मुंबई – कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची पहिली यादी बुधवारी, 22 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच, या योजनेअंतर्गत मिळणारी कर्जमाफीची रक्कम कोणत्याही परिस्थितीत येत्या 30 जुलैपूर्वी थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी महत्त्वाची बातमी आहे.
राज्य शासनाने यापूर्वी ही कर्जमाफी 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर केले होते. मात्र, कर्जमाफी योजनेच्या निकषांमध्ये करण्यात आलेल्या काही महत्त्वपूर्ण बदलांमुळे या प्रक्रियेला विलंब झाला. या विलंबाबाबत स्पष्टीकरण देताना कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले की, झालेला विलंब हा शेतकऱ्यांच्या हितासाठीच असून ही कर्जमाफी केवळ आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या आणि गरजू गरीब शेतकऱ्यांसाठीच लागू करण्यात आली आहे. निकषांमधील या सुस्पष्टतेमुळे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंतच शासनाची मदत पोहोचणार आहे.
इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी वगळले
या योजनेचा लाभ देताना एक प्रमुख निकष निश्चित करण्यात आला असून, प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) भरणारे मोठे शेतकरी या कर्जमाफी योजनेतून वगळण्यात आले आहेत. या प्राप्तिकराच्या निकषाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून, त्याला केंद्राकडून आवश्यक ती परवानगीही मिळाली आहे. या सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यामुळे आता लाभार्थ्यांची यादी अंतिम झाली असून, 30 जुलैपूर्वी प्रत्यक्ष कर्जमुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल













