चिंतामण पाटील, जळगांव
पारंपारिक उत्पादन पद्धतीला फाटा देत मिश्र पिकांचे उत्पादन घेऊन सतत पैसा खेळता ठेवणारी पीक पद्धती मंगेश महाले यांनी आपल्या शेतात विकसित केली आहे. यावर्षी 30 गुंठे क्षेत्रात विविध 18 पिकातून सुमारे 2 लाखाचे उत्पन्न त्यांनी मिळविले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील सायगाव हे गिरणा आणि मन्यार नदीच्या पाण्यामुळे जलसमृद्ध गाव. त्यामुळे बहुतांश शेतकरी बागायती शेती करतात. असे असले तरी वाढता उत्पादन खर्च आर्थिक उन्नतीच्या आड येत असल्याने प्रगतीपेक्षा कर्जाचाच आकडा वाढत चालला आहे अशी अनेक उदाहरणे येथे सापडतात. मंगेश महाले यांचे वडील आणि काका देखील त्याच परंपरागत शेतीचे वाटेकरी. त्यातल्या त्यात त्यांनी फळ बागायतीची तरी कास धरलेली. मंगेश महालेंनी मात्र MSc पर्यंत शिक्षण घेतल्या नंतर वेगळ्या पद्धतीने शेती करायला सुरुवात केली.
ऊसात कोबीचे आंतर पीक
त्यांच्या हिश्श्याची 4 एकर आणि अकाली निधन झालेल्या काकांची 4 एकर अशी शेती ते करतात. सध्या त्यांच्या शिवारात साडे तीन एकर खोडवा तर दीड एकर सुरू उसाची लागवड झाली आहे. त्यात त्यांनी आंतर पीक म्हणून फुल कोबी व गड्डा कोबीची लागवड केली असून ऐन उन्हाळ्यात त्यांची काढणी होणार आहे. या कालखंडात बाजारात भाजीपाल्याची आवक कमी होत असल्याने चांगला दर मिळू शकेल याची महाले यांना खात्री आहे.
30 गुंठ्यांत 18 पिके
भाजीपाला उत्पादनातून तात्काळ पैसा मिळतो म्हणून त्यांनी आपल्या 30 गुंठे शेतात 18 प्रकारचा भाजीपाला घेतला. 20 गुंठे क्षेत्रात वेलवर्गीय कारले, गिलके, दोडके, दुधी भोपळा, काकडी, वाल, भेंडी लागवड केली, तर 10 गुंठे क्षेत्रात 5 किलो मेथी व 5 किलो धणे पेरून कोथंबिर घेतली.
20 गुंठ्यांत वेलवर्गीय भाजीपाल्यात आंतर पीक म्हणून हरभरा लागवड केली. 20 गुंठ्यांत फक्त दीड किलो बियाणे पेरून त्यापासून 180 किलो हरभरा उत्पादन घेतले. याशिवाय सापळा पीक म्हणून झेंडूची लागवड केली.
सेंद्रिय, जैविक पद्धतीचा वापर
या 18 पिकांसाठी कीटनाशक म्हणून रासायनिक औषधांचा वापर केला नाही. तसेच खत म्हणून जीवामृत व कंपोस्ट खताचा वापर केला. त्यामुळे ग्राहकांना विषमुक्त भाजीपाला मिळाला. किट नियंत्रणासाठी निमास्त्र, दशपर्णी अर्क, गोमूत्र, चिकट सापळे, लाईट सापळे यांचा वापर केला जातो. कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या कडून उपलब्ध होणाऱ्या जिवाणू कल्चर वापरून जीवामृत तयार केले जाते. त्याचा सतत वापर केला जातो.
30 गुंठ्यांत 2 लाखाच्यावर उत्पन्न
ऊस, कापूस यासारखी वार्षिक किंवा सहामाही पिके खर्चिक असून प्रत्यक्ष उत्पन्नाची शाश्वती नसल्याचा अनुभव आल्यानंतर महाले यांनी कमी क्षेत्रात सतत पैसा देणाऱ्या भाजीपाला पिकाकडे आपला मोर्चा वळविला. त्यानुसार त्यांनी 30 गुंठे क्षेत्रात विविध पिकांचे नियोजन केले. 20 गुंठे क्षेत्रात वेलवर्गीय पिकांची लागवड केली. हंगाम संपत असतांना त्यात टोकण पद्धतीने हरभरा लावला. भाजीपाल्यातून सुमारे 1 लाख रुपये मिळविले. 10 गुंठे मेथी व कोथबिरचे 10 हजार मिळाले. सापळा पीक म्हणून लावलेल्या झेंडूने सुमारे 70 हजार रुपये कमवून दिले. शिवाय आंतरपीक हरभरा 1 क्विंटल 80 किलो म्हणजे दहा हजाराचा झाला. अशाप्रकारे 30 गुंठ्यांत वर्षभरात सुमारे 2 लाख रुपये कमाई झाली.
स्वतःच करतात विक्री
आपल्या उत्पादनाची स्वतः विक्री करण्यावर महाले भर देतात. स्वतः निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी किमतीत ते माल विकत नाही. मालाचे पैकेजिंग आणि ब्रॅंडींग करूनच ते माल विकतात.
जिरेनियमची लागवड
सुगंधी वनस्पती जिरेनियमची त्यांनी एक एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. या वनस्पतीच्या पाल्यापासून सुंगंधी तेल तयार करता येते. त्याचा वापर साबण, अत्तर, परफ्यूम यात केला जातो. महाले यांनी 28 जानेवारी रोजी सरी वरंबा पद्धतीने ठिबक सिंचन वापरून लावणी केली आहे. दोन ओळीत 4 फूट व दोन रोपात सव्वा फूट अंतर ठेऊन लागवड केली आहे. त्यासाठी त्यांना 10 हजार रोपे लागली. मुंबई येथील केळकर कंपनी कडून त्यांनी रोपे मिळविली होती. रोपांसाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च आला असून एकदा लागवड केल्या नंतर सलग 3 वर्षे उत्पादन घेता येते. साडे तीन ते 4 महिन्यातून एक वेळा म्हणजे वर्षातून 3 ते 4 वेळा पाला कापणी करता येते.
या पिकावर कोणत्याच प्रकारचा रोग येत नाही किंवा किडींचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे किटनाशकावरील खर्च शून्य आहे. विविध प्रकारची वॉटर सोल्यूबल खते मात्र वेळोवेळी दिली जातात.
जिरेनियमाला चांगली बाजारपेठ
जिरेनियमच्या पाल्याला 5 हजार रुपये टन असा दर मिळतो. वर्षभरात चार कापण्या होतात. एका कापणीत सुमारे 10 टन पाला मिळतो म्हणजे त्यापासून 50 हजार रुपये मिळतात. वर्षभरात चार कापण्यातून 2 लाख रुपये सहज निघतात. एका वर्षातच लागवडीचा व इतर खर्च वसूल होऊन हाती पैसे राहतात. महाले यांनी लागवडी पासूनच जिरेनियम पाला विकण्यापेक्षा त्यापासून तेल काढण्यावर भर दिला आहे. त्यासाठी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याच प्रमाणे कमी खर्चाच्या या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे म्हणून ते जिरेनियमची नर्सरी देखील तयार करणार आहेत.
प्रशिक्षण घेऊन पाया केला मजबूत
शेती बाबत उपयोगी ज्ञान जेथून मिळेल तेथून ते घेण्याची वृत्ती महाले यांच्यात दिसून येते. पदवी शिक्षण घेत असतांना हॉर्टीकल्चर प्रशिक्षण पूर्ण केले. तसेच बायो टेकनॉलॉजीचा 3 वर्षाचा डिप्लोमा केला. तसेच कमर्शियल डेअरी (कर्नाल), मधमाशी पालन (राजस्थान), पोल्ट्री प्रशिक्षण – केंद्रीय पक्षी अनुसंधान केंद्र, बरेली (उत्तर प्रदेश). अशाप्रकारे प्रशिक्षण घेऊन शेतीविषयक नवीन तंत्राचा त्यांनी अभ्यास केले आहे. त्याचा शेतीत पावलोपावली उपयोग होतो असे ते सांगतात.
तण आणि मधमाशांचा अभ्यास
फक्त मुख्य पिकेच नाही तर बांधावरील तण देखील मधमाशांच्या वास्तव्याचे स्थान असते असा अभ्यास महाले यांनी केला आहे. ज्यावेळी शेतात पिके नसतात तेव्हा बांधावर, कानाकोपऱ्यात उगवलेल्या बरीकशा फुलांपासून मधमाशा मध गोळा करतात. मधमाशा फलधारणेत प्रमुख भूमिका बजावत असल्याने किटनाशकांप्रमाणेच तण नाशकांचा वापरावर सुद्धा संपूर्ण बंदी आणली पाहिजे अशी महाले यांची भूमिका आहे. याबाबतचा संशोधन पेपर ते तयार करीत आहेत.
उत्पादनापासून विक्रीपर्यंत स्वतः उभे राहून शेतात नवनवीन प्रयोग राबवित महाले यांनी शेती विकसित केली आहे. त्यांची ही पद्धत परिसरातील असंख्य शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
माझा कल कमी दिवसात, कमी क्षेत्रात तात्काळ पैसा देणाऱ्या भाजीपाला पिकाकडे आहे. वेलवर्गीय व जमिनीवर वाढणाऱ्या अशा विविध पिकांचे वर्षभर उत्पादन येत राहील असे नियोजन करतो. त्याची विक्री स्वतःच करतो. कोणी एक रुपया देखील कमी देत असेल तर “माल बकऱ्यांपुढे टाकेन पण, तुम्हाला देणार नाही “. अशी भूमिका मी घेतो. हेच धोरण शेतकऱ्यांनी स्विकारले तरच शेतमालाचे मूल्य ग्राहक आणि शासनालाही समजेल.
-मंगेश भिवराम महाले, मू.पो.सायगाव तालुका चाळीसगाव.
मो. 9561545284