ताशी ७ ते ८ किलोमीटर वेगाने ओमानकडे मार्गक्रमण; नवीन वादळांपूर्वी शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून घ्यावीत.
अरबी समुद्रात निर्माण झालेले महावादळ १२० किमी वेगाने गुजरातकडे जात आहे. हवामान खात्यानुसार, १९६५ नंतर प्रथमच १० दिवसांच्या कालावधीत अरबी समुद्रात दोन चक्रीवादळ निर्माण झाले आहे. याआधी क्यार वादळ आले होते. महावादळ बुधवार, गुरुवारी पोरबंदर ते दीव दरम्यानच्या समुद्र किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. परंतु त्याची तीव्रता कमी होणार असून ते वादळ विरत आहे.
‘अरबी समुद्रात तयार झालेले ‘महा’ वादळ विरत असून, त्याची तीव्रता कमी होत आहे,त्यामुळे गुजरात व उत्तर महाराष्ट्रातील संभाव्य अतिवृष्टीचा धोका टळणार आहे,’ असा अंदाज हवामानाचे अभ्यासक प्रा. बी. एन. शिंदे यांनी वर्तविला आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात आणखी एक नवे वादळ निर्माण होत असून, त्याचा धोका काही प्रमाणात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना आहे.
‘क्यार’ वादळानंतर पाच सहा दिवसांपूर्वी लक्षद्वीपजवळ तयार झालेले ‘महा’ वादळ राज्याच्या काही भागात पाऊस देत क्षीण होत गेले आहे. ते आता ताशी ७ ते ८ किलोमीटर वेगाने ओमानकडे सरकत आहे. त्यामुळे पाऊस कमी होत गेला. गुजरात आणि महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा धोका आता टळण्याची शक्यता आहे. त्यानंतर एकाएकी वाढलेल्या उन्हामुळे स्थानिक बाष्पीभवनातून तुरळक ठिकाणी दुपारनंतर पाऊस होत आहे. ‘महा’ वादळ पूर्णपणे विरल्यावर तोही कमी होईल.
मात्र, बंगालच्या उपसागरात अंदमानजवळ ‘महा’पेक्षा मोठे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. ते आठवड्यात भारताकडे येण्याची शक्यता आहे. त्याने महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जोदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रावरील सर्व बाष्प तिकडे खेचले जाणार आहे. त्यामुळे काही दिवस पाऊस थांबेल शिवाय कडक उन पडेल. सकाळी थंडी, धुके व दुपारी कडक उन असा अनुभव येण्याची शक्यता आहे. मागील १५ दिवसापासून अतिवृष्टीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना या वादळांमुळे अजून नुकसान होण्याची भीती होती. परंतु या दोन वादळांमध्ये असलेला खंड पाहता या काळात शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून घ्यावीत. शेतांची दुरूस्ती, मळणी, काढणी वगैरे कामे उरकता येतील, इतपत उघडीप मिळण्याची शक्यता आहे. ती उरकून घेऊन पुन्हा एकदा वादळी पावसाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना सज्ज व्हावे लागेल.