देवेंद्र पाटील / जळगांव
जगभराच्या आहार शास्त्रात कांद्याचे औषधी गुणधर्म खूपच मोलाचे आहे. गृहिणीच्या स्वयंपाक घरातील बजेटपासून ते शेतकऱ्यांच्या अर्थकारणांमध्ये हमखास कांदा चर्चेत असतोच. सततच्या मागणीमुळे कांद्याचे दरही चांगलेच असतात तर कधी कांदा रडविल्याशिवाय राहत नाही, मात्र पांढरा कांदा शेतकऱ्यांच्या अर्थकारणांमध्ये नक्कीच बदल घडवितो यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह हमीभावाची साथ महत्त्वाची असते. जैन इरिगेशन सिस्टिम्स ली. कंपनीच्या याच विश्वासावर पांढरा कांदा शेतकऱ्यांना समृद्धीचा मार्ग मिळत आहे. असाच समृद्धीचा मार्ग रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील प्रगतिशील शेतकरी पंकज चंद्रकांत पाटील यांना पांढरा कांद्याच्या माध्यमातून गवसला आहे त्यांच्या शेतीची ही यशोगाथा…
वडिलांच्या पायाचे ऑपरेशन अन् पंकजचे पाय वळले शेतात..
बी.एस.सी.च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर महाविद्यालीयन शिक्षणाची स्वप्ने रंगवित असतानाच पंकज यांच्या वडिलांच्या पायाचे ऑपरेशन करावे लागले. वडिलांच्या पाय लॉक झाल्याने संपूर्ण शेतीसुद्धा लॉक झाली कारण वडिलांना डॉक्टरांना तब्बल चार ते पाच महिने पायाची हालचाल करण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे शेती पाहणे शक्य नव्हते. पंकज यांच्या वयाच्या 21 व्या वर्षीच 27 एकर शेतीचा भार त्यांच्यावर आला.
मिश्र पिक पद्धतीतुन आर्थिक उलाढाल
पंकज पाटील यांची निरीक्षण क्षमता प्रचंड त्यांनी संपूर्ण 27 एकर शेतीचे कसून नियोजन केले. मिश्र पिक पद्धतीचा अवलंब करण्याचे त्यांनी ठरविले. थोरगव्हाण शिवारातील त्यांची ही जमीन तशी काळी कसदार परंतू पाण्याचा थोडा निचरा कमी होणारी त्यानुसार पिक पद्धती त्यांनी अवलंबली. ज्वारी, उडीद, कापूस, मका, काशिफळ, गहू, हरभरा असे पिके घेणे सुरू केले. यामध्ये मुख्य पिक म्हणून कापूस आणि जैन इरिगेशनचा पांढरा कांदा हे पिके ते घेतात.
ठिबक मधून पाणी बचतीचे सूत्र
पंकज पाटील यांच्या 27 एकर शेतीच्या सिंचनासाठी पाच बोअरवेल आणि एक विहीर हे पाण्याचे स्त्रोत आहे. पाणी मुबलक असतानाही ते कधीही कोणत्याही पिकाला मोकाट सिंचन पद्धतीने पाणी देत नाहीत. पाण्याचा काटकसरीने वापरावरच ते भर देतात. यासाठी जैन ठिबक ते वापरतात. कापूस व काशिफळसाठी इनलाईन किंवा पेप्सी ठिबक वापरतात. शिवाय पांढरा कांद्याच्या भरघोस उत्पादनासाठी जैन रेनपोर्ट स्प्रिंकलर्सचा ते वापर करतात. ठिबक वापरातून वेळ, श्रम, आणि पैशांची मोठी बचत होत असल्याचे ते सांगतात. पाणी, विज, मजूरी आणि सर्वात महत्त्वाची अतिरीक्त पाणी वापरामुळे होणारी जमिनीची धूप थांबत असल्याचे पंकज पाटील सांगतात.
बेड पद्धतीवर घेतला कांदा
पंकज यांनी खरीप व रब्बीसाठी पांढरा कांदा लागवड केली. गेल्या दहा वर्षापासून ते जैन इरिगेशनसोबत करार पद्धतीने पांढरा कांदा लावत असतात. दोघंही हंगामासाठी पूर्व मशागतीमध्ये ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर करून जमिन भूसभूसीत करतात. यानंतर त्यानंतर 36 इंचाचे बेड तयार करून कांदा पेरणी यंत्राद्वारे कांदा पेरणी केला. यानंतर कंपनीच्या शिफारशीनुसार आंतरमशागत केल्याचे ते सांगतात.
खतांचे व्यवस्थापन
खरिप हंगामासाठी जेएसएल-5 तर रब्बीसाठी जे-12 हे पांढरा कांद्याचे वाण त्यांनी लावले. खरिपामध्ये अडीच एकर तर रब्बीमध्ये साडे सहा एकर पांढरा कांद्याची लागवड त्यांनी केली. दोघंही हंगामासाठी त्यांनी एकरी सहा सुफर फास्फेटचा स्पेशल डोस दिला. किड, व मर लागू नये यासाठी फ्यूअरी हे थायमेंट एकरी 2 किलो वापरले. यानंतर युरिया, पॉटेश, मॅग्नेशिअम सल्फेट, झिंग सल्फेट, सल्फर आणि जिप्सम ही खते वापरली. त्यानंतर एकरी 10 किलो मायक्रोन्युट्रीयन ही खते दोघंही हंगामात वापरल्याचे ते सांगतात.
पांढरा कांद्याचे आर्थिक गणित
संपूर्ण 27 एकर शेताचा विचार केला असता दोघं हंगामात 12 ते 14 लाख खर्च येतो आणि निसर्गाने चांगली साथ दिली तर यातून 15 ते 20 लाखाच्यावर उलाढाल होते. यामध्ये पांढरा कांद्याचे आर्थिक गणित मांडताना ते म्हणतात, अडीच एकर जेएसएल-5 पांढरा कांदा लागवडीपासून ते काढणी पर्यंत सरासरी 80 हजार रूपयांपर्यंत खर्च आला. तर अडीच एकरात आठ टन कांद्याचे उत्पादन झाले. प्रति किलो 21 रूपये याप्रमाणे त्याला भाव मिळाला यातून जवळपास दिड ते दोन लाखाचे उत्पन्न झाले. तर रब्बी हंगामामध्ये जे-12 हे वाण साडेसहा एकरमध्ये पेरले. त्यातून 56 टन कांदा प्रमाणे कांदा उत्पादन झाला त्याला प्रति किलो नऊ रूपये प्रमाणे भाव मिळाला. यातून साडे पाच लाख रूपयांवर उत्पन्न मिळाले. खरीपासाठी एक तर रब्बीसाठी तीन असे एकूण चार लाख रूपये खर्च आल्याचे ते म्हणतात. खर्च वजा जाता पांढरा कांदा शेतीतून जवळपास तीन लाखाच्यावर उत्पन्न झाल्याचे पंकज सांगतात.
करार शेती प्रगतीचे व्दार
शेतकरी उच्च दर्जाचा मालाचे उत्पादन करीतो मात्र त्याला यशस्वी बाजारपेठ मिळविता येत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळविण्यासाठी विश्वासू पुरवठादार शेतकऱ्यांनी झाले पाहिजे यासाठी हक्काची हमी भावाची अशी करार शेती अपेक्षित आहे. जैन इरिगेशनच्या याच करार शेतीतून समृद्धी साधता येऊ शकते असा विश्वास पंकज पाटील यांनी व्यक्त केली आहे.
शेतीसाठी परिवाराचे प्रोत्साहन
वडिल चंद्रकांत आई आशा यांच्यासह पत्नी शिल्पा, मुलगा ओजस मुलगी अक्षजा यांचे प्रोत्साहन शेतीसाठी मिळत असते. शेतीमुळे शिक्षण अर्धवट सोडले असले तरी शिक्षणाचे महत्त्व पंकज यांना आहे. मुलांच्या शिक्षणासाठी ते खूप प्रयत्नशिल असतात. डॉक्टर, इंजिनिअर, वकिल अथवा कृषिक्षेत्र असो शिक्षणाशिवाय यामध्ये प्रगती नाही. पुस्तकी ज्ञानासोबतच अनुभवाने आलेले शिक्षण खूप मोलाचे असल्याचे ते म्हणतात.
शेतीचे भवितव्य खूपच चांगले आहे
संपूर्ण जगाची अन्नव्यवस्था आणि अर्थव्यवस्था व सामाजिक संतुलन हे कृषिक्षेत्रावरच अवलंबून आहे. आधुनिक जगात कितीही प्रगीती झाली किंवा भांडवल कितीही झाले तरी आपण पैशा, सोनं-चांदी वा भौतीक चीज वस्तूंचे भोजन करू शकत नाही. श्रीमंत असो वा गरिब यांची भूक शमविण्याची ताकद शेतीत आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने शेतीशी प्रामाणिक राहून शेती केली पाहिजे. सध्या आणि पुढेही शेतीचे भवितव्य खूपच चांगले आहे.
– पंकज चंद्रकांत पाटील
पांढरा कांदा उत्पादक शेतकरी
मोबा. 99230 50061
Interested this type of farming.
Please guide for CONTACT farming.