३१ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीसाठी अंदाज.
यावर्षी लांबलेल्या परतीच्या मान्सूनमुळे रब्बीच्या पेरण्या बऱ्याच दिवस लांबल्या होत्या. काही ठिकाणी आता पेरणी व इतर पेरणी पाश्च्यात मशागतीची कामे सुरु असून हवामान खात्याने ३१ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात गारपीटीची शक्यता वर्तविल्याने या भगातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
राज्यात या आठवड्यात पावसाची शक्यता असून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काही ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविल्याने शेतकऱ्यांना पुन्हा अस्मानी संकटांचा सामना करावा लागू शकतो. चार दिवसापासून राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान १० अंशाच्या खाली गेले आहे. सर्वात कमी तापमान चंद्रपूर येथे ५.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
पावसाचे कारण
बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहे तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी दिशा बदलली आहे. उत्तरेकडील कोरडी हवा आणि पूर्वेकडील बाष्पयुक्त वारे यांच्या मध्य भारतातील संगमामुळे राज्यातील मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील. पुणे वेधशाळेच्या मते ३१ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात विजेच्या कडकडाट व मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे.
स्कायमेट या हवामान वर्तविणाऱ्या संस्थेच्या अंदाजानुसार राज्यात नागपूर, अकोला, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, हिंगोली यासह उत्तर महाराष्ट्रातील जळगांव, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.
.
काय काळजी घ्यावी
- जनावरांचा चारा भिजणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी ठेवावा
- खरीपाचा तयार शेतमाल शेतातून घरी आणून ठेवावा
- जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी आणि शेतमाल व जनावरे यांची विजापासून खालीलप्रमाणे काळजी घ्यावी
- विजा दहा ते पंधरा किलोमीटर दूर चमकत असल्या तरी क्षणात तेवढा प्रवास करून विजा आपल्यापर्यंत पोहचू शकतात, त्यामुळे काळे ढग दाटून आले, की विजांचा कडकडाट दिसण्याची किंवा गडगडाट ऐकू येण्याची वाट न पाहता ताबडतोब सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
- गारपीट, अवकाळी पावसात विजा चमकत असताना तातडीने सुरक्षित जागेत आसरा घेऊन प्रत्येक शेतकरी आपले प्राण वाचवू शकतो.
- झाडांना बांधून ठेवलेली किंवा उघड्यावर फिरत असलेली जनावरे, तसेच धातूच्या पत्र्यांचा गोठ्यासाठी वापर यामुळे मोठ्या संख्येने जनावरे दगावतात.
- विजा चमकत असताना, शेतातील कामे त्वरित थांबवावीत.
- वाहत्या पाण्यात किंवा ओल्या भिंतीजवळ थांबू नये.
- मोकळ्या मैदानावर अथवा उंच टेकडीवर फेरफटका मारण्याचा मोह टाळावा.
- विजा चमकताना दिसू लागताच पक्क्या, कोरड्या, बंदिस्त अशा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
- पाऊस नसला तरी विजांचा लखलखाट दिसला किंवा ढगांचा गडगडाट ऐकू आला तरी सर्व कामे थांबवून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
- उंच किंवा बुटक्या अशा कुठल्याही झाडाखाली विजा चमकत असताना किंवा पावसात आसरा घेऊ नये.
- झाडाला मोकळ्यावर जनावरे बांधून ठेवू नयेत किंवा जनावरांना भिजत उघड्यावर सोडू नये.
- जनावरांचे गोठे, घरांचे छप्पर धातूच्या पत्र्याचे असल्यास तातडीने धातूचे पत्रे काढून त्याऐवजी एसबेस्टोसचे किंवा प्लॅस्टिकचे पत्रे बसवावेत.
- स्वतःचे पशुधन व कुटुंब सुरक्षित करावे.
- शक्य असल्यास द्राक्ष, फळबागांमध्ये वेली चढविण्यासाठीचे मंडप उभारण्यासाठी धातूच्या खांबांऐवजी बांबू किंवा प्लॅस्टिकच्या मजबूत पाइपचे खांब वापरावेत, तसेच मंडपात धातूच्या तारा, जाळ्या वापरण्याऐवजी नायलॉनच्या दोऱ्या व नायलॉनच्या जाळ्यांचा वापर करावा.
- शेतातील आसऱ्याच्या ठिकाणापासून धातूचे तुकडे, धातूचे पाइप, धातूच्या सळ्या, धातूची अवजारे दूर ठेवावीत. अनावश्यक धातूच्या वस्तूंचा साठा टाळावा.
- ट्रॅक्टर, चारचाकी व दुचाकी वाहने यांचे वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी पार्किंगचे शेड एसबेसस्टोसचे किंवा प्लॅस्टिकचे पत्र्याचे असावे.
- विजेचे मीटर, पंप व तो चालू-बंद करण्याचे बटन आदी पावसाच्या पाण्याने भिजणार नाही याची काळजी घ्यावी. ओल्या हाताने ते बंद किंवा सुरू करताना अनेक अपघात होतात यासाठी स्वयंचलित टायमर असलेले पंप किंवा रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या बटनांचा उपयोग ते बंद-चालू करण्यासाठी करता येऊ शकतो.
- सुरक्षिततेसाठी लायटनिंग अरेस्टर अथवा कंडक्टर, योग्य उंच ठिकाणी बसवून वाड्या, पाड्या तसेच गावातल्या वस्तीच्या ठिकाणची हानी टाळता येईल. त्या बाबत आग्रहासाठीचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे करता येऊ शकतो. गाव-वर्गणीतून देखील असे उपक्रम शेतकरी राबवू शकतात.