मुंबई : सन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत –प्रती थेंब अधीक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.518.05 कोटी निधीच्या कार्यक्रमास सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान…..
प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे या उद्देशाने सन 2015-16 पासून सूक्ष्म सिंचन योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये समाविष्ट केली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेच्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी करताना केंद्र व राज्य हिश्श्याच्या अर्थसहाय्याचे प्रमाण 60:40 करण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये प्रती थेंब अधिक पीक अंतर्गत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना 2015-16 पासून राज्यामध्ये राबविण्यात येत असून राज्यातील सर्व 34 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
केंद्र शासनाने संदर्भाधिन दि. १८ मे २०२० च्या पत्रान्वये केंद्र हिश्श्याचा रु ४०० कोटी इतका कळविलेला आहे. त्याचप्रमाणे राज्य हिश्श्याच्या २६६.६७ कोटी अशा एकूण ६६६.६७ कोटी रकमेचा कार्यक्रम सन २०२०-२१ या वर्षात राबविणे अपेक्षित आहे. तथापि, वित्त विभागाच्या दि.४ मे २०२० च्या शासन निर्णयानुसार योजनेकरिता अर्थसंकल्पीय निधीच्या मंजूर तरतुदीच्या ३३% च्या मर्यादेत रु १९१.३३ कोटी निधीच्या कार्यक्रमास दि.१८ जून २०२० च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
वित्त विभागाने मागील वर्षातील पुनुर्जीवीत निधी व सन २०२०-२१ या वर्षातील पहिल्या हप्त्यात प्राप्त झालेला निधी मिळून मागील १९९.७२ व चालू वर्षाचा ३१८.३३ कोटी अशा ५१८.०५ कोटी निधीच्या कार्यक्रमास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार मान्यता देण्यात आली असून मंजूर कार्यक्रमाच्या निधीचा प्रवर्गनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे. (रक्कम कोटीत)