मुंबई : राज्यात गेल्या 2-3 दिवसात पावसाचा जोर ओसरला असला तरी काही जिल्ह्यांमध्ये पावसाने माजलेला हाहाकार कायम आहे. त्यामुळे वर्धा, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी 20 जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे राज्यातील पावसाचा मुक्काम आणखी चार दिवस लांबण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (आयएमडी) येत्या चार दिवसांमध्ये विदर्भ आणि कोकणात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यातही येत्या पाच दिवसात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यभरात आतापर्यंत सरासरीहून 47 टक्के अतिरिक्त पाऊस नोंदवला गेला आहे. आतापर्यंत मराठवाड्यात सर्वाधिक, नांदेडमध्ये 152 टक्के जास्त पाऊस पडला आहे. मात्र तरीही विभागात एकूण पाऊस सरासरीच्या 82 टक्के आहे. सांगली जिल्ह्यात पावसाची 31 टक्के तूट आहे. विदर्भातही विदर्भात एकूण पाऊस सरासरीच्या 57 टक्के पाऊस नोंद झाला आहे.
पीएम किसान योजना : फक्त सहा हजार रुपयेच नाही, तर आणखीही दोन महत्त्वाचे फायदे! काय ते जाणून घ्या…
विदर्भ, कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने कोकण व विदर्भात पुढचे तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आहे. राज्यातील उर्वरित भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे. विदर्भात 22 जुलैपर्यंत पाऊस कायम राहील. काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. इतरत्र पावसाचा जोर कमी असला तरी संततधा राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर ओसरला असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अकोला, अमरावतीला आज ऑरेंज ॲलर्ट
विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. अकोला आणि अमरावतीला आज, 19 जुलै रोजी ऑरेंज ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, वाशिममध्ये बुधवारपर्यंत यलो ॲलर्ट आहे. वर्ध्यात फक्त आजच्या दिवसासाठी ऑरेंज ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस थांबेल, असा हवामान खात्याच्या अंदाज आहे.
मान्सूनचा पाऊस हळूहळू उत्तरेकडे सरकू लागलाय
मध्य भारतावर असलेला कमी दाबाचा पट्ट्याचा प्रभाव कमी होत असल्यामुळे राज्यातील पाऊस कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला होता. सौराष्ट्र व कच्छच्या प्रदेशात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा ओमानकडे सरकत असून, त्यामुळे अरबी समुद्रावरून आर्द्रता खेचली जाईल, तसेच बंगालच्या उपसागरावरून राज्यात येणारी आर्द्रताही कमी होणार असल्याचे अनुमान होते. चक्रीवादळाची दिशा बदलल्याने, कोकण वगळता राज्यात पाऊस थांबण्याची शक्यता होती. मात्र, आता सौराष्ट्र-कच्छ किनार्याजवळील ईशान्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र हे सरकून उत्तर अरबी समुद्राच्या मध्यभागी बनले आहे. त्यामुळे मान्सूनचे कुंड किंचित उत्तरेकडे सरकत आहे. मात्र, मान्सूनचा हा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकण्याचा वेग मंदावलेला आहे. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांतील पाऊस अजूनही कायम असून पुढील तीन दिवस केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. कमी होत आहे. येत्या तीन-चार दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र सामान्य स्थितीत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरावरील ओडिशा किनारपट्टीवरील कमी दाबाचे क्षेत्र स्थिर असले तरी त्याला अरबी समुद्रातून ओढून घेणारा पट्टा वर सरकला आहे. त्यामुळे कोकण व पूर्व विदर्भात सर्वदूर पाऊस राहील; पण त्याची तीव्रता कमी होत जाईल.
अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी
भारतातील जवळपास प्रत्येक राज्यात मान्सून पोहोचला आहे. अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, अनेक ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. आता आयएमडीने उत्तर-पश्चिम भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 20 जुलैपासून दिल्लीसह पूर्वोत्तर राज्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे. पुढील तीन दिवसांत, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही ठिकाणी गडगडाटासह हलका आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आहे. पश्चिम राजस्थानमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर पूर्व राजस्थानमध्ये हलका आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्येही मान्सूनचा पाऊस बरसेल. याशिवाय, महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेशातील काही जिल्ह्यांना पुढील 3 ते 4 दिवसांसाठी ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात आता पाऊस नकोसा झालाय!
राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून सतत बरसत असलेल्या पावसाला आता सर्वसामान्यांसह शेतकरीही कंटाळले आहेत. महाराष्ट्राला आता पाऊस नकोसा झालाय, अशी स्थिती आहे. सततच्या अतिरिक्त पावसामुळे पिकेही पिवळी पडू लागली आहेत. किमान काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यास शेतीच्या मशागतीची थांबलेली कामे करता येतील, खरीपाच्या उर्वरित पेरण्या पूर्ण करता येतील. शेतांमध्ये जागोजागी पाणी तुंबल्याने अनेक ठिकाणी कामे रखडली आहेत.
Comments 3