जेव्हा असेल चांगला भाव, तेव्हाच विक्रीला बाहेर काढा माल; कोंब नाही, काजळी नाही, गॅस उत्सर्जनाचा दुर्गंधीयुक्त वास नाही, वजनात घट नाही अन् दर्जा, चवही राहणार कायम!
सरकारचे बदलते धोरण आणि चांगले उत्पादन करूनही मालाला योग्य भाव मिळत नसल्याने हैराण झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता साठवणुकीत कांदा खराब होण्याची कटकटच मिटली आहे. भाभा अणू संशोधन केंद्र BARC आणि ‘इन्फ्राकूल’ कंपनीचे हे नवीन तंत्रज्ञान काय आहे ते आपण जाणून घेऊया. प्रत्यक्ष संबंधित तज्ञांना भेटून त्यांच्याकडून या नव्या तंत्राची माहिती मिळवायची असेल तर आपण प्रमिला लॉन्स, पिंपळगाव बसवंत येथे 12 ते 15 जानेवारी दरम्यान आयोजित होत असलेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला जरूर भेट द्या.
‘इन्फ्राकूल’ कंपनीच्या या नवीन तंत्रज्ञानामुळे जेव्हा बाजारात कांद्याला चांगला भाव असेल तेव्हाच तो विक्रीला बाहेर काढता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे व्यापारी, कमिशन एजंट, आडते-दलालांचा नव्हे तर थेट शेतकऱ्यांचाच मोठा फायदा होणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणार आहे. भाभा संशोधन केंद्र म्हणजेच ‘बीएआरसी’ने विकसित केलेल्या या नव्या तंत्रज्ञानासाठी पायाभूत नियंत्रित उभारणी करून ‘इन्फ्राकूल’ कंपनीने यशस्वी चाचणी पार पाडली.
आठ महिने साठवणूक चाचणी ठरली यशस्वी
नव्या तंत्रज्ञानामुळे 8 महिन्यांच्या साठवणुकीत कांद्याला कोंब, काजळी आली नाही, 2500 क्विंटल साठवलेल्या कांद्याच्या वजनात एका ग्रॅमचीही घट आली नाही. याशिवाय कांदा चाळीतील साठवणुकीत येणारा गॅस उत्सर्जनाचा दुर्गंधीयुक्त वास आला नाही. नव्या तंत्रज्ञानात आठ महिन्यानंतरही कांद्याची दर्जा व चवही कायम राहिली. 2500 क्विंटल कांदा 8 महिने जसाच्या तसा स्टोअर राहिला, त्यातील एकही कांदा खराब झाला नाही. असा हा कांदा साठवणुकीचा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे.
![](https://eagroworld.in/wp-content/uploads/2023/12/1.-Panchaganga-Seeds.jpg)
गावोगावी, खेडोपाडी प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत फायदा व्हावा
चांगले उत्पादन करूनही साठवणुकीतच शेतकऱ्यांच्या कांद्याचे 40 ते 65% नुकसान होते. कांदा चाळ साठवणुकीतसुद्धा 30 ते 40 टक्के नुकसान होतेच. गॅस उत्सर्जनामुळे दुर्गंधीयुक्त वास येत राहतो. त्यामुळे चाचणी स्तरावर यशस्वी झालेले हे तंत्र आता गावोगावी, खेडोपाडी प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे ‘इन्फ्राकूल’ कंपनीचे प्रयत्न आहेत. बचत गट, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) किंवा ग्रामपंचायत, विकास सोसायटीमार्फत अथवा गावातील शेतकरी एकत्र येऊन ते सहज शक्य होणार आहे. हे कसे करता येईल, याचे मार्गदर्शन कंपनीमार्फत पिंपळगाव बसवंत येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात केले जाणार आहे. हे प्रदर्शन मुंबई-आग्रा हायवेलगतच, पिंपळगाव कॉलेजशेजारील प्रमिला लॉन्स ग्राऊंड येथे 12 ते 15 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे.