प्रतिनिधी/मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसेल, तसंच भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे
सध्या राज्याच्या अनेक भागासह कोकणात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. येत्या पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार असून, विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागतज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.
काय आहे होसाळीकर यांचं ट्विट
विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह येत्या तीन तासात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30-40 किमी इतका राहील. सांगली, पुणे, बीड, सोलापूरमध्ये येत्या तीन तासात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बाहेर पडताना काळजी घ्या, उंच झाडाखाली उभं राहू नका, असं के एस होसाळीकर यांनी म्हटलं आहे.
मान्सून 31 मे ला केरळात दाखल
भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते. मात्र, मान्सूनवर यास चक्रिवादळाचा सकारत्मक परिणाम झाल्यानं यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजपूर्वी म्हणजेच 31 मे रोजी केरळात मान्सून दाखल होईल
महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार?
सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे 31 मे रोजी केरळात मान्सून दाखल होईल. त्याप्रमाणे 9-10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.
यंदाचे पर्जन्यमान कसे असेल?
स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सौजन्य: समाजमाध्यम