विविध बियाणे कंपन्या आज रिसर्च व डेव्हलपमेंटवर करोडो रुपये खर्च करत आहेत. परंतु, फक्त स्वानुभवाच्या बळावर डोळसपणे शेती करणारा शेतकरी हाच जगातील सर्वात मोठा शास्रज्ञ आहे, असे प्रतिपादन श्रीराम बयोसिड जेनेटिक्सचे महाराष्ट्र विणपन विकास व्यवस्थापक विशाल राजेभोसले यांनी केले. ॲग्रोवर्ल्डच्या जळगाव येथील मुख्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते.

शेती व शेतकऱ्यांविषयी खरी आत्मीयता असलेला एकमेव राजा अशी शिवाजी महाराजांची ओळख आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या परवानगी शिवाय त्यांच्या शेतातील भाजीच्या देठालाही हात लाऊ नये, असे महाराजांचे आदेश होते. त्यांच्या आदर्श आणि मार्गदर्शक तत्वावर वैयक्तिक व सामाजिक जीवनात काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री. राजेभोसले व त्यांचे सहकारी दीपक नंदवालकर यांचा ॲग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

सातारा जिल्ह्यातील राजाचे कुर्ले (ता. खटाव) या गावात राजेभोसले यांचे ३५ लोकांचे एकत्रित कुटुंब आहे. तसेच त्यांची २५० एकर शेतजमीन आहे. घरची सधन आर्थिक परिस्थिती असून देखील शेती क्षेत्रात असलेल्या आत्मीयतेमुळे ते या क्षेत्रात आले. त्यांचे शैक्षणिक जीवन देखील कृषी संबंधित आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून त्यांनी Msc Agri केले. त्यावेळी गोल्ड मेडल मिळवत ते संपूर्ण देशात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सुमारे २३ वर्षांपासून विविध कृषी संबधित कंपनीत काम करत असतांना ते आता याच कंपनीत स्थिरावले आहेत.

१४० वर्षाची परंपरा
DCM Shriram ग्रुपची सहकंपनी असलेल्या श्रीराम बायोसिड जेनेटिक्स एका कुटुंबाप्रमाणे कर्मचारी वर्गाची काळजी घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी १४० वर्षांची परंपरा आलेल्या Shriram ग्रुपचे लाला श्रीराम या मूळ संस्थापकांची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. देशाची फाळणी झाली त्यावेळी श्री. लाला यांनी तीन कंपन्या आहे त्या स्थितीत पाकिस्तानमध्ये सोडून तब्बल ३०० कर्मचाऱ्यांना कुटुंबासह सुरक्षितरित्या भारतात आणून तीन महिने त्यांचा संभाळा केला. आणि हीच वागणूक आजही कंपनीत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
GHH 029 या सर्वात जास्त वजनदार कापूस
एकूण १४ हजार कोटींची उलाढाल असलेली ही कंपनी बियाण्यांत ७०० कोटींचा व्यवसाय करते आणि विशेष म्हणजे नफ्याच्या नव्हे तर उलाढालीच्या ३० % खर्च हा फक्त संशोधनावरच खर्च करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच की काय आज राज्यातील कापूस पिकाचा पेरा ३०% कमी झालेला असला तरी त्यांच्या कंपनीच्या विक्रीत ४ पट वाढ झाली आहे. त्यातही त्यांच्या GHH 029 या “सर्वात जास्त वजनदार कापूस” अशी बिरुदावली मिरविणाऱ्या वाणाचा जास्त वाटा आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागात फिरत असताना स्वतःच्या कुटुंबाला फक्त महिन्यातील काही दिवसच वेळ देणे शक्य होते. परंतु, जो वेळ देतो तो पूर्ण कुटुंबाचा असतो, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत. १६०० हून अधिक कृषी संबधित विविध व्यक्तींच्या ते थेट संपर्कात आहे. ॲग्रोवर्ल्डच्या कार्यालयात मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे, ही बाब लक्षात घेऊन जिजाऊंच्या लेकींना कामाच्या ठिकाणी जास्त संधी दिल्याबद्दल त्यांनी ॲग्रोवर्ल्डचे विशेष कौतुक केले. प्रत्येकाने स्वतःमधील स्व शोधावा व त्यापासून प्रेरणा घेऊन आहे ते काम झोकून देऊन केल्यास, यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही, असा प्रोत्साहनपर संदेशही त्यांनी यावेळी दिला.





