मराठवाड्यातील बीड जिल्हा हा तसा दुष्काळीच समजला जातो त्यातही उन्हाळा म्हटले की कोठेही जा ४३ डिग्री पर्यंत तपमान व सर्वत्र उजाड जमिनी, (कोठेतरी अपवादात हिरवाई दिसते) व विवंचनेत दिसणारे माणसांचे चेहरे. पण काही शेतकरी मात्र जिद्दी आहे. त्यातील काहीजण विचारपूर्वक नियोजन करून शेती करतात. त्यातूनच ते शेतकऱ्यांचे आयडॉल बनतात. गजानन साळेगाव येथील असाच एक शेतकरी ज्याने कृषी पदवी घेऊन नोकरीच्या मागे न लागता बाजाराचा अभ्यास करून सिमला मिरचीची नियोजनबद्ध शेती करून अल्पावधीत लाखोचे उत्पन्न मिळविले आहे. हा हंगाम संपण्यापूर्वी त्यांना ८ लाख रु.चे उत्पन्न अपेक्षित आहे. शेतीत पाणी असणाऱ्या परंतु पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे गजानन इंगळे या तरुणाने एक आदर्श निर्माण झाला आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात बसलेले साळेगाव. येथून मांजरा नदी जवळ आहे पण त्या नदीचा काठ हा बारमाही ऊसामुळे हिरवागार तर बाकी सर्वत्र पाणी टंचाई कायम हे परस्परविरोधी चित्र येथेच आहे. या गावात अनेकांनी शेतीत विविध प्रयोग करून चांगले उत्पन्न मिळवले आहे. गाव तसे मोठे नाही, पण गावातील अनेक तरुण शिकून नोकरीसाठी शहरात गेलेले. मात्र गेल्या दिड वर्षांपासून यातील बरेच युवक गावी परत आलेत. तर गतवर्षीच्या लॉकडाऊन पूर्वी काहीजण पदवी घेऊन घरीच बसले. असाच एक तरुण गजानन इंगळे १९/२० मध्ये परभणी कृषी विद्यापीठातून बी.एस.सी.पदवी प्राप्त केलेली. नोकरी करायची तर कोरोनामुळे तेही अवघड. एखादा व्यवसाय करावा तर भांडवल नाही. पत असल्याशिवाय बँक कर्ज देत नाही, त्यातूनही तो सुरु केला तर चालेल की नाही हा प्रश्न. असे अनेक प्रश्न घेऊन तो इतर मित्रांसमवेत चर्चा करावयाचा. त्यात साळेगावचे उपसरपंच असलेले अमर मुळे व एका कृषी सेवा केंद्राचे मालक असलेले रमेश थोरात यांनी गजानन यास मार्गदर्शन केले की “शेती कर ,पण पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दे.” त्यातून उन्हाळ्यात एका एकर मध्ये ढोबळी मिरची लावण्याचा इरादा पक्का झाला.
पूर्वतयारी
गजानन यांचे घरी आई, वडील एक लग्न झालेली बहीण व शिकत असलेला लहान भाऊ, असा परिवार. त्यात
बहिणीचे लग्न होऊन ती सासरी गेलेली. म्हणजे कुटुंबात चार जणच. घरी २५ एकर जमीन. एक ४ परस ( २५ ते ३० फूट ) विहीर व एक बोअर ४५० फूट खोलीचे. दोन्हीला मिळून चांगले पाणी. त्यामुळे ४ एकर ऊस कायम असे. त्याशिवाय दोन वर्षांपूर्वी २ एकर शेवगा व २ एकर गोल्डन जातीचे सीताफळ लागवड केलेली आहे. एक एकर वर ढोबळी मिरची लावण्याचा निर्णय जानेवारीत झाला. जमीन नांगरून घेतली. रोटाव्हेटरने जमीन पाळी घालून माती मोकळी (भुसभुशीत) करून घेतली. त्याच मशिनने २ फूट रुंदीचे १ फूट उंचीचे बेड दोन ओळीत ५ फूट अंतर ठेऊन तयार केले. बेडमध्ये २ ट्रॉली घरचे चांगले कुजलेले शेणखत व ५ गोणी
(२५० किलो) १०:२६:२६ खत मातीत मिसळून बेड तयार केले. त्यावर २० मी.मी. चा ठिबक संच अंथरून त्यावर मल्चींग टाकून तयार केले. केज येथील नर्सरीमधून एका नामांकित जातीची १६०० रोपे खरेदी केली. त्यापैकी १३०० रोपे ५x२ अंतरावर लागवड केली. ६ फेब्रुवारी २०२१ या दिवशी लागवड झाली. शेतात कायमस्वरूपी एक सालगडी पण ४०० रु.रोज अशा हजेरीने व ५ महिला २०० रु. रोजंदारीने ठेवलेल्या आहेत. तोडीच्या वेळी किंवा जादा कामासाठी त्या-त्या आवश्यकतेनुसार इतर मजुरांना बोलावले जाते.
खत व कीड रोग नियंत्रण
रोपे लागवडीनंतर ८ ते १० दिवसापासून खत देणे ड्रीप मधून सुरु केले ते अजूनही सुरु आहे. त्यामध्ये १९:१९:१९ हे ५ किलो दर दोन दिवसाला असे १५ दिवस २५ दिवसानंतर १२:६१:० हे ६ किलो दोन दिवसाला व ४० दिवसांनी १३:४०:१३, ८ किलो ड्रीप मधून दिले. फळ लागणीनंतर १३:०:४५ ८ किलो कॅल्शिअम ५ किलो बोरॉन १ किलो ड्रीपमधून सोडले. अजून दोन महिने असेच खताचे नियोजन ठेवले आहे. उन्हाळ्यात फारशा कीड किंवा रोग येत नाहीत. मात्र तिव्र उष्णतामान व भुरी पासून संरक्षण मात्र करावे लागते. त्यामुळे रोपांची लागवड झाल्याबरोबर ४ दिवसात प्रिव्हेंटर व बेन्व्हिया ड्रीप द्वारे सोडले तर लगेचच बुरशीनाशक साठी कवच व स्कोरची फवारणी केली. मावा,तुडतुडे साठी डेलिगेट. भुरी व बुरशीसाठी मेरिऑनचा व ब्लू कॉपर १ किलो एकरीचा डोस ड्रिपमधून दिला. अजूनही गरज पडली तर विविध औषधांची फवारणी करणार आहे असे गजानन म्हणाले.
लागवडीपासून ५० दिवसांनी म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून तोडणी सुरु झाली. आतापर्यंत ५ वेळा तोडणी झाली आहे. प्रत्येक तोडणीत ३५ ते ४५ क्विंटल मिरची निघत आली आहे. कळंब जि.उस्मानाबाद येथील व्यापारी जागेवर येऊन सर्व माल खरेदी करतात. करोनामुळे फार चांगला भाव मिळाला नाही. तरी २००० ते २२०० रु. क्विंटल दर मिळाला आहे. ५ व्या तोडीसाठी २४०० रु. दर मिळाला. असे एकूण आतापर्यंत २० टन माल विक्री केला आहे. मे अखेर पासून ३० ते ३५ रु. किलो भाव मिळेल असे इंगळे यांना वाटते. जुलैमधील शेवटच्या काढणी पर्यंत ४० टन पेक्षा जास्त एकूण विक्री होईल असा अंदाज असून. नंतर मिरची काढून आहे त्याच मल्चिंग वर फ्लॉवर लावण्यासाठी तयारी सुरु झाल्याचे इंगळे सांगतात. गतवर्षी शेवग्यापासून दिड लाख रुपयांचे उत्पन्न घेतले होते. त्या तुलनेत यावर्षी कमी कालावधीत जास्त उत्पन्न मिळाले. खर्चही जास्त झाला मान्य पण कमी काळात खूपच चांगले उत्पादन व उत्पन्न मिळाले आहे.
खर्च व उत्पन्न
बहुतांश शेतकरी शेतात होणारा खर्च लिहित नाहीत. त्यामुळे उत्पन्न हाती आल्यानंतर नफा किती झाला हेच कळत नाही. परंतु गजानन यांनी प्रत्येक खर्चाचा तपशील ठेवला आहे. त्यांच्या हिशोबानुसार त्यांनी रोपे खरेदी १६००० रु. + मल्चिंग १५००० रु.+ बेसल डोस १०००० रु.+ पेरणीपूर्व जमीन मशागत व इतर ३०००० रु.+ फवारणी लिक्विड खते व आंतर मशागत ५०००० रु. मिरची तोडणीसाठी मजुरी ४०००० रु. व इतर किरकोळ खर्च ५००० रु असा एकूण सुमारे १६६०००/- रु. खर्च झाला आहे. तर ५ व्या तोडी अखेर ४१०००० रु. (चार लाख दहा हजार) रु. मिळाले आहेत. म्हणजे आजवर त्यांना एकरी २४४०००/- रु निव्वळ नफा मिळाला आहे. येथून पुढे सुमारे किमान ७ तोडणी होतील व बाजारात दरही चांगला मिळेल. जुलैला शेवटची काढणी होईपर्यंत सूमारे ८ लाख रु.चे उत्पन्न मिळेल तर अजून खर्च सुमारे १ लाख होईल. म्हणजे सहा महिन्यात निव्वळ नफा साडे पाच ते सहा लाख रु. होणार.
गजानन इंगळे म्हणतात करोना मुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यातील अनेकजण शेतकऱ्यांचीच मुले आहे व ग्रामीण भागातील तरुणही शेती करतो आहे. माझे त्यांना सांगणे आहे की पारंपरिक पिकांपेक्षा फळभाजी व भाजीपाला लागवड ही कमी कालावधीत अधिक उत्पन्न देऊन जाते. मात्र त्यासाठी बाजापेठ, बाजारभाव, शेतीतील तंत्रज्ञान, वातावरणातील बदल यासह आपली जमीन, माती व पाणी याचा किमान अभ्यास असला पाहिजे. याकामी कोणीतरी ताज्ज्ञ मार्गदर्शक असावा. मला
उस्मानाबादचे सेल्स टॅक्स ऑफिसर असलेले व शेतीची आवड असणारे माझे काका रामचंद्र इंगळे, साळेगावचे उपसरपंच अमर मुळे (यांनीही यापूर्वी ढोबळी मिरची उत्पादन घेतले आहे ) व एका कृषी सेवा केंद्राचे चालक रमेश थोरात यांनी मार्गदर्शन करून माझ्या मिरचीच्या प्लॉटला वेळोवेळी भेट दिली. माझे आई वडील व लहान भावानेही साथ दिली. भविष्यातही मी विविध प्रयोग करून
अधिकाधिक उत्पन्न घेत राहणार आहे.”
गजानन इंगळे ९९२१२७०६४१