नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजनेसह केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी इतरही विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. सरकारच्या या योजना आणण्यामागचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे हा आहे. पीएम किसान योजनेत सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. आता त्याचप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन योजना आणली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे.
राजस्थान सरकारचा रसायनमुक्त शेतीवर जोर; सेंद्रिय शेती मोहिमेसाठी 600 कोटींची तरतूद
दोन एकरापेक्षा कमी जमीन असलेले शेतकरीच पात्र
पीएम किसान मानधन योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आपत्कालीन स्थितीत आर्थिक मदत करणे हाच आहे. 2 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून पेन्शन देण्यात येणार आहे. वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकरी या योजनेतून पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. यासाठी कसा अर्ज करायचा, कोण पात्र ठरू शकते, त्याची अधिक तपशीलवार माहिती आम्ही आपणास देत आहोत.
18 ते 40 वर्षे वय असतानाच करून घ्या नोंदणी
पीएम किसान मानधन योजनेंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना वार्षिक पेन्शनच्या रूपात 36,000 रुपयांची आर्थिक मदत देते. या योजनेत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
दुर्दैवाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास पत्नीला निम्मे पेन्शन
18 ते 40 वर्षे वयोगटात असताना शेतकऱ्यांनी या पेन्शन योजनेत नोंदणी केली असेल आणि त्याने नियमित साठ वर्षे वयापर्यंत हफ्ते भरले असतील तर वयाच्या साठीनंतर त्याला पेन्शन सुरू होते. साठीनंतर दुर्दैवाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, पत्नीला दर महिन्याला पेन्शनच्या 50 टक्के रक्कम दिली जाते. म्हणजेच पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला दरमहा 1,500 रुपये पेन्शन दिले जाईल.
शाश्वत शेतीसाठी एकात्मिक सिंचन प्रणाली महत्त्वाची – अतुल जैन
पेन्शन सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास?
वयाच्या साठीनंतर पेन्शन सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का? अशा स्थितीत शेतकऱ्याच्या पत्नीला शेतकऱ्याच्या साठीपर्यंतच्या उरलेल्या कालावधीसाठी स्वतः हफ्त्याची नियमित रक्कम भरून योजना सुरू ठेवता येते. पुढे तिला दरमहा ठरलेले पूर्ण 3,000 रुपये मानधन दरमहा मिळेल. उरलेल्या कालावधीसाठी पत्नीला स्वतः हफ्ते भरायचे नसल्यास, शेतकऱ्याच्या मृत्यूपर्यंत जमा एकूण हफ्त्याची रक्कम तिला परत मिळेल. त्यावर संपूर्ण कालावधीसाठी बचत खात्याचे लागू असलेले व्याजही दिले जाईल.
शेतकऱ्याला किती भरावा लागेल दरमहा हफ्ता?
पीएम किसान मन धन योजना सुरू केल्यावर, शेतकऱ्याला दरमहा फक्त 55 ते 200 रुपये जमा करावे लागतील. हफ्त्याची रक्कम ही शेतकऱ्याच्या वयावर ठरेल. जितक्या लवकर पेन्शन योजनेसाठी नोंदणी केली जाईल, तितका हफ्ता कमी बसेल. ज्या शेतकऱ्यांना, पीएम किसान म्हणजेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून वार्षिक सहा हजार रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळतो, ते परस्पर त्या अनुदानातून पीएम किसान मन धन योजनेचा हफ्ता वळता करण्याचा पर्याय निवडू शकतात. त्यामुळे चुकून काही कारणाने हफ्ता भरण्याचे राहून गेल्याने योजनेचा लाभ बंद होण्याची भीती नसते.
गोगलगायचा बंदोबस्त करण्याचे उपाय
तरुण शेतकरी अशी करू शकतील नोंदणी
पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. पीएम किसान मानधन योजनेसाठी, प्रथम तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल. महाराष्ट्रात सेतू केंद्र किंवा आपले सरकार सुविधा केंद्रातही ही सोय उपलब्ध आहे. याशिवाय, ग्रामपंचायत संगणक परिचालक आणि देशातील निवडक पोस्ट ऑफिस तसेच शेतकरी कर्ज देणाऱ्या निवडक बँकेतही नोंदणी करण्याची सोय आहे.
शेतकऱ्यांव्यतिरिक्त आणखी कोण ठरू शकते पात्र?
शेतकऱ्यांशिवाय तमाम असंघटित क्षेत्रातील 18 ते 40 वयोगटातील कामगार याच धर्तीवर असलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेसाठी पात्र ठरू शकतात. मात्र, त्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांच्या आतील असावे. रस्त्यावर दुकान लावणारे, घरातून व्यवसाय करणारे, प्लंबर, चालक, गिरणी कामगार, शेतमजूर, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, कचरावेचक, बिडी कामगार, चर्मकार, धोबी, भूमिहीन मजूर, व्हाऊचरवर वेतन मानधन घेणारे कामगार किंवा इतर कुणीही वयोगट व उत्पन्न निकषात पात्र असलेली व्यक्ती या पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात.
कुणाला पीएम किसान व श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेता येणार नाही?
कोणत्याही पीएफ, पीपीएफ, ईएसआय अथवा इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेचे सदस्य, लाभार्थी यासाठी पात्र ठरणार नाहीत.याशिवाय, कोणाताही इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर करदाता पात्र ठरू शकणार नाही. समजा, एखादी पात्र व्यक्ती संघटित क्षेत्रात किंवा शेतकरी असेल आणि नंतर ती नोकरीस लागली किंवा पीएफ, पीपीएफ, ईएसआय योजनेचे सदस्य बनली अथवा आयकर करदाता झाली, तर ती सुरू असलेल्या योजनेत अपात्र ठरेल. त्या व्यक्तीला तोवर जमा झालेल्या हफ्त्यांची रक्कम व्याजासह परत मिळू शकेल. याशिवाय, हफ्त्यातील सरकारचा भागही स्वत:च भरून वाढीव हफ्त्यासह त्या व्यक्तीला योजना नियमित पुढे सुरू ठेवता येईल.
Penshan
पेन्शन योजना लागू करावी अशी विनंती करतो
Mu. Nandara Post nachanekhede Tel jamner DIST jalgaon