आबाजीनं माग पाहिलं तो, आपल्या धारकऱ्यांसह शिवाजीराजे धावत येत होते. राजांच्या हातात तळपती तलवार होती.
राजांच्या आज्ञेनुसार आबाजी बाजूला झाला. बाजी आणि शिवाजीराजे एकमेकांसमोर थोड्या अंतरावर उभे होते.
शिवाजीराजांच्या भोवती राजांच्या धारकऱ्यांचं कडं होतं. मशालधारी दोन्ही बाजूंना उभे होते.
बाजी प्रथमच शिवाजीराजांना पाहत होते.
फारतर तीस वर्षांची उमर. जिरेटोप घातलेली, शिवगंधानं कपाळ रेखलेलं. काळ्या भुवयांखाली तेजस्वी, वेध घेणारे डोळे बाजी पाहत होते. कोवळ्या वयाचं भान त्या रुपात नव्हतं. ना भीतीचा लवलेश नजरेत उतरला होता. उलट, तशा गंभीर प्रसंगीही मुखावर मंद स्मित विलसत होतं.
क्षणभर युद्धाचं भान विसरुन बाजी शिवाजीराजांच रुप निरखीत होते.
बाजी उद्गारले,
‘कोण! शिवाजी राजे!’
राजांच्या ओठांवरचं स्मित ढळलं नाही. ते म्हणाले,
‘एकंदर, ओळखलंत, तर!’
‘न ओळखायला काय झालं! बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करणारा दुसरा कोण असणार?’
राजांच्या भोवती कडं करून उभ्या असलेल्या वीरांत तानाजी, येसाजी होते. बाजींच्या त्या उद्गारांनी संतापलेल्या तानाजी, येसाजींनी, आपल्या तलवारी पेलल्या.
शिवाजी राजे मात्र शांत होते. हाताच्या इशाऱ्यानं राजांनी त्या वीरांना थोपविलं.
‘खरं आहे, बाजी, आम्ही बेसावध शत्रूवर जरूर चाल केली असेल. पण आम्ही बेसावध प्रजेला कधी नागवलं नाही. कन्यावत आम्ही तिला मानलं! मानतो!’
राजांनी आपली तलवार म्यान केली.
त्या कृतीने बाजी बेचैन बनले. शिवाजीची चाल त्यांना कळत नव्हती.
गडावर शांतता पसरली होती. बाजी, शिवाजीराजे यांच्या भोवती मावळ्यांचा गराडा पडला होता. पलोत्यांच्या उजेडात दोघे एकमेकांना पाहत होते.
‘गड आमच्या कबजात आहे, बाजी!’ राजे म्हणाले.
‘असं तुम्ही समजत असाल, राजे! जोवर हा बाजी उभा आहे, तोवर गड कबजात आला, असं समजू नका.’
‘बाजी, तेही आम्ही जाणातो. पण निष्ठा सत्कारणी लावावी.’
‘आमच्या निष्ठेबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही. पराजित ठरलो, तरी हवे ते आरोप सहन करणार नाही.’
‘खोटे आरोप करण्याची आमची आदत नाही. तुम्ही वीर आहात. धर्म जाणता. तुमचे आजे आणि थोरले बंधू अनाजी हे बांदलांनीच मारले ना? बांदलांच्या झगड्यात खुद्द तुम्ही आणि आमचे वडील जखमी झालात. ते पिढीजात वैर विसरून पुन्हा त्याच बांदलांची चाकरी करू लागलात. कोणत्या निष्ठेपायी?’
‘राजे! बाजी उद्गारले.
‘बाजी, राजे म्हणून मिरवायची आम्हाला हौस नाही. ती महत्त्वाकांक्षा तुमच्या मालकांनी बाळगली आणि त्या सत्तेपायीच त्यांनी आपल्या रयतेवर हवे ते जुलूम केले. ती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जेध्यांचं वैर पदरात घेतलं. तुम्ही त्यांचे प्रधान-देशपांडे, देसकुलकर्णी. हिरडस मावळचे एक वतनदार. त्या वतनासाठी किती शेतकऱ्यांची पिकं लुटलीत? किती लोकांच्यावर इतराजी होऊन त्यांची घरंदारं उद्ध्वस्त केलीत? किती आयाबहिणींची अब्रू घेतलीत?’
‘राजे!’ बाजी कडाडले.
‘आवाज वाढवू नका! तुम्ही वतनदार. तुम्ही हे केलं नाहीत, तर वतनदार कसले? हे सार तुमच्या मालकांनी केलं आणि ते तुम्ही त्यांचे प्रधान म्हणून थंडपणे पाहिलंत!’
‘तुम्ही काय कमी आहात? असेल हिंमत, तर अजून तलवार म्यानाबाहेर काढा.’
राजांचा हात तलवारीच्या मुठीवर गेला. ते हसले.
‘बाजी, तुम्हांला माहीत नसेल. आमच्या तलवारीचं नाव भवानी आहे. ते आमचं कुलदैवत. ती बाहेर पडते, ती फक्त अन्यायाविरुद्ध. नाही, बाजी, आमची भवानी तलवार तुमच्याकरिता नाही. बाजी, तुम्ही आम्हाला हवे आहात.’
‘कशाला? पुंडाव्यासाठी?’ बाजी उपरोधानं म्हणाले.
‘खामोश! कुणावर आरोप करता हे? खुद्द तुमचे वडील कृष्णाजी प्रभू — शहाजी राजांच्या पथकात होते, हे विसरलात? बारा मावळची जहागीर भोसल्यांची, पण बांदल देशमुख बळजबरीनं आमच्या भागात वसूल करू लागले. पुंडावा केला असेल, तर तो बांदल देशमुखांनी आणि त्यांना साथ करणाऱ्या वतनदारांनी. नाही, बाजी, आम्ही पुंडावा केला नाही. उलट, आम्ही पुंडाव्याचा बीमोड केला; करतो आहोत. मोरे, घोरपडे, सावंत यांनी का थोडी प्रजा गांजली? येवढंच कशाला, आमचे खुद्द मामा, सुप्याचे मोहिते, त्यांनी असेच अत्याचार करायला सुरुवात केली. त्यांच्या मुसक्या आवळून आम्हाला त्यांना बंगळूरला पाठवावं लागलं.’
बोलता-बोलता राजांनी बाजींच्या दिशेनं दोन पावलं टाकली.
बाजी ओरडले,
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया )