प्रतिनिधी/पुणे
या वर्षाच्या मान्सूनने ‘कही ख़ुशी कही गम’ असे वातावरण राज्यात तयार केले आहे. काही ठिकाणी पेरणी संपून पेरणीपश्च्यात मशागतीची कामे सुरु आहेत, तर काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. उत्तर महाराष्ट्र व लगतच्या जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून आकाश निरभ्र झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होत असला तरी राज्यात बुधवार (ता. ७) पासून काही प्रमाणात पावसासाठी पोषक स्थिती तयार होऊन तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका सकाळपासून वाढत आहे. काही भागांत दुपारनंतर काही अंशी ढगाळ वातावरण तयार होत आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहे. राज्यात महाबळेश्वर येथे १७.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तर अकोला येथे ३७.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. दरम्यान राज्यात पुन्हा मान्सून सक्रीय होण्याची चिन्हे असून बुधवार (ता. ७) पासून काही प्रमाणात पावसासाठी पोषक स्थिती तयार होऊन तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
या भागात पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवार (६ जुलै) रोजी चंद्रपूर, गडचिरोली येथे तर बुधवार (७ जुलै) ला नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर. त्याचबरोबर गुरुवार (८ जुलै) रोजीनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या भागात पावसाची शक्यता आहे.
मान्सूनला व्यत्यय ७ जुलै पर्यंत
उत्तर भारतात संपूर्ण मान्सून सक्रिय होण्यासाठी ७ जुलैची वाट पहावी लागणार आहे, कारण बंगालच्या खाडीतून येणारे वारे उत्तर भारतात पोहोचतील व व मान्सून पुन्हा सक्रीय होईल. ११-१२ जुलैला बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होईल व त्यामुळे कमकुवत झालेल्या मान्सूनला बळ येईल. परंतु तोपर्यंत उशीर झालेला असुणार आहे, कारण सामान्यपणे ८ जुलै पर्यंत संपूर्ण देश व्यापणाऱ्या मान्सूनला यासाठी तब्बल १० दिवस जास्त लागतील
Good