सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणार्या जपान या देशाबद्दल मला लहानपणापासूनच कुतूहल होते. वर्ष 1945 मध्ये झालेल्या दुसर्या महायुद्धात अणुबॉम्बच्या हल्ल्यात बेचिराख होऊनही स्व-कर्तृत्त्वाने उभा राहिलेला जपान आज कितीतरी पटींनी पुढे आहे. राष्ट्रप्रेमाने भारावलेले या देशातील नागरिक आधी नेहमी देशाचा विचार करतात. म्हणूनच जपान जगभरातील प्रमुख विकसित राष्ट्रांपैकी एक आहे. विशेष म्हणजे जपानमध्ये शेती करणे म्हणजे राष्ट्रकार्य मानले जाते.
आयुष्यात एकदा तरी जपानला भेट द्यावी, असे माझे स्वप्न होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मी मलव्ह इन टोकियोफ हा सिनेमा पाहिला होता. त्या सिनेमात जपानच्या टोकियो या शहराचे चित्रीकरण करण्यात आलेले होते. निसर्गाची देणगी लाभलेला जपान त्यातून अधोरेखित होत होता. त्यामुळे जपान विषयीचे कुतूहल अजून वाढले होते. मात्र, जपानला भेट देण्याचा योग जुळून येत नव्हता. उशिराने का होईना; पण हा योग अखेर जुळून आला. संपूर्ण आयुष्यभर ज्या देशाला भेट देण्याची मनोमन इच्छा होती, त्या देशात जाण्याची संधी मे 2018 मध्ये मिळाली. तेथील संस्कृती, वातावरण, रुढी, परंपरा, दैनंदिन जीवन हे सारे जवळून अनुभवता आले. सर्वात महत्वाचे म्हणजे, जपानच्या नागरिकांची शेती करण्याची पद्धत अतिशय उल्लेखनीय आहे. शेती हे राष्ट्रकार्य आहे, असे मानून ते शेती करतात. शंभर टक्के सेंद्रिय शेती करण्यावर भर देणार्या जपानचा आदर्श घेण्याची गरज आहे.
उगवत्या सूर्याचा देश
जपानला जाण्याचे निश्चित झाल्यानंतरही आपण जपान दौर्यावर जाणार आहोत, या बाबीवर विश्वासच बसत नव्हता. अगदी विमानात बसेपर्यंत मला खरे वाटत नव्हते. 24 मे 2018 रोजी जपानला जाण्यासाठी निघालो. तब्बल 12 तासांच्या विमान प्रवासानंतर जपानच्या भूमीवर पाऊल ठेवले. जपानमध्ये आपल्या देशापेक्षा 3 ते 4 तास अगोदर सूर्य उगवतो. इतर बाबतीतही जपान जगातील इतर देशांपेक्षा अग्रेसर असल्याने जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणत असावेत, असा विचार त्यावेळी मनात आला. जपानला निसर्ग सौंदर्याची देणगी लाभली आहे. हे सौंदर्य मयाची देही, याची डोळाफ अनुभवता आल्याने धन्य झाल्याची प्रचिती आली. जपान हा देश जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वच आघाड्यांवर अग्रेसर आहे. जपानी लोकांचे आयुष्यमानही जास्त आहे. या गोष्टीला तेथील निसर्गसंपदा आणि वातावरण कारणीभूत असल्याचे मानले जाते. जपानमध्ये दाखल झाल्यानंतर टोकियो शहरात थांबण्याची व्यवस्था होती. या दौर्यात मी तब्बल 7 रात्री आणि 8 दिवस जपानमध्ये थांबलो होतो. या काळातील आठवणी माझ्यासाठी अविस्मरणीय ठेवा आहेत. महाराष्ट्र राज्याएवढे क्षेत्रफळ असलेल्या जपानने आज सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. उंच-उंच इमारती, सर्वत्र कमालीची स्वच्छता आणि टापटीपपणा, शिस्त, दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक बाबतीत तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा पुरेपूर वापर पाहून आपल्यापेक्षा येथील नागरिक शेकडो पावले पुढे असल्याचे जाणवले. जपान देशातील एक गोष्ट मला खूपच विशेष वाटली. तेथील शहरी आणि ग्रामीण भाग कमालीचा पुढारलेला आहे. सर्वत्र पक्क्या रस्त्यांचे जाळे आहे. शहरी भागात सिमेंट काँक्रिटच्या गगनचुंबी इमारती आहेत.
वृक्षांची काळजीपूर्वक जपणूक
प्रत्येक इमारतीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि इमारतींच्या प्रत्येक मजल्यावर, टेरेसवर फुले, शोभेची झाडे-वेली असलेल्या कुंड्या ठेवण्यात येतात. प्रत्येक इमारत हिरव्यागार झाडे-वेलींनी झाकोळलेली आहे. त्यामुळे संपूर्ण शहर हिरवळीत लुप्त झालेले दिसते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूलाही वृक्षलागवड केलेली आहे. रस्त्यांवरील सार्वजनिक स्वच्छतागृह देखील झाडे आणि वेलींनी झाकलेले आहेत. स्वच्छतागृहांच्या आतदेखील फुलांच्या कुंड्या व्यवस्थित ठेवलेल्या असतात. त्यांची देखभाल उत्तमरीत्या ठेवली जाते. निसर्ग संपदेचे रक्षण करण्यास प्राधान्य दिले जाते. वृक्षतोड करणे मोठा अपराध समजला जातो. वृक्षतोड होऊच नये, यासाठी जपानमध्ये कडक कायदे असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याचे तेथील नागरिकांनी मला सांगितले. जपानमध्ये वृक्षलागवडीसाठी एक टक्काही खर्च न करता लागवड केलेल्या वृक्षांची काळजी घेतली जाते. अबालवृद्ध या कामी स्वत: हिरीरीने सहभाग नोंदवतात. प्रत्येक सामाजिक काम ते राष्ट्रनिष्ठा म्हणून पार पाडतात. जपानमधील ग्रामीण भागातील वातावरण अतिशय रम्य आणि आल्हाददायी आहे. या देशाचे क्षेत्रफळ कमी असून तेथील लोकांकडे शेतजमीन देखील कमीच आहे. छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये जपानी लोक शेती करतात. जपानच्या ग्रामीण भागात घराघरातील लोक भाताची शेती करतात. विशेष म्हणजे, ते शेतातच घर करून राहतात. प्रत्येक व्यक्ती निसर्गरम्य वातावरणात राहून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती करतो. शेती कसणे म्हणजे राष्ट्रकार्य मानले जाते. त्यामुळे उत्पन्न ही बाब गौण असते. राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेऊन सेंद्रिय शेतीने केली जाते. सेंद्रिय पद्धतीमुळे शेतीतून उत्पादित होणारा शेतमाल म्हणजेच, भाजीपाला, फळे, धान्य खूपच चवदार असते. जपानच्या लोकांची राष्ट्रनिष्ठा पाहून मी खूप भारावलो.
मातृभाषेवर विशेष प्रेम
सर्वच क्षेत्रात जपान पुढारलेला आहे. परंतु, तरीही तेथील नागरिक बडेजाव आणत नाहीत. वागण्या-बोलण्यात अतिशय विनम्रता. पाहुण्यांचा ते विशेष आदर करतात. मातृभाषेवर त्यांचे खूप प्रेम असून इंग्रजी भाषा ते गरजेपुरती आणि अपवादात्मक स्थितीतच वापरतात. जपानला जाण्याचे ठरल्यानंतर मी 15 दिवसात जपानच्या मातृभाषेविषयी अभ्यास केला. एकमेकांशी संवाद साधताना वापरले जाणारे काही शब्द मी शिकून घेतले. त्यामुळे जपानला गेल्यावर मी जेव्हा तेथील लोकांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधला तर ते अवाक् झाले. परदेशातील ज्येष्ठ नागरिक आपल्या भाषेत संवाद साधत आहे, हे पाहून त्यांना विशेष अभिमान वाटला. त्यांची आदरातिथ्याची पद्धत मला खूपच आवडली. समोरच्या व्यक्तीचे स्वागत करताना आणि त्याला निरोप देताना ते नेहमी आपले दोन्ही हात कंबरेवर ठेऊन कंबरेत वाकून विनम्रपणे नमस्कार करतात.
संस्कृतीचे जतन
जपानच्या नागरिकांनी आपल्या संस्कृतीचे जतन केले आहे. राष्ट्र विकासाची शिखरे पादाक्रांत करत आहे. परंतु, तरीही ते आपली संस्कृती विसरलेले नाहीत. शहरी आणि ग्रामीण भागात आजही पारंपरिक रुढी-परंपरा पाळल्या जातात. ग्रामीण भागातील लोक अजूनही दररोज सकाळी घराच्या उंबरठ्याची आणि दरवाजाची मनोभावे पूजा-अर्चा करतात. शहरी भागातही ही प्रथा पाळली जाते. नुसता घराचा उंबरठा आणि दरवाजाच नाही तर प्रत्येक दुकान, कंपनीच्या दरवाजाचीही पूजा होते. उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनियर असला तरी तो कार्यालयात जाताना तेथील उंबरठा आणि दरवाजाला नमस्कार करूनच आत प्रवेश करतो. ही बाब मला विशेष वाटली. विशेष म्हणजे, ते परदेशी संस्कृतीचे अजिबात अनुकरण करत नाहीत. तसे करणे म्हणजे राष्ट्रविरोधी कृत्य केल्याची त्यांनी भावना आहे.
पर्यावरण रक्षण
निसर्ग सौंदर्याची देणगी लाभलेल्या जपानमध्ये पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेतली जाते. निसर्ग सौंदर्याचे रक्षण करण्यासोबतच त्यात भर कशा पद्धतीने पडेल? यासाठी सदैव प्रयत्न केले जातात. जपान हा देश विविध छोट्या-छोट्या बेटांच्या समुहांनी तयार झालेला आहे. देशाच्या आजूबाजूला समुद्र असल्याने अनेक वेळा नैसर्गिक आपत्ती कोसळते. त्यात पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. ही हानी भरून काढण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा या कामी ते पुरेपूर वापर करतात. पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून ते छोट्या-छोट्या गोष्टी पाळतात. वाहनांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. म्हणून ते दुचाकी किंवा चारचाकीचा वापर गरजेवेळीच करतात. एरवी सायकलचा वापर करण्यावर भर असतो. ज्येष्ठ नागरिकही सायकलच वापरतात किंवा पायी फिरतात. यावरून जपानी लोकांची दुरदृष्टी लक्षात येते.
(क्रमशः)
मोबाईल नंबर- 9960634747, 8551858080.
(लेखक सोलापूर येथील
प्रगतशील शेतकरी आहेत)