प्रतिनिधी/जळगांव
मोठ्या जल्लोषात केरळात दाखल झालेला मान्सून एक्स्प्रेस गतीने महाराष्ट्रात दाखल झाला. हवामान खात्यालाही चकवा देत मान्सूनने केरळ ते महराष्ट्र हे ७ दिवसाचे अंतर फक्त २ दिवसात पार केले. परंतु राज्याच्या काही भागात पाऊस स्थिरावला असतांना राज्याच्या इतर भागात मात्र ‘गेला पाऊस कुणीकडे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. खान्देशसह लगतच्या जिल्ह्यांना अजूनही ५ दिवस मान्सूनची प्रतीक्षाच करावी लागेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
यावर्षीच्या मान्सूनच्या वाटचालीची गती पाहता राज्यात १० जून पर्यंत सर्वदूर पाऊस होईल अशी स्थिती होती. पावसाच्या याच गतीने शेतकऱ्यांना धावपळ करत धूळपेरणी करायला भाग पाडले. उत्तर महाराष्ट्र, विदर्भाचा काही सीमावर्ती भाग तसेच मराठवाड्याचा काही उत्तरेकडील भाग येथे अजूनही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. कोकण, मुंबई भागात रेड अलर्ट जाहीर करावा लागत असतांना इतर भागात मात्र शेतकऱ्यांना आकाशाकडे पाहण्याची वेळ आली आहे.
यामुळे पावसासाठी प्रतीक्षा
बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या हवेतील बदलामुळे वाऱ्यांचा प्रवाह बदलला आणि त्यामुळे झा
रखंड आणि बिहारकडे मान्सून सक्रीय झाला आहे. त्याचबरोबर उत्तर – मध्य महाराष्ट्र व इतर लगतच्या भागात मान्सून कमी सक्रीय होण्याचे अजून एक कारण म्हणजे पश्चिमी वारे ज्या जोराने आले होते त्यांचा जोरही आता कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा कमजोर पडल्याने हवे त्या प्रमाणात बाष्प ओढले जात नाही. त्यामुळे या भागात पुढच्या चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. पण अजूनही जोरदार पावसासाठी प्रतीक्षा करावी लागेल, असे पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी अॅग्रोवर्ल्डशी बोलतांना सांगितले
मान्सून उद्या दिल्लीत
राज्यात जरी पाऊस सर्वदूर होत नसला तरी ज्या वेगाने राज्यात मान्सून दाखल झाला त्याच गतीने तो उत्तरेकडे सरकला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या ( १५ मे ) मान्सून राजधानी दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मान्सूनने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, प. बंगालसह बिहारमध्ये जोरदार हजेरी लावली आहे.
शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करू नये
उत्तर महाराष्ट्रात काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्याच पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी सुरु केली आहे. तर काही ठिकाणी धूळपेरणी केली जात आहे सध्याच्या परिस्थितीत धूळ पेरणी करणे शेतकऱ्यांसाठी धोक्याचे आहे. एखाद्या वेळी दुबार पेरणीचे संकट देखील ओढवू शकते. त्यामुळे ज्या ठिकाणी अजून मान्सून पोहचला नाही, त्या भागातील शेतकऱ्यांनी धूळपेरणी करू नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.