मुंबई: भारतीय हवामान विभाग (आयएमडी)च्या २० जून रोजी सकाळच्या उपग्रह निरीक्षणांनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर मान्सूनची स्थिती सुधारत असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. हवामान मॉडेलनुसार, पुढील २-३ दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.


हळूहळू विषुववृत्तीय वाऱ्यांचा प्रवाह वाढत आहे आणि येत्या काही दिवसांत पश्चिमी वारे अधिक तीव्र होतील. २२ तारखेपासून कोकण आणि अंतर्गत भागात पावसाची दाट शक्यता आहे. पुढील २-३ दिवसांत काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

देशातील २० ते २५ जून दरम्यानच्या पावसासाठी ईसीएमडब्ल्यूएफ मॉडेलचा अंदाज दिलासादायक आहे. त्यानुसार, या सोमवारपासून मुंबई-पुणे दरम्यान पावसाला जोर येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात विशेषतः महाराष्ट्रासह मध्य भारताच्या काही भागांमध्ये पावसाचे वितरण वाढण्याची शक्यता आहे.


देशातील तापमानात हळूहळू घट
उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ या भागांतील काही ठिकाणी; तेलंगणा, बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, पश्चिम मध्य प्रदेश या भागांतील तुरळक ठिकाणी कमाल तापमान ४०-४२°अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे आणि देशाच्या उर्वरित भागांमध्ये ते ४०°पेक्षा कमी आहे. मध्य प्रदेशला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये, उत्तर अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा, गोवा, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारला लागून असलेल्या भागांमध्ये कमाल तापमानातील तफावत ३-६°च्या दरम्यान होती; वायव्य भारत आणि गंगा खोऱ्यातील पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये तापमान सामान्य/सामान्यपेक्षा कमी होत आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल
















