पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न केले. मात्र, पैशांशिवाय नोकरी मिळत नसल्याचा वाईट अनुभव आला. त्यामुळे नोकरीचा नाद सोडला. शेळीपालनाची लहानपणापासून माहिती असल्यामुळे शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वडीलोपार्जीत 3 एकर शेतीतच चारा व्यवस्थापनासह पुरक उदयोग करण्याचा दृढनिश्चय केला आणि…
त्यानुसार 2005 मध्ये 19 शेळया विकत घेवून शेळीपालनास सुरुवात केली. आज सुमारे 150 लहान-मोठ़या देशी-विदेशी शेळया असून या व्यवसायातून वर्षाकाठी 10 ते 12 लाखांची उलाढाल होत आहे. त्यातून खर्च वजा जाता 4 लाखांचा निव्वळ नफा मिळत असून, चार जणांना रोजगारही मिळाला आहे.
दलवाडे ता. शिंदखेडा, जि. धुळे येथील प्रगतीशील शेतकरी भाऊसाहेब देसले यांची ही यशोगाथा… प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब पंढरीनाथ देसले (वय 57) यांची वडिलोपार्जीत तीन एकर बागायती शेती आहे. वडीलांसोबत काम करतांना लहानपणापासूनच शेतीकामाची आवड निर्माण झाली. शिवाय वडीलांनी सुरुवातीला दोन-चार जनावरे पाळली होती. त्यामुळे पशुपालनाचाही अनुभव होता. मात्र, बी.कॉमचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर नोकरी मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगून भाऊसाहेब देसले हे नाशिकला गेले. तेथे दोन वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी केली. चांगला अभ्यास करुन त्यांनी एमपीएससीच्या मुलाखतीपर्यंत मजल मारली. मात्र, पैशांची देवाण-घेवाण झाल्याशिवाय नोकरी मिळत नसल्याचा वाईट अनुभव त्यांना आला. नंतरच्या काळात एमपीएससीचा घोटाळाही उघडकीस आला. त्यामुळे त्यांनी नोकरीचा नाद सोडत आपल्या आवडीच्या क्षेत्रात म्हणजेच शेतीपुरक व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
कोंबडी पालनापासून केली सुरुवात!
भाऊसाहेब देसले यांनी शेतीपुरक उदयोगाची सुरुवात सन 1996-97 मध्ये शेतीबरोबर बॉयलर कोंबडी पालनापासून केली. कोणत्याही कंपनीशी करार न करता खाजगी पध्दतीने त्यांनी कोंबडीपालन करण्यास प्राधान्य दिले. त्यासाठी 500 युनिटचे शेड उभारले. मात्र, मार्केटींग करण्यात कमी पडत असल्यामुळे तसेच श्रमाच्या तुलनेत फारसा मोबदला मिळत नसल्यामुळे त्यांनी एक-दोन वर्षातच कोंबडीपालन बंद केले. त्यानंतर कृषी विभागाकडून मशरुम उत्पादनाची माहीती मिळाली. धिंगरी मशरुम उत्पदनास सुरुवात केली. उत्पादनही चांगले झाले. मात्र, स्थानिक भागात मार्केट नसल्यामुळे विक्रीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे मशरुम उत्पादनही बंद केले. दरम्यान, त्यावेळी सन 2002-03 मध्ये शिंदखेडा तालुक्यात सेंद्रीय शेतीचा चांगला जोर होता. अधिकाधिक शेतकरी सेंद्रीय शेती करत होते. शासनही सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवित होते. त्यानिमित्ताने तालुका कृषी अधिकारी श्री.शहा हे दलवाडे गावात आले होते. त्यांनी निंबोळी पावडरबाबत माहीती दिली तसेच शेतकर्यांचा मोठा गट तयार केला. त्यात भाऊसाहेब देसले यांच्यासह पढावद येथील प्रगतशील शेतकरी डॉ. प्रकाश पाटील, दलवाडे येथील श्रीराम बापू यांचाही समावेश होता. त्यानंतर निंबोळी पावडर निर्मितीसाठी शासनाकडून 30 हजार अनुदान मिळाले. त्यानुसार निंबोळी पावडर निर्मितीस सुरुवात केली. मात्र, नंतरच्या काळात मागणी घटत गेली. त्यामुळे ते काम देखील भाऊसाहेब यांना बंद करावे लागले.
. आणि मग शेळीपालनाकडे वळाले..
भाऊसाहेब हे पदवीचे शिक्षण घेत असतानांच शेळीपालन करावे, असा विचार त्यांच्या मनात सारखा येत होता. त्यानुसार 1997 पासून त्यांनी शेळीपालनास सुरुवातही केली होती. परंतु, आर्थिक अडचणीमुळे दोन वर्षात शेळीपालन बंद करावे लागले होते. पण मनातील जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी पुन्हा नव्या उमेदीने सन 2005 मध्ये शेळीपालनास सुरवात केली. त्यासाठी त्यांनी स्थानिक बाजारातून अगोदर 2-3 शेळया, नंतर 3-4 शेळया असे करत-करत 19 शेळ्या विकत घेतल्या. त्यानंतर आजपर्यंत त्यांनी कधी मागे फिरुन पाहिलेच नाही. आज याच शेळयांपासून उत्पत्ती वाढत जावून त्यांच्याकडे दीडशेहुन अधिक देशी व विदेशी शेळया, बोकड झाले आहेत. शिवाय आता त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने आपला व्यवसाय अधिकाधिक वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. विशेष म्हणजे आता उत्पादनाच्या तुलनेत मागणी मोठ़या प्रमाणात असल्याचे देसले आवर्जून सांगतात.
विदेशी शेळयांची खरेदी..
अशाप्रकारे देसले यांच्याकडे 6 ते 7 पिढयांमध्ये स्थानिक 95 ते 100 टक्के उस्मानाबादी जातीचे बोकड तयार झाले. यानंतर त्यांनी विदेशी जातीचे वाढणारे महत्व लक्षात घेता शेळीमधील बोअर जातीकडे लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीकोनातून फलटण येथील नारी संस्थेला भेट दिली. त्यासोबतच कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून बोअर बोकड व शेळी खरेदी केले. अधिक मांस देणारी प्रजात म्हणून बोअर जातीकडे पाहिले जाते.
कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन..
भाउसाहेब देसले हे शेळीपालन करत असतांना धुळयातील कृषी विज्ञान केंद्राची स्थानिक नस्ल सुधार योजनेची माहिती त्यांच्या वाचनात आली. त्यानंतर त्यांनी कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. या भेटीत त्यावेळचे पशु शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच या योजनेतून कृषी विज्ञान केंद्र यांच्या मार्फत महत्मा फुले कृषी विद्यापीठ शिफारसीत नस्ल सुधारणा पैदास करण्यासाठी उस्मानाबादी बोकड देण्यात आले. यानंतरही त्यांना कृषी विज्ञान केंद्राचे माजी पशुशास्त्रज्ञ डॉ. तानाजी वालकुंडे व श्री. विपुल वसावे यांचे ही वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. यामध्ये प्रामुख्याने नस्ल सुधार कार्यक्रम, जनावरांची निगा, लसीकरण, रोग व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन, गोठा व्यवस्थापन याची इत्यंभूत माहीती कृषी विज्ञान केंद्राकडून वेळोवेळी मिळते.
असे केले चारा व्यवस्थापन..
शेळ्यांना लागणारा विविध प्रकारचा चाराही आवश्यक होता. या चार्याचे महत्व लक्षात घेता देसले यांनी आपल्या शेतीत हायब्रिड नेपियर गवत यामध्ये महत्मा फुले कृषी विद्यापीठ संशोधित फुले जयवंत, गुणवंत तसेच सुपर नेपियर, डी.एच.एन.6, मारवेल, दशरथ गवत, मेथी घास, चारा ज्वारी यामध्ये दादर व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संशोधित फुले गोधन वाणाची लागवड केली. त्यासोबतच भुईमुग पाला, हरभरा काड, स्वतः तयार केलेले मुरघास यांचाही चार्यामध्ये समावेश असतो. यासाठी त्यांना कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. धनराज चौधरी यांचे वेळोवेळी महत्वपूर्ण मार्दर्शन मिळत असते. स्वतः चारा उत्पादन करत असल्याने शेळीपालनातील खर्च कमी करता आला व उत्पादन वाढविण्यासाठी मदत झाली. समतोल आहाराच्या दृष्टीने खुराकच्या नियोजनामध्ये ज्वारी, बाजरी, मका भरडा, खनिज मिश्रण योग्य प्रमाणात दिले जात असल्याचे देसले सांगतात.
वर्षाला 8 ते 10 लाखांची उलाढाल..
शेळ्यांपासून मुख्य उत्पादन करडू असतात. फार्मवरील करडांच्या निरीक्षणावरून फर्मची उत्पादन क्षमता लक्षात येते. सदयस्थितीत देसले यांच्याकडे जवळपास 60 शेळ्या उत्पादनक्षम आहेत व लहान करडू 90 असून विक्री नेहमी सुरु असते. एका वेतामध्ये सरासरी 100 ते 110 करडे मिळतात. यामध्ये सर्वसाधारण 50 टक्के नर व 50 टक्के मादी मिळते. बोअर जातीचे करडू बोकड साधारपणे तीन ते चार महिन्यात 20 किलोपर्यंत तयार होते. त्याचा सरासरी दर भाव 400 ते 500 रुपये प्रती किलो पर्यंत मिळतो. या प्रमाणे एका बोकडपासून 8 ते 10 हजार रुपये मिळतात. वार्षिक उलाढालीचा विचार करता आठ ते दहा लाख रुपये मिळतात. यामधून सर्व प्रकारचा खर्च वजा जाता सरासरी तीन लाख रुपये निव्वळ नफा एका विताला मिळतो. त्या सोबतच अतिरिक्त लेंडी खतामधून एक लाखापर्यंत उत्पादन मिळत आहे. शिवाय आता गांडूळ खत निर्मिती प्रकल्पही सुरु केला आहे. सहा रुपये प्रतिकिलो दराने त्याची विक्री होत असल्याचे देसले सांगतात.
मार्केटींगसाठी मुलाची होते मदत..
यापुर्वीचे शेतीपुरक उदयोग मार्केटींग अभावी वाढू शकले नाहीत. त्यातून धडा घेत भाऊसाहेब यांनी यावेळी मार्केटींगवर चांगलाच भर दिला आहे. त्यासाठी त्यांना मुलगा सौरभ याची खूप मदत होत आहे. तो उच्च शिक्षण (एम.टेक) घेत आहे. त्याने आपल्या कौशल्याचा वापर करून युटयुब चॅनल, व्हॉटसपच्या माध्यमातून समृद्धी गोट फार्म या नावाने मार्केटींग सुरु केले आहे. या माध्यमाच्या वापरामुळे कोविड-19 च्या परिस्थितीमध्ये शेळ्यांची विक्री फार्म वरूनच होत आहे. तसेच सोशल मीडीयामुळे महिन्याला किमान 10-15 लोक विविध भागामधून फार्मला भेटी देत आहेत.
मजुरांना मिळाला रोजगार..
देसले यांच्या शेळीपालन उदयोगामुळे 4 जणांना शाश्वत रोजगार मिळाला आहे. यात दोन मजुरांवर जनावरांच्या देखभालीची तर दोन मजुरांवर चारा पिके घेण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे त्यांचे दैनंदिन काम ते चोखपणे पार पाडतात. देसले यांचा दिवस सकाळी 6 वाजेपासून सुरु होतो. यात फार्मची साफसफाई, पशुंचे निरीक्षण, करडूंना दुध पाजणे, गरज भासल्यास औषध उपचार करणे, जनावराच्या आवश्यकतेनुसार चारा देणे, पाणी पाजणे, असा दैनंदिन क्रम असतो. विशेष म्हणजे आजारी जनावरांना इंजेक्शन व औषधी देण्याचे काम स्व:ताच करतात. इतर ऋतूपेक्षा पावसाळयात जनावरांची जास्त काळजी घ्यावी लागते.
अशी केली शेडची उभारणी..
शेळीपालनासाठी आपल्या तीन एकर शेतीचे उत्तम नियोजन केले आहे. आपल्या शेतातच त्यांनी 40 बाय 100 फुटाचे पत्राचे ए आकाराचे शेड उभारले आहे. शेड उभारणीसाठी देसले यांना देशबंधू मंजूगुप्ता फौंडेशनकडून 30 हजार रुपयांचे अनुदान मिळाले. त्यात 10 हजार टाकून हे शेड उभारले. या शेडमध्ये त्यांनी 12 बाय 7 फुटाचे असे एकूण 16 वाडगे केले आहेत. त्यात 8 च्या समोर 8 वाडगे उभारले आहेत. त्यांनी शेळ्या, करडासाठी, बोकडासाठी या 4000 स्के.फुट जागेतील गोठ़याचे स्थायी पध्दतीने नियोजन केले आहे. शेळीपालन व्यवसाय यशस्वितेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. दिनेश नांद्रे यांचेही मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत असल्याचे ते सांगतात.
भविष्यातील नियोजन..
देसले यांनी आपल्या या व्यवसायाला वाढविण्याचे नियोजन केले आहे. भविष्यात उत्तम जातीच्या शेळ्यांची नोंद करून शेळ्यांचा गोल्डन गट तयार करून संवर्धन करणे, 100 शेळ्यांपासून एका वेताला दोन पिल्ले मिळवणे. शेळ्यांची संख्या 1000 पर्यंत वाढवणे, लेंडीपासून गांडूळ खत तयार करून विक्री करणे, जास्तीचे दुध उत्पादन घेऊन प्रक्रिया उद्योग सुरु करणे, असे नियोजन आहे. विशेष म्हणजे भाउसाहेब देसले हे कृषी विज्ञाने केंद्रातील शेतकरी शास्त्रज्ञ मंचचे सदस्य देखील आहेत.
शेळीपालन व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी हवे योग्य नियोजन..
शेतकर्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आम्ही त्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून पुरक व्यवसायासाठी वेळोवेळी प्रोत्साहन देत असतो व मार्गदर्शनही केले जाते. नवउद्योजकांना व्यवसायिक दृष्टीकोनातून शेळीपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काही बाबींचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये स्थानिक सुधारित जातीच्या शेळ्या वापर, पैदास धोरण, जनवारांचे आहार/चारा व्यस्थापन, जनावरांचे गोठा व्यवस्थापन, जनावरांची निगा, आजार, लसीकरण इ. व्यावस्थापन तसेच जनावरांचे विक्री विपणन व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. योग्य नियोजन करुन शेळीपालन व्यवसाय केल्यास त्यातून शाश्वत उत्पन्न मिळवता येते.
– धनराज चौधरी, शास्त्रज्ञ, पशु विज्ञान व दुग्ध शास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, धुळे.
शेतीपेक्षा शेळीपालनात अधिक नफा
शेळीपालनाची मला लहानपणापासूनच आवड होती. वडीलोपार्जित तीन एकर शेती असल्यामुळे गुरे पालनाचा अनुभवही गाठीशी होता. त्यामुळे शेळीपालनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आता या व्यवसायातून लॉकडाऊन काळातही वर्षाकाठी 4 लाखापर्यंत निव्वळ नफा मिळत आहे. शिवाय मागणी अजून वाढत असल्याने एक हजार शेळयापर्यंत व्यवसाय वाढविण्याचा विचार आहे. शेळीपालन करतानाच सन 2009 ते 11 या तीन वर्षात कापूस लागवडही करुन पाहिली. परंतु, लहरी निसर्गामुळे फारसे उत्पन्न मिळाले नाही. मात्र, आता शेळीपालनातून शाश्वत उत्पन्न मिळत आहे. शेळीचे मटण हे उच्च प्रतिचे समजले जाते. या मटणाला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. त्यामुळे इतर शेतकर्यांनीही शेळीपालन केल्यास त्यांना यातून चांगला फायदा होईल.
– भाउसाहेब देसले, प्रगतशील शेतकरी, मु.दलवाडे पो. विरदेल ता. शिंदखेडा जि.धुळे
संपर्क – 9422372313