मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजना जाहीर केली. अजित पवार यांनी घोषित केल्यानुसार राज्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे 500 भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्यात येणार आहेत. राज्यातील शेतकरी उत्पन्न वाढीकरिता मुख्य पिकांसोबत भाजीपाला पिकाची लागवड करतो. या शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा होण्यासाठी प्रत्येक तालुक्या किमान एक, याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्यात येणार आहेत.
योजनेची उद्दिष्टे
भाजीपाला पिकाची नियंत्रित वातावरणामध्ये तयार केलेली किडमुक्त व रसायनमुक्त रोपे उपलब्ध करुन देणे. स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायातून उत्पन्न मिळवून देणे. पीक पद्धतीत बदल आणि नवीन तंत्रज्ञानाचा अंगिकार करणे. उत्तम दर्जाच्या भाजीपालाच्या उत्पादनात, निर्यातीत आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, या उद्देशानं ही योजना सुरु करण्यात आली.
कोणते शेतकरी पात्र?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेअंतर्गत रोपवाटीका सुरु करण्याकरता शेतकऱ्यांकडे एक एकर जमीन, रोपवाटीकेसाठी पाण्याचा कायमस्वरुपी स्त्रोत असणं गरजेचे आहे. कृषी पदवीधर महिला आणि त्यांचे गट तसेच भाजीपाला उत्पादक व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व त्यांचे गट यांना योजनेत प्राधान्य देण्यात येईल.
प्रशिक्षणाची सोय
रोपवाटीका उभारण्यासाठी कृषी विभागाकडून पॉलि टनेल, शेडनेट, प्लास्टिक क्रेट, नॅप्सॅक फवारणी यंत्र इत्यादी प्राथमिक सुविधा पुरवण्यात येतील आणि तीन ते पाच दिवसांचे तांत्रिक प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या निकषांप्रमाणं या योजनेची अंमलबजावणी केली जाईल. प्रकल्प किंमतीच्या 60 टक्के आणि 40 टक्के अशा दोन हप्त्यांमध्ये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. राज्य शासनाकडून 11.62 कोटी रकमेचे अर्थसहाय्य यासाठी प्रस्तावित आहे.
सौजन्य :- समाज माध्यम