प्रतिनिधी/ मुंबई
सुरुवातीपासूनच विविध कारणांनी चर्चेत असणारे बीटी कापूस बियाणे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पण यावेळी कारण आहे दरवाढीचे. केंद्र सरकारने या वर्षीच्या हंगामासाठी बीजी -१ आणि बीजी-२ कपाशी बियाणे दरात पाच टक्के वाढीचा निर्णय घेतला आहे. बियाणे कंपन्यांकडून बीटी बियाणे दरात वाढीची मागणी होती. नॅशनल सीड असोसिएशनने केंद्र सरकार स्तरावर त्यासाठी पाठपुरावा केला होता.
नवीन दरानुसार बीजी -१ बीटी पाकीट ६३५ रुपयांना मिळेल. तर बीजी -२ पाकिटांची किंमत ७६७ रुपये करण्यात आली असून याविषयीचे राजपत्र बुधवारी (३१ मार्च २०२१) प्रसिद्ध करण्यात आले आहे. नॅशनल सीड असोसिएशनने केंद्र सरकार स्तरावर या भाव वाढीसाठी पाठपुरावा केला होता. दर वाढले असले तरीही बीजी -१ तंत्रज्ञान रॉयल्टीविना उपलब्ध करुन दिले जात आहे. बीजी-२ वरील रॉयल्टीची आकारणी मात्र कायम आहे. गेल्या वर्षी हंगामात बीजी -१ कपाशी बियाण्याचे पाकीट ६३० रुपयांना, तर बीजी -२ चे पाकीट ७३० रुपयांना विक्री होती. यावर्षी मात्र बीटी बियाणे पाकीट दरात सरासरी पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. बीजी-१ बीटी पाकीट ६३५ रुपयांना तर बीजी -२ पाकिटांची किंमत ७६७ रुपये करण्यात आली आहे.
दरवाढ संशोधन आणि विकास कार्यासाठी
सर्वच बियाणे कंपन्यांकडून या दरवाढीचे स्वागत करण्यात आले असून या माध्यमातून संशोधन आणि विकास कार्यासाठी पैसा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा यादरवाढीमागे व्यक्त केली आहे. मात्र ही दरवाढ पुरेशी नसल्याचे नॅशनल सीड असोसिएशनचे म्हणणे आहे, बियाणे उद्योगाच्या मागणीनुसार सरासरी दहा टक्के दरवाढ हवी होती. सातत्याने कापूस बियाणे दरात कपात करण्यात आल्याने कंपन्यांचे संशोधन आणि विकासकार्य प्रभावी झाले होते. नवे वाण शोधनकार्यासाठी देखील पैशाची उपलब्धता करण्याचे आव्हान होते त्यामुळे ही दरवाढ संशोधन आणि विकास कार्यासाठी वापरली जाणार आहे.