला. ऐनवेळी 9-10 किमी पाईप लाईन टाकण अशक्य होतं. मात्र एक जमेची बाजू होती प्रत्येक शेतकर्याच्या शेतात पाईपलाईन होती. त्या सगळ्या शेतकर्यांना विचारून या नऊ-दहा किमी टप्प्यातील सगळ्या शेतातील पाईप एकमेकाला जोडण्यात आले. यावेळी 55 ठिकाणी लिकेज काढण्यात आले. या टप्प्यातील सगळ्याच शेतकर्यांनी पाईप जोडणीस होकार दिल्याने दूरवरचे पाणी प्रविण पाटील यांच्या शेतात पोहोचू शकले. बाग वाचविण्यासाठी तुमची एवढी धडपड आहे तर आम्ही मदतच करू अशी सहकार्याची भूमिका शेतकर्यांनी घेतली. यावरून प्रविण पाटील व त्यांच्या कुटुंबियांचे परिसरातील गावकर्यांशी कसे जिव्हाळ्याचे संबंध आहेत हे लक्षात येते.
डायबॅक : जमिनीतील फायटोप्थेरा बुरशीमुळे हा रोग येतो. झाड पिवळे पडून सुकू लागते. रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्याही रासायनिक औषधांव्यतिरिक्त जैविक बुरशीनाशक सुडोमोनस, ट्रायकोडर्माचा वेळोवेळी वापर करावा लागतो. हा रोग येऊच नये यासाठी नर्सरीतून रोपे आणतानाच ती डायबॅकमुक्त असल्याची खात्री करावी.
भिंतींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
शेतीच्या उत्कृष्ट नियोजनाच्या जोडीला प्रविण पाटील यांच्या कुटुंबाचे गावाच्या सुधारणेवर देखील लक्ष आहे. विविध विकास कामांसोबत गावात स्वच्छता दिसून आली. गावात ठीक ठिकाणी भिंतींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक माहिती रंगविण्यात आली आहे. प्रविण पाटील यांचे लहान भाऊ राहुल पाटील बिनविरोध सरपंच आहेत. यापूर्वीही त्यांच्या घरातील व्यक्ती अनेकवेळा सरपंच झाली आहे.
मर्यादित पाण्यातही मोसंबी घेता येते
मोसंबीला भरपूर पाणी लागते हे सत्य नसून मर्यादित पाण्यातही हे पीक घेता येते. आमच्या परिसरात दुष्काळी वर्षात लोकांनी टँकरने पाणी विकत आणून बागा वाचाविल्या आहेत. मोसंबी हे रोगराईस कमी बळी पडणारे पीक असल्याने शेतकर्यांना पैसा मिळवून देणारे आहे. मात्र चोख व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. उत्कृष्ट व डायबॅक मुक्त रोपांची निवड, रासायनिक खते, कीडनाशकांचा कमीत कमी वापर, जैविक व सेंद्रिय, गांडूळ खतांचा भरपूर वापर व योग्य आंतर मशागत भरपूर उत्पादन देऊ शकते. मोसंबीला भारतभर मागणी असून लागवड फायद्याची ठरते.
– प्रविण रामराव पाटील, मु.राजुरी पोस्ट वरखेडी
ता. पाचोरा जि. जळगाव. मोबाइल ः 9284237822