मुंबई – वायव्य बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या उत्तर ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर असलेले कमी दाबाचे क्षेत्र, आज, 4 जुलै, सकाळी 5.30 वाजता त्याच प्रदेशात तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात कायम आहे. त्यामुळे, मुंबई-ठाणे, कोकण आणि दक्षिण-पश्चिम व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तसेच उत्तर महाराष्ट्रात 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभाग (आयएमडी)ने वर्तवला आहे.
मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, गुजरात लगतचा उत्तर महाराष्ट्राचा भाग आणि खान्देशलगतच्या विदर्भातील जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.
आजचा दिवस सर्वात जास्त काळजी घेण्याचा
सध्याच्या सक्रिय मान्सूनच्या दिवसांमधील आजचा दिवस सर्वात जास्त काळजी घेण्याचा आहे. रायगड, मुंबई, आणि नाशिक, पुणे व साताऱ्याच्या घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडेल. घाट परिसरातील ट्रेकिंग आणि धबधब्यांना भेट देणे टाळा.
सोमवारपर्यंत तीन दिवसांच्या कालावधीत, स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळविले आहे.


मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
नागरिकांनी या काळात सतर्क राहावे. विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागरिकांना काळजी घेण्याचे व कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
राज्यभरात पावसाचे धुमशान
दरम्यान, कालचा रेड अलर्टचा इशारा खरा ठरला, मध्यरात्रीपासूनच मुंबई-ठाणे- नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू असून राज्यात दाणादाण उडाली आहे. कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसराला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. वसई-विरार शहरातही काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सह्याद्री परिसर आणि कोयना पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस होत आहे.
View this post on Instagram
तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल
















