पुणे : पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने राज्यांनी एनपीके आणि द्रवरुप युरियाचा वापर वाढवून डीएपी खतांवरील अवलंबन कमी करावे, अशी सुचना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केली आहे.

उन्हाळी पीक लागवडीत वाढ
2021 -22 च्या उन्हाळी हंगामासाठी कृषीसंबंधी राष्ट्रीय परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना मंत्री तोमर यांनी ही सूचना केली. मंत्री श्री. तोमर यांनी सांगितले, राज्यांनी त्यांना लागणाऱ्या खतांच्या आवश्यकतेबाबत पूर्वनियोजन करण्यासाठी आणि केंद्र सरकारला खतांचा अंदाज येण्यासाठी केंद्राला अगोदर कळवावे. त्यामुळे खत विभागाला वेळेवर पुरेसा खत साठा देता येईल असे सांगून श्री. तोमर म्हणाले, की उन्हाळी पिके केवळ अतिरिक्त उत्पन्न देत नाहीत, तर शेतकऱ्यांसाठी रब्बी आणि खरीप हंगामादरम्यान रोजगाराच्या संधीही निर्माण करुन उत्पादनही वाढवतात. कडधान्ये, भरड धान्ये, पोषक तृणधान्ये आणि तेलबिया यांसारख्या उन्हाळी पिकांच्य लागवडीसाठी सरकारने विविध कार्यक्रमांमद्वारे नवीन उपक्रम हाती घेतले आहेत.
उन्हाळी हंगामादरम्यान निम्याहून अधिक लागवड क्षेत्र कडधान्ये, तेलबिया आणि पौष्टिक तृणधान्याखाली असले तरी सिंचनाच्या स्रोतांच्या मदतीने उन्हाळी हंगामात भात, भाजीपाला लावतात. भातासह उन्हाळी पिकांच्या लागवडीखाली क्षेत्र 2017-18 मधील 29.71 लाख हेक्टरवरुन 2.7 पटीने वाढून 2020-21 मध्ये 80.46 लाख हेक्टर झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी सहकार्य
मागील पीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा आणि मुल्यांकन करणे आणि राज्य सरकारशी सल्लामसलत करुन उन्हाळी हंगामासाठी पीकनिहाय लक्ष्य निश्चित करणे हा या परिषदेचा उद्देश होता.
पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण साम्रगीचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब सुलभ करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही मंत्री श्री. तोमर यांनी दिले.










